7 सर्वोत्तम शेवट: मैत्रीची एक अधुरी कहाणी…

0
23
7 सर्वोत्तम शेवट: मैत्रीची एक अधुरी कहाणी…


दिव्य मराठी14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आज मैत्री सेलिब्रेट करण्याचा दिवस. या विशेष दिवसानिमित्त आम्ही दोन आठवड्यांपूर्वी ‘उधारीवाला दोस्त’ ही मैत्रीची एक अधुरी कहाणी प्रसिद्ध करून ती पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. वाचकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि 9,508 वेगवेगळे शेवट आम्हाला पाठवले. वाचा पुरस्कारप्राप्त सर्वोत्तम 7 शेवट…

उधारीवाला मित्र

‘पुढल्या सोमवारपर्यंत पैसे परत कर, नाही तर तुझ्या गावी जाऊन तुझ्या वडिलांकडून ते वसूल करीन..’

गोंधळ ऐकून मी सीटवरून उठून पाहिले तर बाहेर गॅलरीत अंकुशला अडवून तिवारी उभा असल्याचे दिसले. तिवारी म्हणजे अंकुशचा घरमालक. तो नेहमीच ऑफिसमध्ये येत होता. त्यामुळे सगळे त्याला आेळखू लागले होते. अंकुशला अनेक महिन्यांपासून त्याचे भाडे देता आले नाही. ऑफिसमधील प्रत्येकाकडे अंकुशची उधार-उसनवारी होती. ऑफिस बॉयदेखील त्याला पाहून रस्ता बदलायचे. त्यांनाही पैसे मागताना त्याला लाज वाटत नव्हती. मी थोडा नशीबवान होतो. अंकुश माझा मित्र होता… त्याहीपेक्षा उधारीत देण्याइतके माझ्याकडे पैसे नसायचे. अंकुशकडे माझेही पैसे अडकले होते. परंतु, तिवारीएवढे नाही. त्याने अंकुशकडील सोन्याची चेनही गहाण ठेवली होती.

असो. अपमानित होऊन अंकुश थेट माझ्याकडे आला. येताच तो म्हणाला, ‘चल दीपक, चहा पिऊन येऊ.’ मी उठत म्हणालो, ‘अरे यार.. तुला इज्जतच नाही, पण तुझ्या घरच्यांची तरी आहे. तिवारीचे पैसे देऊन का टाकत नाहीस?’ अंकुश हसत म्हणाला, ‘देऊन टाकतो भावा. पण, तू लेक्चर देऊ नकोस. आणखी तीन-चार दिवस थांब. तुझ्यासाठी मोठे सरप्राइज आहे.’ ‘सरप्राइज? कशाचे सरप्राइज?’ असे विचारून मी अंकुशसोबत बाहेर पडताच तीन-चार मुले आमच्याकडे इशारा करून म्हणाली, ‘तोच हा बदमाश. पकडा त्याला..’ मला काही समजायच्या आतच अंकुशची धुलाई सुरू झाली होती. खूप प्रयत्न करून त्याची सुटका करू शकलो. मग कळले. महाशयांनी महाविद्यालयाच्या काही मुलांचेही पैसे गट्टम केले होते. हे तरुण जाता-जाता धमकावून गेले… उद्यापर्यंत पैसे देऊन टाक, नाही तर तंगडे तोडून टाकू. हे सगळं पाहून मी विचारात पडलो.

1) हौतात्म्य आणि मैत्री…

(प्रथम पुरस्कार – 21 हजार रुपये | सुधा कुमारी, वैशाली, बिहार)

माझ्या मनात विचार आला की, आता आपण अंकुशपासून जरा अंतर राखूनच राहायला हवं, नाहीतर त्याने उसने घेतलेले पैसे लोक उद्या आपल्याला मागायला लागतील. तीन-चार दिवसांनी अंकुश मला भेटायला आला. त्याच्या हातात लग्नपत्रिका होती. ‘अच्छा.. म्हणजे ‘पोरीचा मामला’ होता म्हणून महाशयांची लोकांकडून उसनवारी चाललीय..’ असं माझ्या मनात आलं.

पण, लग्नपत्रिका उघडून बघतली अन् मी स्तब्ध झालो. ती पत्रिका अंकुशच्या लग्नाची नव्हती, तर आमचा मित्र भावेशची बहीण भाव्या हिच्या लग्नाची होती. दोन वर्षांपूर्वी भावेश गलवान खोऱ्यात शहीद झाला होता. अंकुशने सांगितलं की, भावेशच्या हौतात्म्यानंतर गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचंही निधन झालं, आईलाही अर्धांगवायू झाला. ओव्हरटाइम करूनसुद्धा त्यांच्या उपचारासांसाठी पैसे उसने घ्यावे लागत होते. मात्र, आता भावेशच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होतेय आणि भाव्यासाठीदेखील चांगले स्थळही मिळाले आहे.

अंकुशचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. भावेशच्या निधनानंतर माझं त्याच्या घरी जाण्याचं, त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याचं धाडसच झालं नव्हतं. मात्र, अंकुशने कुटुंबातील मुलाप्रमाणे भावेशच्या कुटुंबीयांची काळजी घेतली होती. मला स्वत:ला अंकुशच्या समोर खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. ‘फ्रेंडशिप डे’ला मी अंकुशला चहासाठी घरी बोलावलं. तो आल्यावर त्याच्या हातात एक चेक देत म्हणालो, ‘मी तुझ्याइतका मोठा तर नाही होऊ शकत. पण, मित्रत्वाचं नातं तर आहेच ना? या पैशातून तुला कमीत कमी तिवारीच्या आणि त्या मुलांकडून घेतलेल्या उसन्या पैशांची परतफेड करता येईल.’

मी माझी मोटारसायकल विकली होती. अंकुशने मला मिठी मारली. कायम हसतमुख असणाऱ्या अंकुशचे डोळे आज पाणावले होते…

————–

2) केवळ बहिणीसाठी…

(द्वितीय पुरस्कार – 11 हजार रु. | अनुष्का विजय, जयपूर, राजस्थान)

शेवटी असं काय घडलं होतं की, अंकुशला इतकी उधार-उसनवारी करावी लागत होती? गावात असलेलं त्याच्या वडिलांचं दुकानही ठिकठाक चाललेलं होतं. मी याच संभ्रमात असताना अंकुश आपले विस्कटलेले कपडे नीट करीत म्हणाला, ‘मला माहितीय तू काय विचार करतोयस ते.. थोडे दिवस थांब. मी तुला सांगेन सगळं.’

अंकुशच्या बोलण्यावर मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि आम्ही चहा न पिताच ऑफिसच्या रस्त्याला लागलो. पुढचे चार-पाच दिवस कामाचा व्यापात असेच निघून गेले. एका संध्याकाळी दारावरची घंटी वाजली. दार उघडलं तर समोर अंकुश उभा होता आणि त्याच्यासोबत होती दीप्ती.

‘दीप्ती तू?’ दीप्तीला बघून मी आश्चर्यचकित झालो. दीप्ती माझी छोटी बहीण. पण, गेल्या चार-पाच वर्षांत आमची भेटगाठ नव्हती. मी भूतकाळात हरवलो. रोहन, अंकुश आणि मी चांगले मित्र होतो. पण, एक दिवस रोहन आणि दीप्ती यांनी पळून जाऊन लग्न केलं. त्यामुळे रोहन आणि आमचे कुटुंब त्यांच्यावर नाराज होते. याच कारणामुळे रोहन आणि दीप्ती शहर सोडून निघून गेले होते आणि त्यानंतर आमची पुन्हा कधी भेट झालीच नव्हती.

माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव बघून अंकुश म्हणाला, ‘वर्षभरापूर्वी रस्ते अपघातात रोहनचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची कंपनी तोट्यात जाऊ लागली. यातून सावरण्याची दीप्तीची सगळी धडपड व्यर्थ ठरल्यावर ती माझ्याशी बोलली. मी माझी सगळी बचत त्या कंपनीत गुंतवली. मात्र, तोटा एवढा मोठा होता की, लोकांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. पण, आता कंपनी त्या मोठ्या तोट्यातून हळूहळू बाहेर येतेय. एक मोठी ऑर्डरसुद्धा मिळाली आहे आणि त्यातून सगळं कर्ज तर चुकवता येईलच, पण चांगला नफादेखील होईल असं वाटतंय..’ मी अंकुश आणि दीप्तीला मिठी मारली. मनात साठलेले राग-द्वेषाचे सारे मळभ अश्रूंनी धुऊन गेले…

————-

3) ती अ‌ॅसिड दुर्घटना…

(तृतीय पुरस्कार – 5100 रु. | मोनी सिंह, भोपाळ, मध्य प्रदेश)

‘दीपक, गेट रेडी.. आज तुला एका नव्या जगाची सफर घडवून आणतो..’

‘अरे व्वा… क्या बात है! स्वप्नंसुद्धा उधारीवर बघायला लागलास की काय?’

मारामारीची घटना झाल्यानंतरच्या तीन दिवसांनी अंकुश मला हे म्हणाला, तेव्हा त्याला असा प्रतिप्रश्न केल्याशिवाय मला राहवले नाही.

