एन. रघुरामन यांचा कॉलम: मुलांच्या आवडी-निवडी त्यांच्या जन्मापूर्वीच ठरू शकतात

0
4
एन. रघुरामन यांचा कॉलम:  मुलांच्या आवडी-निवडी त्यांच्या जन्मापूर्वीच ठरू शकतात




“भूक लागतेय बाळा? मला फक्त थोडा वेळ दे. मी पटकन गाजर व बीन्स आपल्या घरच्या बागेत उगवलेल्या पालकसोबत मिसळून छानशी भाजी बनवते, जी तू तुझ्या पोळीसोबत खूप आवडीने खाशील.’ मी एकदा स्वयंपाकघरात माझ्या आईला असे म्हणताना ऐकले होते. दिवाणखान्यातून मी मावशीला पाहू शकत होतो, ज्या त्यांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दोन महिन्यांत आमच्याकडे राहायला आल्या होत्या. त्या स्वयंपाकघरात एका खुर्चीवर पसरून गाढ झोपेत होत्या. मी आईला विचारले, “तू कुणाशी बोलत आहेस, मावशी तर गाढ झोपेत आहेत?’ आई म्हणाली, “तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि त्या छोट्या बाळासोबत चाललेल्या माझ्या संभाषणात अडथळा आणू नकोस. मावशी झोपलेल्या नाहीत. त्यांना अनकम्फर्टेबल वाटत आहे व त्या फक्त डोळे मिटून बसल्या आहेत.’ मी पुन्हा वाचायला गेलो व आई स्वयंपाक करताना त्याची रेसिपीदेखील मोठ्याने बोलून सांगत राहिली. मला हे संभाषण एका तरुण आईच्या घरी गेल्यावर आठवले. ती तिच्या मुलाच्या मागे पळत म्हणत होती, “प्लीज, तुझी भाजी खाऊन घे, मग मी कार्टून लावून देईन.’ आजकाल बहुतांश तरुण पालक अशा दृश्याशी परिचित असतील, ज्यामध्ये माता याच प्रकारे आपल्या मुलांची मनधरणी करतात. जेव्हा मला हसू आवरले नाही तेव्हा ती म्हणाली, “काका, लहानपणी तुम्हीसुद्धा तुमच्या पालकांना भाजी खाण्यासाठी असेच त्रास देत असाल.’ तेव्हा मी तिला वरील प्रसंग सांगितला. तिने विचारले, “तुमची आई कुणाशी बोलत होती?’ मी म्हणालो, “आमच्या काळात मुलांना भाज्यांची आवड निर्माण करण्याची सुरुवात कदाचित त्यांच्या जन्माआधीच व्हायची!’ आणि केवळ भाज्याच नाही, तर कर्नाटकी संगीत गाणे, गोष्टी सांगणे आणि पौराणिक पुस्तके मोठ्या आवाजात वाचून दाखवणे हादेखील गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांतील दिनचर्येचा भाग असायचा. कारण आमच्या पालकांचा असा विश्वास होता की मुलांच्या आवडी-निवडी त्यांच्या जन्मापूर्वी, गर्भातच आकार घेऊ लागतात. आधुनिक पालक, कपाळावर आठ्या आणून काही बोलण्याचा प्रयत्न करू नका. आधी मला माझे म्हणणे समजावून सांगू द्या. आमच्या एकत्र कुटुंबात माझी काही चुलत-मावस भावंडं एक तर आमच्या घरात जन्माला आली होती, किंवा त्यांच्या जन्मापूर्वीच्या शेवटच्या दोन महिन्यांत माझी आई त्यांच्या घरी जाऊन राहिली होती. मी माझ्या सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. आम्हाला भाज्या व दही आवडते, कर्नाटकी संगीत प्रिय आहे. आमच्यापैकी बहुतेकांना अनेक भाषा- ज्यामध्ये संस्कृतचाही समावेश आहे- आणि कथा सांगण्याची कला अवगत आहे. हा गुण माझ्या आईमध्येही होता. यूकेमधील डरहम विद्यापीठाच्या प्रा. नादजा रीसलँड यांनी नेमक्या याच विषयावर संशोधन केले आहे व त्यांना असे आढळून आले की, गर्भात असताना ज्या भाज्यांच्या वासाशी मुलांचा वारंवार परिचय करून दिला जातो, त्यांच्या जन्मानंतर त्या भाज्यांबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देण्याची शक्यता कमी असू शकते. रीसलँड यांनी मान्य केले, “आमच्या संशोधनावर आधारित आम्ही असे म्हणू शकतो की गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात एखाद्या विशिष्ट चवीच्या संपर्कात आल्याने मुलांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या चवीच्या स्मृती तयार होऊ शकतात, ज्या जन्मानंतर अनेक वर्षांपर्यंत त्यांच्या अन्नाच्या आवडीवर प्रभाव टाकू शकतात.’ त्या पुढे म्हणाल्या, “जर गर्भाला खाण्यापिण्याच्या काही सवयी लावून दिल्या, तर पुढे जाऊन ते मूल सकस आहार घेण्यामध्ये अधिक रस घेऊ शकते.’ या अभ्यासात फ्रान्स, नेदरलँड्स, केंब्रिज व ॲस्टन विद्यापीठाचे संशोधकदेखील सहभागी होते. ॲस्टन विद्यापीठाने या कार्यक्रमाला अर्थसाहाय्य दिले होते. जेव्हा मी सह-लेखकांपैकी एकाची ही टिप्पणी वाचली की “हे निष्कर्ष खाण्यापिण्याच्या सुरुवातीच्या हस्तक्षेपांबद्दल विचार करण्याचे नवीन मार्ग खुले करतात’, तेव्हा मला माझे पालक व घरातील ज्येष्ठांचा खूप अभिमान वाटला, ज्यांना कदाचित खूप आधीच ही गोष्ट माहीत होती. बहुधा त्यांनी ही शिकवण त्या प्रसिद्ध कथेवरून घेतली असावी, ज्यामध्ये अभिमन्यू आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूह भेदायला शिकतो. असे नवीन संशोधन आपल्या जुन्या परंपरांबद्दल नवीन रस निर्माण करते. फंडा असा आहे की, आपल्या ज्येष्ठांच्या काही परंपरा कदाचित आज लोकांच्या कपाळावर आठ्या आणत असतील, पण त्यांनी आपले काही नुकसान तर केले नाही. मग आजच्या तरुण गरोदर मातांसाठी किमान अन्नाशी संबंधित ती परंपरा अवलंबण्यात काय गैर आहे? या विषयावर तुमचे मत मला नक्की लिहून पाठवा.



Source link