महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शरद पवारांचे नेतृत्व आवश्यक – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

0
1
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शरद पवारांचे नेतृत्व आवश्यक – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण: “पुरोगामी महाराष्ट्र रसातळाला नेणाऱ्या प्रवृत्तीला थांबवण्यासाठी शरद पवार अविरत काम करत आहेत. कोणत्याही वैयक्तिक फायद्याचा विचार न करता, महाराष्ट्राचं भविष्य सुरळीत राहावं म्हणून आजही ते ठामपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मतदारांनी उभे राहणे गरजेचे आहे,” असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडी (ता. फलटण) येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मंचावर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, महेंद्र सूर्यवंशी बेडके, सह्याद्री कदम, नितीन भोसले, भगवानराव होळकर, शंकरराव माडकर, राजाभाऊ भोसले, सतीश माने, सौ. रेश्माताई भोसले, शंभुराज खलाटे, सुधीर भोसले, विकास नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणाला पळवाट दाखविणारे, विकास रोखणारे खरे दोषी कोण आहे हे जनता ओळखून त्यांना येत्या 20 नोव्हेंबरला धडा शिकवला पाहिजे.”

संजीवराजे यांनी उमेदवार दीपक चव्हाण यांचे कौतुक करताना त्यांचा उल्लेख “सुसंस्कृत, सुशिक्षित, आणि निष्ठावान” नेता म्हणून केला व असेही म्हटले की, “15 वर्षांपूर्वीचे जसे होते तसेच आजही आहेत. जनतेच्या दुःखात सामील होणारा एक उमेदवार आपल्या सेवेत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकडे पाहून योग्य निर्णय घ्यावा.”