मात्र, माझ्या या प्रश्नाचा अंकुशवर जरादेखील परिणाम झाला नाही. त्याने एक निमंत्रण पत्रिका दाखवली. आम्ही निघालो. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पोहोचलो, ज्यामध्ये यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार सुरू होता. ‘इथं आपलं काय काम?’ मी विचारलं अन् चालू लागलो. तेवढ्यात तिथे एका नावाची घोषणा झाली.. दीपिका, दीपिका शाह. हे नाव ओळखीचं वाटत होतं. मी मागे वळून बघितलं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी दीपिका…सहा वर्षांपूर्वी जिच्या चेहऱ्यावर काही नराधमांनी अॅसिड फेकलं होतं आणि लोकांच्या टोमण्यांनी त्रासलेली माझी ही बहीण अशी गायब झाली की आम्ही खूप शोधूनही ती सापडली नाही. नंतर आम्हीदेखील आमचं गाव सोडलं होतं.

सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जाताच दीपिकाने पहिलंच वाक्य उच्चारलं.. ‘आज मी जी काही आहे त्याचं श्रेय माझ्या अंकुशदादाला आहे..’ मी गोंधळून गेलो होतो. अंकुशने मला स्टेजसमोर नेऊन उभं केलं. मला बघून आता दीपिकालाही धक्का बसला होता. तिला काय करावं कळत नव्हतं. स्टेजवरून उतरत ती सरळ माझ्या गळ्यात पडली. तिथं उपस्थित असलेले लोक आमच्याकडं पाहत होते आणि मी प्रश्नार्थक चेहऱ्याने अंकुशकडं…

अंकुश मला एका बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, तुझी डायरी आणि त्यातील फोटोमुळे मला दीपिकाबद्दल कळलं होतं.’ मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते अन् समोर देवाच्या रूपात उभा असलेला अंकुश. तीन वर्षांपूर्वी एका पार्कमध्ये हातातली पुस्तके सावरत साफसफाई करताना अंकुशला दीपिका भेटली होती. तेव्हापासूनच सुरू झाला होता अंकुशच्या उधार-उसनवारीचा सिलसिला अन् दीपिकाच्या नव्या आयुष्याचा प्रारंभही…

प्रोत्साहनपर पुरस्कार – प्रत्येकी 3100 रुपये

4) कवितेचं पुस्तक…

(रवीना रतन नेहरा, चुरू, राजस्थान)

ती मुलं गेल्यावर मी म्हणालो, ‘चल, सांग काय आहे सरप्राइज?’

अंकुश हसत म्हणाला, ‘अरे यार! आताच सांगितलं तर मग ते सरप्राइज कसे राहील?’

तीन दिवस गेले. आज चौथा दिवस होता. मी ऑफिसला पोहोचलो तेव्हा तिथं गर्दी जमली होती. प्रत्येकाच्या हातात कसलं तरी पुस्तक होतं. या लोकांना मी दिसताच ते माझ्या दिशेने धावत आले आणि माझे अभिनंदन करू लागले.

माझे सहकारी मेहरा म्हणाले, ‘खूप छान दीपक! तू इतक्या चांगल्या कविताही लिहितोस, हे आम्हाला माहीतच नव्हतं.’

मला काही समजण्यापूर्वीच अंकुश तिथं पोहोचला आणि त्याने सगळ्यांजवळ असलेले ते पुस्तक माझ्याही हातात दिले.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माझे नाव लिहिले होते आणि आत मी लिहिलेल्या विविध कविता संकलित केल्या होत्या.

मी आश्चर्यचकित झालो. खरं तर मला कविता लिहिण्यात खूप रस होता. आपले साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी मी अनेक प्रयत्न केले, पण त्यासाठी खूप पैसे लागणार होते. बरेच दिवस मी त्यासाठी लोकांना भेटत राहिलो. शेवटी हार मानली आणि प्रयत्न करणे सोडून दिले. अंकुशला हे माहीत होतं. त्यामुळेच त्याने पैसे उसने घेऊन हे सगळे घडवून आणले. तेवढ्यात तिथे एक गाडी येऊन थांबली. त्यात हिंदीतील प्रसिद्ध कवी मनोहरजी अग्रवाल होते. ते म्हणाले, ‘दीपक, मला सकाळी सकाळी अंकुश नावाचा कुणी मुलगा तुझे हे पुस्तक देऊन गेला होता. व्वा! काय लिहिले आहेस. या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी लागणारा सगळा खर्च करण्याची माझी इच्छा आहे.’

