
- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Article Public Administration Write By Shekhar Gaikwad
शेखर गायकवाड21 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
प्रत्येक खात्यात केवळ प्रशिक्षणाला हजेरी लावणारा एक नवा संवर्ग तयार झाला आहे. काही वेळा चांगल्या देशात प्रशिक्षण घेऊन आलेल्या अधिकाऱ्याला टोमणे मारण्यासाठी त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्या प्रशिक्षणाचा ‘योग्य’ वेळी उल्लेख करतात. त्यामुळे ‘हे शिकला काय प्रशिक्षणात?’ असा डायलॉग त्याला नोकरीभर ऐकावा लागतो. त्या शेरेबाजीचा खरा अर्थ, ‘तुमच्याऐवजी प्रशिक्षणासाठी माझी निवड व्हायला हवी होती,’ असा असतो!
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जीवनात प्रशिक्षणाचा प्रसंग वारंवार येतो. हल्ली प्रशिक्षणामुळे नोकरशाही सुधारते, या सिद्धांतावर जागतिक बँकेपासून सर्व देशांच्या सरकारांनी भर दिल्यामुळे हा प्रशिक्षण योग आवर्जून येतो. अधिकाऱ्यांना महत्त्वाचे काम असल्यामुळे बऱ्याच वेळा प्रशिक्षणाला जाता येत नाही. त्यामुळे कमी महत्त्वाचे ट्रेनिंग आले की, दुसऱ्या कुणाला तरी पाठवायची पद्धत रुढ झाली आहे. प्रत्येक कार्यालयात असे कोणतेही काम न करणारे, पण प्रशिक्षणाला मात्र लायक अशा कर्मचाऱ्यांची एक यादीच तयार असते. असे लोक प्रशिक्षणाला वारंवार येत असल्याने प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्साहाने शिकवायला आलेल्या तज्ज्ञ व्याख्यात्यांना मात्र राजीनामा द्यावा असे वाटू लागते. कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम न होता प्रशिक्षणाला सतत कोणीतरी उपस्थित राहील, अशी दक्षता चलाख अधिकारी घेतात. प्रशिक्षण संस्थांचा पण नाईलाज असतो. त्यांनाही वार्षिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि संस्था जिवंत राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे भाग असते. मग अशा प्रक्रियेतून देणाऱ्याने काय प्रशिक्षण दिले आणि घेणाऱ्याने काय घेतले, हा एका वेगळ्या संशोधनाचाच भाग ठरावा!
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जीवनात प्रशिक्षणाच्या योगाबाबत येणारी अनुभूती ही सर्व विभागांमध्ये कमी-अधिक स्वरुपात सारखीच असते. अशा बाबूंच्या संदर्भातील काही अनुभव असे : मुंबई, दिल्ली, कोलकता किंवा परदेशात चांगल्या हॉटेलात प्रशिक्षण असेल, तरच साहेब स्वतः प्रशिक्षणाला जातात. परदेशातील प्रशिक्षणासाठी कनिष्ठ अधिकाऱ्याची मेरिटवर निवड झाली, तरी महत्त्वाचे काम असल्यामुळे हा अधिकारी इथेच राहणे कसे आवश्यक आहे, याची खात्री वरिष्ठ अधिकारी कागदोपत्री पटवतात. साहेबांची फॅमिली ज्या ठिकाणी आहे, तिथे किरकोळ प्रशिक्षण, कार्यशाळा, वर्कशॉप, सेमिनार असेल, तर साहेब स्वत: हे महत्त्वाचे प्रशिक्षण आहे म्हणून त्याला जातीने हजर राहतात.
प्रशिक्षण कमी महत्त्वाच्या ठिकाणी असेल, तर साहेबांच्या वतीने अन्य अधिकाऱ्याने हजेरी लावायची असते. प्रशिक्षणाच्या ठिकाणी गेल्यावरही ग्रंथालय, जिमखाना, योग शिबिर यांकडे साफ दुर्लक्ष करून नॉनव्हेज जेवण केव्हा असते? बार आहे का? ब्रेकफास्टला काय असते? उशिरा क्लास अलाऊड आहे का? फक्त हजेरी लावून मधूनच सटकून नातेवाईकांना भेटायला जाता येते का? अशी चौकशी करणारी अधिकारी मंडळी मोठ्या संख्येने असतात.
