“रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका!” — माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा

0
25
“रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका!” — माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा

माळेगाव | साहस Times प्रतिनिधी :- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची सांगता आज भव्य सभेच्या माध्यमातून करण्यात आली. या प्रचारसभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आणि सावधगिरीचा संदेश देण्यात आला.

“प्रचार संपला म्हणजे आपलं काम संपलं नाही. रात्र वैऱ्याची आहे. गाफील राहू नका,” असा स्पष्ट इशारा अजितदादांनी दिला. याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी दोन दिवस अधिक मेहनतीने काम करण्याचे आवाहन केले.

या सभेला राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सभेस मोठी गर्दी उसळल्याने विजयी सभेचीच अनुभूती निर्माण झाली.

अजित पवार म्हणाले, “कोणालाही आमचा पराभव करणं शक्य नाही. पण आमच्याच लोकांमुळे अनेकदा पराभव होतो, हा माझा अनुभव आहे. संधी मिळाली नाही म्हणून नाराज होणाऱ्यांना आम्ही इतर संस्थांमध्ये संधी देतोच. त्यामुळे चांगल्या मनाने काम करा. सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठी शेवटचे दोन दिवस निर्णायक ठरणार आहेत.”

ते पुढे म्हणाले, “मी कधीही फुशारकी मारत नाही. जनतेच्या हिताचं काम करत राहतो. बारामतीत सहकारी संस्था कशा पारदर्शक आणि यशस्वीपणे चालवतो हे सर्वांना माहिती आहे. सहकारात राजकारण येऊ नये, याबाबत माझं मत ठाम आहे. त्यामुळे या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलला मतदान करून कारखान्याच्या भवितव्याला दिशा द्या.”