सोलापूर, प्रतिनिधी – मे अखेरीसच मुसळधार वळिवाने सोलापूर जिल्ह्यावर झडप घातल्याने जनजीवन कोलमडले आहे. अवघ्या एका दिवसात सोलापूर शहरात तब्बल ११० मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तसेच १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून फळबागा, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ३२.८ मिमी पाऊस पडला. उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ६२.९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर माढा-५२.४, माळशिरस-४५.१, बार्शी-३७.२, करमाळा-३२.७, पंढरपूर-३१.३, मोहोळ-२९.२, दक्षिण सोलापूर-२३.३, अक्कलकोट-२३.२, सांगोला-१७.८ आणि मंगळवेढा-९.७ मिमी पावसाची नोंद झाली.
विशेषत: सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पहिल्याच पावसात रस्त्यांची झालेली दुरवस्था, नालेसफाईच्या कामांची धिम्या गतीने झालेली पूर्तता, यामुळे महापालिकेच्या यंत्रणेच्या मर्यादा स्पष्टपणे समोर आल्या.
अतिवृष्टी झालेल्या १३ महसूल मंडळांमध्ये उत्तर सोलापूरच्या मार्डी (११० मिमी), माढ्याच्या टेंभुर्णी (९९.३), कुर्डुवाडी (७८), म्हैसगाव (७१.१), रोपळे (७०.५), बार्शीच्या उपळे दुमाला (९९.३), पंढरपूरच्या करकंब व पटवर्धन कुरोली (प्रत्येकी ७१), तसेच करमाळ्याच्या सालसे (७०.५) आणि केम (६९), माळशिरसच्या अकलूज (६५.३) यांचा समावेश आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी हांडे प्लॉट, बाळे परिसरातील पाण्याने ग्रस्त भागांची पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र पावसाआधी नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.