एवढे बोलून त्यांनी मला ५० हजार रुपयांचा चेक दिला. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे मी भारावून गेलो होतो. मनोहरजी गेल्यानंतर मी भरल्या डोळ्यांनी अंकुशला मिठी मारली.

—————–

5) एकमेकांना सरप्राइज

(विभूती प्रकाशभाई दवे, भावनगर, गुजरात)

अंकुशला मारहाण झाल्याच्या घटनेला तीन-चार दिवस उलटले होते, त्या दिवशीची गोष्ट.

मी आमच्या ऑफिसमध्ये काम करत होतो. तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने माझ्याकडे एक फाइल दिली आणि म्हणाला, ‘साहेब, तुमच्या घराची कागदपत्रे घ्या..’

“पण.. माझं घर…?’

‘होय, लिलाव थांबवण्यात आला आहे. हे घर गहाण ठेवून तुम्ही जे पैसे घेतले होते ते कुणीतरी परत केले आहेत. आता तुमचे घर कर्जमुक्त झाले आहे.’

मी खुर्चीवरून उठलो. विचार करू लागलो..

‘माझ्या गहाण ठेवलेल्या घराचे पैसे कोणी दिले असतील? कदाचित अंकुशला काहीतरी माहीत असेल..’

मी अंकुशला फोन लावला, पण त्याने उचलला नाही. त्याचा परत प्रतिसादही आला नाही.

माझा संभ्रम अन् अस्वस्थता वाढत चालली होती. मग थेट अंकुशच्या घरीच जायला निघालो.

मी निघालो खरं, पण तिकडं अंकुश मात्र कायमस्वरूपी गावी जाण्यासाठी बसस्थानकावर पोहोचला होता.

‘गावात जाऊन शेती करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीन. अजून दोन एकर जमीन शिल्लक आहे..’ असा काहीसा विचार तो मनातल्या मनात करीत होता. तेवढ्यात तिवारीचा फोन आला. त्याने विचारलं, ‘अंकुश, कुठे आहेस?’

अंकुश म्हणाला, ‘माझ्याकडे आता पैसे नाहीत. एक वर्षाचे भाडे आधीच थकले आहे. त्यामुळं गावाकडं परतण्याशिवाय आता माझ्यापुढं मार्ग उरलेला नाही. पण, तुमचे पैसे मी लवकरच देईन.’

तिवारीने सांगितलं, ‘अंकुश, अरे कुठल्या पैशाबद्दल बोलतोयस? मला तर दोन दिवसांपूर्वीच भाड्याचे सगळे पैसे मिळाले आहेत.’

अंकुश लगेच घरी परतला तर तिथं पोहोचलेला दीपक त्याचीच वाट पाहत होता. दोघांनाही काहीही न बोलता सगळे समजले होते. दोन्ही मित्रांनी एकमेकांना सरप्राइज दिले होते.

——-

6) …आणि पूर्ण झालं स्वप्न

(तन्मय किशोर खंडाळे, यवतमाळ, महाराष्ट्र)

अंकुश आणि मी कसेबसे चहाच्या टपरीवर पोहोचलो. चहा घेताना मी त्याला विचारलं, ‘तू मला सरप्राइज द्यायचं म्हणत होतास, काय आहे ते?’ त्यावर अंकुश म्हणाला, ‘अरे वेड्या, आधीच सांगितलं, तर ते कसलं सरप्राइज? तीन-चार दिवसांनी तुला ते नक्की कळेल.’ मी मानेनेच ‘हो’ म्हटलं आणि आम्ही पुन्हा ऑफिसकडे परतलो.

तो रविवारचा दिवस होता. दुपारी अचानकच अंकुश माझ्या रूमवर आला आणि मला तयार होऊन सोबत चल म्हणाला. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या बाइकवरून कुठेतरी घेऊन गेला. ते ठिकाण येताच त्याने बाईक थांबवली, मला खाली उतरवत डोळ्यावरची पट्टी काढली. समोर बघताच मी आश्चर्याने स्तब्ध झालो. क्षणभरातच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी अंकुशला मिठी मारत विचारलं, ‘हेच का रे तुझे सरप्राइज?’ ‘हो रे’, तो भावुक होऊन म्हणाला. अंकुशचं हे सरप्राइज म्हणजे एक ‘अनाथाश्रम’ होता. मी ही एक अनाथ होतो आणि अनाथाश्रमातच लहानाचा मोठा झालो होतो. त्यामुळे अनाथ मुलांबद्दल माझ्या मनात खूप जिव्हाळा होता. त्यांच्यासाठी काही करावं हे माझं स्वप्न होतं. पण, डोक्यावर आधीच उच्च शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज होतं. त्यामुळे माझं हे स्वप्न केवळ स्वप्नच राहिलं होतं. पण, अंकुशला त्याबद्दल माहीत होतं. मला न सांगता तो त्यासाठी पैसे जमवत होता. उधार-उसनवारीमुळे लोकांकडून अपमान सहन करीत राहिला, प्रसंगी मारही खात होता. एवढा त्रास सहन करून त्याने मला माझ्या स्वप्नपूर्तीचे सरप्राइज दिले.

