


दरवर्षी वर्षातून दोन वेळा लॅक्मे फॅशन वीकची धामधूम अनुभवायला मिळते. मात्र या वर्षीचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ खास होता! देशातील महत्त्वाच्या फॅशन शोपैकी एक असलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ला यंदा पंचवीस वर्षं पूर्ण झाली. आणि पंचविशीचं सेलिब्रेशन या वेळी संपूर्ण फॅशन वीकच्या माहौलमध्ये दिसत होतं. गेल्या पंचवीस वर्षांतील आयकॉनिक डिझाइन्स लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी रॅम्पवर अवतरली. अनेक इन्फ्लुएन्सर्सनी या वेळी रॅम्पवर हजेरी लावली. लिसा हेडन, लिसा रे, इंद्राणी दासगुप्ता, सारा जैन डायस, शिमोना नाथ अशा अनेकांनी तर या वेळी वॉक केलाच, मात्र ‘लॅक्मे’चा चेहरा असलेली ओ.जी. करीना कपूरसुद्धा या वेळी लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी रॅम्पवर खास उपस्थित झाली होती. या वर्षीच्या लॅक्मे फॅशन वीकचे काही खास ट्रेण्ड्स…
आजकाल आपण प्रत्येकजण ऋतूंनुसार आपला वॉर्डरोब बदलायची तयारी करत असतो. उन्हाळा म्हणजे कलरफुल आणि हलक्या पेस्टल शेड्सची रेलचेल दरवर्षीच अनुभवायला मिळते. अगदी मार्केटमध्ये ट्रेण्डिंगही पेस्टल आणि प्रिंटेड कपडेच असतात. ‘लॅक्मे फॅशन वीक समर सीझन’ हा उन्हाळ्यात होणाऱ्या मोठमोठ्या लग्नसोहळ्यांसाठीचा ट्रेण्ड सेटर आहे. मात्र या वेळी इथेही काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं. नेहमीच्या सवयीला, रंगांना, पॅटर्न्सना बाजूला ठेवून ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये या सीझनला काळ्या रंगाकडे जाणाऱ्या अशा डीप आणि डार्क शेड्सचे डिझाइनर वेअर्स अधिक करून पाहायला मिळाले. डार्क शेड्समधले गाऊन्स, ड्रेसेस आणि भरपूर डिझाइन्सनी या वेळचा लॅक्मे फॅशन वीक भारलेला होता. डीप ब्लॅक, एमराल्ड ग्रीन, सफायर ब्लू अशा कॉमन एरवी समरसाठी फारशी पसंती न मिळणाऱ्या कलर शेड्सवर फॅशन डिझाइनर्सनी अधिक जोर दिल्याचं जाणवलं. नेहमीच्या समरमधल्या पेस्टल शेड्सऐवजी या वेळी व्हाइट आणि लाइट ग्रेच्या शेड्सही जास्त करून पाहायला मिळाल्या. अनेक डिझाइनर्सनी आपले संपूर्ण कलेक्शन्स व्हाइटमध्ये केले होते. ‘ब्लॅक अँड व्हाइट’ कॉम्बिनेशन्सही अनेक डिझाइनर वेअर्समध्ये पाहायला मिळाली. या कॉम्बिनेशन्समध्ये ब्लॅकपासून व्हाइटपर्यंतच्या सगळ्या शेड्सचाही समावेश अनेक ठिकाणी करण्यात आला होता.
समर कलेक्शनमध्ये नेहमीच हलके-फुलके, फ्रेश दिसणारे, डोळ्यांना शांत भासले तरीही क्यूट वाटणारे असे फ्लोरल पॅटर्न्स बघायला मिळतात. मात्र, या वेळी बहुतांश डिझाइन्समध्ये फ्लोरल प्रिंटपेक्षा जॉमेट्रिक प्रिंट्स जास्त वापरली गेली. स्ट्रेट लाइन्स, कर्व लाइन्स, वेव्ह्ज अशा पॅटर्न्सनी पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या या शेड्स सजल्या होत्या. नुसते प्रिंट पॅटर्न्सच नव्हे तर वेडिंग कलेक्शनमध्येही एम्ब्रॉयडरीसुद्धा अत्यंत हेवी वापरली गेली. डार्क शेड्सना अधिक डार्क आणि डीप बनवणाऱ्या पॅटर्न्सची एम्ब्रॉयडरी या वेळी दिसून आली. नेहमीचे फ्रिल्स आणि रफल्स जाऊन या वेळी हाय नेक, मोठे स्लीव्ह्ज, लाँग गाऊन्स अशा डिझाइन्सनी वेडिंग कलेक्शन्स सजली होती. नेहमीच्या वेडिंग कलेक्शनमध्ये खरंतर प्रिन्सेस गाऊन सदासर्वकाळ ट्रेंडिंग असतात. या वेळी मात्र बॉडी-फिट गाऊन्सना या वेडिंग कलेक्शनमध्ये प्राधान्य दिलं गेलं होतं.