प्रशिक्षणाच्या काळात प्रशिक्षण संस्था परीक्षा घेणार असेल, तर जेवण बरोबर मिळत नाही, अशी तक्रार योग्य वेळी करता येईल का? असा विचार करणारेही काही ‘प्रशिक्षित’ कर्मचारी असतात. मुख्य विषय सोडून भलत्याच विषयावर प्रशिक्षकाला शंका विचारणारा एक स्वतंत्र ग्रुप असतो. बहुसंख्य प्रशिक्षण वर्गात दुपारच्या सत्रात जेवणानंतर पाठीमागे बसून डुलक्या काढणाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर भरणा असतो. आजकाल त्यांचेही फोटो काढून लगेच व्हाट्स अॅपवर टाकणारे सहप्रशिक्षणार्थीही दिसतात. त्याच ग्रुपमध्ये कोर्स डायरेक्टरही असतात, पण त्याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केले जाते. काही अनुभवी अधिकारी वर्गात स्वत:ला शांतपणे झोप घेता येण्यासाठी शंका विचारणाऱ्याला सन्मानाने पुढच्या खुर्च्यावर बसवतात. तुम्ही पुढे बसले पाहिजे, असे सांगून ही कसरत साधली जाते. एकदा प्रशिक्षणाला जाऊन आल्यानंतर सोयीच्या डिपार्टमेंटमध्ये बदली मागण्यासाठी या प्रशिक्षणात दिलेल्या ज्ञानापेक्षा प्रमाणपत्राचा जबरदस्त पद्धतीने वापर केला जातो! प्रशिक्षण शिबिरात शिकवणारे प्रशिक्षक कितीही चांगले असतील, पण जेवण चांगले नसेल, तर प्रशिक्षणाचे रेटिंग खाली येते.
काही वेळा चांगल्या देशात प्रशिक्षण घेऊन आलेल्या अधिकाऱ्याला टोमणे मारण्यासाठी त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्या प्रशिक्षणाचा योग्य वेळी उल्लेख करतात. त्यामुळे ‘हे शिकला काय प्रशिक्षणात?’ असा डायलॉग त्याला नोकरीभर ऐकावा लागतो. त्या शेरेबाजीचा खरा अर्थ, ‘तुमच्याऐवजी प्रशिक्षणासाठी माझी निवड व्हायला हवी होती,’ असा असतो! प्रत्येक खात्यात केवळ प्रशिक्षणाला हजेरी लावणारा एक नवा संवर्ग तयार झाला आहे. त्यामुळे या केडरच्या कर्मचाऱ्याला कधी कधी बॅक टू बॅक प्रशिक्षण येते. एक प्रशिक्षण संपवून पुन्हा कार्यालयात हजर होण्याऐवजी त्याला परस्पर दुसऱ्या प्रशिक्षणाला हजर व्हायला सांगितले जाते.
एकदा एका वरिष्ठ आणि खडूस साहेबांकडे त्यांच्या विभागातील उत्साही व तरुण अधिकारी एका महत्त्वाच्या प्रशिक्षणासाठी आपली स्पर्धेतून निवड झाली म्हणून सांगायला गेला. निवड चाचणी किती अवघड होती, पण अभ्यास केल्यामुळे आपण कसे निवडले गेलो, हे त्या अधिकाऱ्याने साहेबांना सांगितले. शिवाय, ‘तुमचे मार्गदर्शन होते म्हणूनच माझी निवड झाली,’ हे सांगण्यास तो अजिबात विसरला नाही. तरी देखील साहेबांचा खडूसपणा जागा होताच! ते म्हणाले, ‘ही तीच का परीक्षा, जी हजारो अधिकारी देतात, त्यातले प्रथम २० टक्के लोक निवडतात? त्या २० टक्क्यांपैकी ५ टक्के अधिकारी मुलाखतीला निवडले जातात आणि शेवटी एक टक्का अधिकाऱ्यांची अंतिम निवड होते? आणि त्या १ टक्का अधिकाऱ्यांकडे पाहिल्यावर वाटत नाही, की ते एवढी प्रक्रिया करुन निवडले जात असतील!’
—-
शेखर गायकवाड
shekharsatbara@gmail.com