माझा हात हातात घेऊन म्हणाला, ‘चल, तुझ्याच हातांनी या नव्या अनाथाश्रमाचे उद्घाटन करायचे आहे.’

मी कपाळावर आठ्या आणत विचारलं, ‘पण, तू तुझी उसनवारी कशी फेडशील..?’ अंकुश हसत म्हणाला, ‘अरे, त्याची काळजी नको करू. काही संस्था आणि उद्योजकांशी माझे बोलणे झाले आहे. या भल्या कामात तेसुद्धा माझ्यासोबत आहेत.’

मी मनोमन विचार करीत राहिलो की, या सच्चा मित्राने ‘फ्रेंडशिप डे’च्या मुहूर्तावर मला माझ्या स्वप्नपूर्तीचे जे गिफ्ट दिले आहे त्याची उधारी कदाचित मी कधीच फेडू शकणार नाही.

—————-

7) मित्राचं प्रमोशन

(सविता मिश्रा ‘अक्षजा’, खंदारी, आग्रा, उ. प्र.)

त्या मुलांनी मारहाण करून धमकी दिल्याच्या घटनेनंतर काही दिवस उलटले. एक दिवस अंकुश त्याच मुलांसोबत ऑफिसमधील इतर लोकांची उधारी फेडताना पाहून मला आश्चर्य वाटले.

मी विचारले, ‘आजपर्यंत तर तुझ्याकडे एक पैसाही नव्हता आणि आता हे कुठून आले?’

अंकुश फक्त हसला आणि निघून गेला.

नंतर मी कामात व्यग्र असताना सीईओंच्या केबिनमधून मला फोन आला.

‘सर, तुम्ही मला बोलावलंत?’ असं विचारतच मी आत शिरलो.

सीईओची पाठमोरी खुर्ची समोर वळताच माझे डोळे विस्फारले अन् मी जवळपास ओरडलोच.. ‘तू?’

अंकुश हसत म्हणाला, ‘मी तुला सांगितलं होतं ना, चार दिवस थांब, मी तुला सरप्राइज देईन म्हणून..’

‘अरे, पण ही खुर्ची..?’ मला त्याच्या करामतीचा धक्का बसला होता.

‘तुमचे सीईओ माझे वडील आहेत. त्यांनी माझ्यासमोर दोन अटी ठेवल्या होत्या. एक तर लग्न करून घरात सून आण किंवा घर सोड.. मी पण हटून बसलो. इतक्यात मला लग्नाच्या भानगडीत तर पडायचे नव्हते. मी न ऐकल्यामुळे त्यांनी मला घर सोडण्याचा आदेश दिला. होय, माझ्या आईच्या सांगण्यावरून त्यांनी मला याच ऑफिसमध्ये कामावर ठेवले. पण, एवढ्या पैशात माझ्या आवडीनिवडी तर सोड; पण रोजच्या गरजाही पूर्ण होत नव्हत्या. आणि आता गरिबी जवळून पाहिल्यानंतर मला जगण्याचा मंत्र मिळाला. फक्त पहिले दोन महिने कही कळतच नव्हतं, म्हणून सगळ्यांकडून उधार घेत राहिलो. शिवाय एकटा राहायची वेळ आल्याने मला सहजीवनाचे महत्त्व समजले आणि लग्नाला तयार झालो. मी बदलल्यामुळे आता वडीलही खुश आहेत. मित्रा, तुझ्यासारखा स्वत: गरिबीत जगणारा, पण इतरांना त्यांच्या आनंदासाठी उधार देणारा आणि त्याची परत मागणीही न करणारा माणूस मिळणे कठीण आहे.’

मी चकित होऊन अंकुशचं सगळं बोलणं ऐकत होतो.

नेहमीसारखं खट्याळ हसत तो पुढं म्हणाला, ‘तर आता तुझं सरप्राइज.. तुला प्रमोशन देण्यात येत आहे! तर मग आता मला चहाला घेऊन चल..’

मी या उधारीवाल्या मित्राचं हे नवं सोज्वळ रूप पाहून खूप आनंदून गेलो.



Source link