उन्हाळ्यात साधारणत: कमीत कमी लेयरिंग केलं जातं. मात्र या वेळी ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये खास समर सीझनसाठीच्या कपड्यांमध्येही लेयरिंग, कोट्स आणि सूट्स भरपूर प्रमाणात पाहायला मिळाले. डार्क शेड्सचे किंवा अगदी ब्लॅक कलरचेसुद्धा सूट्स डिझाइन केले गेले होते. स्टिच धोती पॅटर्नमध्येही काळी धोती आणि काळा कुर्ता अशी कॉम्बिनेशन्स अधिक ट्रेंडमध्ये होती. त्यालाच हेवी वर्क असलेल्या एम्ब्रॉयडरीच्या बॉर्डर वापरल्या गेल्या. सूट्सचं लेयरिंग केवळ मेन्स फॅशनमध्ये नव्हे तर वुमेन फॅशन डिझाइन्समध्येसुद्धा पाहायला मिळालं. डार्क आणि डीप शेड्स किंवा काळ्या रंगाचे सूट्स एका बाजूला, तर पूर्ण व्हाइट आणि त्याच्या विविध शेड्समधील सूट्स दुसऱ्या बाजूला… अशा पूर्णपणे दोन विरोधी रंगांच्या शेड्समधली डिझाइन्स फॅशन डिझाइनर्सनी या वेळच्या कलेक्शनमध्ये सादर केली होती.
पंचविसाव्या वर्षानिमित्त काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या आणि त्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव्ह्ज, प्रयोग आणि प्लॅटफॉर्म्स निर्माण करणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये डिझाइन्स, कलर्स, पॅटर्न्स आणि प्रेझेंटेशनमध्येही वेगळेपणा नक्कीच दिसून आला.
viva@expressindia.com

मुंबई : मुंबईतील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. मागील दोन-तीन दिवस मुंबईत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत तापमानात वाढीची शक्यता नसली तरी उकाड्याचा ताप होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३३.९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मागील काही दिवस पावसाळी वातावरणामुळे मुंबई, ठाणे परिसरात तीव्र उकाडा जाणवत आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात भर पडत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून कोकणातील अनेक भागांत पाऊस कोसळला. शविवारपासून मात्र, या भागात उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील काही भागांत उकाड्यामुळे नागरिक हैराण असतानाच विदर्भात गारपिटीचा इशारा कायम आहे. विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारेही वाहतील.
यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटांची शक्यता आहे.
● मार्च महिना सुरू झाल्यापासून तापमान सातत्याने वाढत असून, अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्चमध्ये ३० जणांना उष्माघात झाला. १४ जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले असले तरी मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.
● बुलढाणा, गडचिरोली व परभणी या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रत्येकी चार रुग्ण सापडले आहेत. मात्र २२ जिल्ह्यांत एकही उष्माघाताचा रुग्ण नाही. मुंबईमध्येही अद्याप उष्माघाताच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत राज्यामध्ये ४० जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.
● उष्णतेच्या लाटेच्या काळात स्वच्छ पाणी प्या, हलका आहार घ्या, सावलीत राहण्याचा प्रयत्न करा आणि गरज असल्यास वैद्याकीय मदत घ्या, असा सल्ला आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिला आहे.




Archeological Survey Of India Odisha Sea Shores Chalcolithic: ओडिशामध्ये पुरातत्व उत्खननात भारताच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा सापडला आहे. पुरातत्व उत्खननात सापडलेल्या खजिनामुळे संपूर्ण जग अचंबित झाले. यामुळे 7000 वर्ष जुन्या संस्कृतीचे रहस्य उलगडणार आहे. जाणून घेऊया हे नेमकं काय संशोधन आहे.
ओडिशाची राजधानी असलेले भुवनेश्वर ज्या जिल्ह्यात येते त्या खुर्दा जिल्ह्यात हा प्राचीन खजिना सापडला आहे. समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरिमल गावाजवळील नारा हुडा नावाच्या ठिकाणी काही ढिगारे सापडले, जे उत्खनन करण्यात आले. या उत्खननातून पूर्व भारतातील प्राचीन संस्कृतीची ओळख पटली आहे.
या संस्कृतीला ‘चाल्कोलिथिक’ म्हणतात. या अवशेषावरून प्राचीन काळातील लोक कसे राहत होते आणि शेती कशी करत होते हे समोर आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे पथक 2021 पासून येथे उत्खनन करत आहे. उत्खननाच्या तिसऱ्या टप्प्यात ‘चाल्कोलिथिक’ काळातील अवशेष सापडले आहेत. उत्खननादरम्यान गोलाकार मातीच्या रचना सापडल्या आहेत. काहींना भिंती असतात तर काहींना भिंती नसतात. मातीच्या भिंती आणि खांब बसवण्यासाठी छिद्रे देखील आढळली आहेत असे पुरातत्वशास्त्रज्ञ पीके दीक्षित सांगितले.
