जालना : पिंपळगाव रेणुकाई परिसरातील मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांनी आज जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात बाजार समिती सभापतींना निवेदन देऊन व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, खरेदीदर आधी निश्चित केल्यानंतर कमी भावाने मिर्चीची खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांना फसवून कमी पैशात त्यांची मिर्ची विकत घेतली जातेय, यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्याकडे तक्रार करत बाजार समिती सभापतींना भेटून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, बाजार समितीकडून शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन व्हावे, आणि फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशा मागण्याही शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांसोबत फसवणुकीचे प्रकार घडत होते, या संदर्भात जाब विचारला असता व्यापारी शेतकऱ्यांना उडवा उडवीचे द्यायचे. अखेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जालना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. ज्या नंतर राजाभाऊ देशमुख यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत बाजार समिती सभापतींची भेट घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची व त्यांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर बाजार समिती सभापतींनी लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.