फलटण (साहस Times) –माढा लोकसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी दुष्काळ मिटवण्यासाठी कृष्णा–भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्णत्वास जाणे अत्यंत गरजेचे असून, या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून पुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार धैर्यशील मोहिते–पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास नाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
फलटण–पंढरपूर रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना खासदार मोहिते–पाटील म्हणाले की, तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते–पाटील यांच्या प्रयत्नातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला होता. सदर प्रकल्पासाठी रेल्वे बोर्ड व राज्य–केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
तसेच गोखळीतील पाणी प्रश्नाबाबत डॉ. शिवाजीराव गावडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य त्या विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळी भागात पाणी वळवणे आणि बागायती क्षेत्रात पाणी अडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फलटण शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये दौरा करत नागरिकांच्या प्रश्नांचा आढावा घेतला असून, जिल्हा परिषद, राज्य शासन व रेल्वे संदर्भातील निवेदने प्राप्त झाली असून, त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून फलटण तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार खासदार मोहिते–पाटील यांनी यावेळी केला.