चाल्कोलिथिक काळातील मुख्य शोध म्हणजे तीन-चार प्रकारच्या गोल झोपड्या, दगड आणि तांब्याच्या वस्तू. यावरून असे दिसून येते की प्राचीन काळातील लोक येथे स्थायिक होऊ लागले होते. यानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली होती. झोपड्या आणि अंगणांभोवतीचा परिसर लाल मातीने व्यापलेला होता.
उत्खननात दगड आणि लोखंडी हत्यारे, तांबे आणि हाडांपासून बनवलेल्या वस्तू, मौल्यवान दगड, मातीचे मणी, काचेच्या बांगड्यांचे तुकडे, मातीच्या प्राण्यांच्या मूर्ती, संगमरवरी दगड, खेळण्यांच्या गाडीची चाके, दगड पॉलिश करण्याची साधने, हातोडा आणि मातीच्या गोळ्या देखील सापडल्या आहेत.
ताम्रपाषाण युग, ज्याला ताम्र-पाषाण युग असेही म्हणतात. नवपाषाण युगाची सुरुवात नवपाषाण युगानंतर होते, जिथे मानवांनी दगडी हत्यारे वापरण्याऐवजी तांब्याची हत्यारे वापरली जातात. हा काळ अंदाजे इ.स.पूर्व 4000 ते इ.स.पूर्व 2000 पर्यंतचा होता. तांब्याचा वापर याच काळात सुरू झाला आणि तो कांस्य युगाचा एक भाग मानला जातो. चॅल्कोलिथिक टप्प्यातील वसाहती छोटा नागपूर पठारापासून गंगेच्या खोऱ्यापर्यंत पसरल्या.
चॅल्कोलिथिक युग ही प्रामुख्याने ग्रामीण संस्कृती होती. राजस्थानमधील गिलुंड आणि अहार ही ताम्रयुगीन ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील प्रवरा नदीच्या काठावर जोर्वे संस्कृती विकसित झाली. गिलुंड, बागोर (राजस्थान), दायमाबाद, इनामगाव, नेवासा (महाराष्ट्र), नवदाटोली, नागदा, कायथा, एरण (मध्य प्रदेश) ही भारतातील चाल्कोलिथिक स्थळे आहेत. या वसाहती हडप्पा संस्कृतीपेक्षा खूप जुन्या आहेत.

आयपीएल २०२५ मध्ये ११ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात केकेआरने फलंदाजी करत हैदराबादसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये मोठे बदल करण्यात आले. यामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघात नव्या अष्टपैलू खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. या खेळाडूने पहिल्या डावात दोन्ही हातांनी गोलंदाजी केली. कोण आहे हा खेळाडू?
आपण अनेकदा ऐकलंय की एकतर डावखुरा गोलंदाज असतो किंवा उजव्या हाताने गोलंदाजी करतो. पण आयपीएलमध्ये पहिल्यांदाच या अष्टपैलू खेळाडूने दोन्ही हातांनी गोलंदाजी केली आहे. फक्त गोलंदाजीच नाही केली तर त्याने मोठी विकेटही मिळवली.
सनरायझर्स हैदराबादकडून केकेआर विरूद्धच्या सामन्यात कामिंदू मेंडिसला पदार्पणाची संधी मिळाली. कामिंदू मेंडिस हा श्रीलंकेचा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. कामिंदू मेंडिसने या पहिल्या सामन्यात इतिहास घडवला. पॅट कमिन्सने १३व्या षटकात कमिंदू मेंडिसकडे चेंडू सोपवला आणि येताच या खेळाडूने आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळाडूने वेंकटेश अय्यरला उजव्या हाताने गोलंदाजी केली कारण तो डावखुरा फलंदाज होता आणि कामिंदू मेंडिसने उजव्या हाताने फलंदाजी करत असलेल्या अंगक्रिश रघुवंशीला डाव्या हाताने गोलंदाजी केली.
कामिंदू मेंडिसने पहिल्याच षटकात आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळाडूने आयपीएल कारकिर्दीतील तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. मेंडिसने अर्धशतक झळकावल्यानंतर खेळत असलेल्या अंगक्रिश रघुवंशीची विकेट घेतली. कामिंदूने एका षटकात ४ धावा देत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कर्णधार पॅट कमिन्सने त्याला पुन्हा गोलंदाजीची संधी दिली नाही.

फलटण :- दिनांक १० मे २०२५ ते १६ मे २०२५ रोजी श्रीलंका या देशाच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहोत यादरम्यान आम्ही वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा येत असल्याने बुद्ध पौर्णिमा या वेळेला आम्ही श्रीलंकेत साजरी करणार आहोत, तीस सदस्यांची पहिली बॅच या कालावधीमध्ये श्रीलंकेला जाणार आहे तर जून महिन्यामध्ये सांची अभ्यास दौरा आयोजित केला गेला आहे ज्या सदस्यांना माझ्यासोबत श्रीलंकेच्या अभ्यास दौऱ्यावर यायचे आहे त्याची लिंक खाली शेअर केलेली आहे तसेच सांची स्तूपाच्या अभ्यास दौऱ्यावर ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे त्यांच्यासाठी वेगळी लिंक दिलेली आहे, ज्या सदस्यांना अभ्यास दौऱ्यावर यायचं आहे त्यांनीच या समूहाची लिंक क्लिक करून समूहात जोडून घ्या अधिक माहिती तुम्हाला समूहात दिली जाईल, जून महिन्यात होणारा सांची अभ्यास दौऱ्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही, त्याच्याविषयी चर्चा सुरू आहे, सांची अभ्यास दौऱ्यामध्ये सर्व बाबी आपण करणार आहोत अभ्यास दौऱ्यावर येणाऱ्या सदस्यांची ट्रेने येण्या-जाण्याची, एसी बस मधून फिरण्याची व्यवस्था करणारा आहोत तसेच चहा नाश्ता जेवण या सर्व व्यवस्थापन आपण सांची अभ्यास दोऱ्यात करत आहोत ज्या सदस्यांना श्रीलंकेच्या अभ्यास दौऱ्यावर येण्यास जमत नाही अशा सदस्यांना ही संधी आहे की ते सांचीच्या अभ्यास दौऱ्यावर माझ्यासोबत येऊ शकतात ज्यांना यायचे त्यांनी खाली दोन वेगवेगळ्या समूहाच्या दोन वेगळ्या लिंक आहेत, अधिक माहितीसाठी समूहात जोडून द्या.
श्रीलंका अभ्यास दौऱ्याची लिंक : https://chat.whatsapp.com/B6DsgMjWtCYFSkEx6Nca0f
सांची अभ्यास दौऱ्याची लिंक : https://chat.whatsapp.com/GijMxcHKCiQICjS237V4H5
सूरज रतन जगताप, लेणी अभ्यासक

ठाणे : तंबाखूच्या सेवनामुळे मौखिक कर्करोगाचा धोका असतो. कर्करोग झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यासाठी सर्वाधिक खर्च होत असतो. हा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसतो. त्यासाठी त्यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात जावे लागते. परंतू, ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना आता, टाटा रुग्णालयात जाण्याची अवश्यकता लागणार नसल्याचे चिन्हे आहेत. ठाणे जिल्हा रुग्णालयात प्रथमच मौखिक कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयामुळे ठाणे जिल्ह्यातील रुग्णाना आता, काहीसा दिलासा मिळू लागला आहे.
ठाण्यात रहाणारे रामनाथ जाधव (७०) (नाव बदलेले) यांना गेल्या अनेक वर्षांपासून तंबाखू खाण्याची सवय होती. मात्र या तंबाखूने आपल्याला मौखिक कर्करोगाला सामोरे जावे लागेल याची जाणीव त्यांना नव्हती. अचानक तोंडातली जीभ जाड झाल्याने बोलताना जेवताना त्रास जाणवू लागला. या त्रासामुळे रामनाथ हे उपचारा निमित्त ठाणे जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांच्या जिभेची बायप्सी करण्यात आली. त्यावेळी त्यांना जीभेचा कर्करोग असल्याचे समजले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जिभेची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रामनाथ याची सर्व रक्त चाचणी करण्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून शारीरिक स्वास्थ्याची तपासणी करण्यात आली. यावेळी रामनाथ यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे ही जोखमीची शस्त्रक्रिया ऑनको सर्जन डॉ. हितेश सिंगवी यांच्या मदतीने पार पाडण्यात आली. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. सुजाता पाडेकर यशस्वी केली.
गेल्या वर्षभरात ठाणे जिल्हा रुग्णालयात पाचवी यशस्वी कमांडो शस्त्रक्रिया पार पडली आहे. कमांडो शस्त्रक्रिया म्हणजेच ज्यामध्ये मुखाचा संसर्गित भाग आणि मानेतील गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली जाते.- डॉ. अर्चना पवार, जिल्हा दंतशल्य चिकित्सक, ठाणे.
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचारांचे मोठे आर्थिक ओझे सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र, ठाणे जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मौखिक कर्करोगाच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून रुग्णांना दिलासा मिळत आहे.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.