


OTT Releases This Week: ओटीटीवर मागच्या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या. आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातही काही बहुचर्चित व बहुप्रतिक्षित कलाकृती रिलीज होणार आहेत. या वीकेंडला ओटीटीवर अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि सीरिज तुमचं मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्शन, हॉरर, कॉमेडी, थ्रिलर यासह इतरही जॉनर पाहायला मिळतील. देशात जवळपास ६०० कोटींचे कलेक्शन करणारा ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपटही याच यादीत आहे.
एप्रिलचा दुसरा आठवडा म्हणजेच ७ ते १३ एप्रिल २०२५ दरम्यान कोणते नवीन चित्रपट आणि सीरिज विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात.
Chhaava OTT Release : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. सात आठवड्यांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकी कौशलचा हा चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार आहे. यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ ओटीटीवर रिलीज होणार आहे. तुम्हाला या वीकेंडला हा चित्रपट घरी बसून पाहता येईल. तुम्ही जर ‘छावा’ मोठ्या पडद्यावर पाहिला नसेल तर तो ११ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपट विकी कौशलसह रश्मिका मंदना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, दिव्या दत्ता, डाएना पेंटी यांच्या भूमिका आहेत.
Chhorii 2 on OTT : 2021 साली रिलीज झालेल्या ‘छोरी’ चित्रपटाचा सिक्वेल असलेला ‘छोरी 2’ OTT वर धूम ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. या हॉरर चित्रपटात नुसरत भरुचा आणि सोहा अली खान दिसणार आहेत. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल आणि विशाल फुरिया दिग्दर्शित या चित्रपटात गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, पल्लवी अजय, कुलदीप सरीन आदी कलाकार आहेत.
Black Mirror Season 7 : ‘ब्लॅक मिरर’चे आधीचे सर्व सीझन लोकांना खूप आवडले आणि आता निर्माते त्याचा सातवा सीझन घेऊन आले आहेत. ‘ब्लॅक मिरर सीझन 7’ ही एक प्रसिद्ध सायन्स फिक्शन सीरिज आहे, जी १० एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या सीझनमध्ये लोकांना आधीप्रमाणेच अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
The Last Of Us Season 2 : ‘द लास्ट ऑफ अस’ ही एक प्रसिद्ध सीरिज आहे, जिचा दुसरा सीझन १४ एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर आता प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सीरिज एका व्हिडिओ गेमवर आधारित आहे.
The Legend Of Hanuman Season 6 Release Date : ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ ही ॲनिमेटेड सीरिज असून त्याचे 5 सीझन आतापर्यंत रिलीज झाले आहेत आणि आता सहावा सीझन येणार आहे. हा नवीन सीझन ११ एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. त्यामुळे ज्यांना हनुमानजींच्या कथा आवडतात, त्या प्रेक्षकांसाठी ही एक उत्तम पर्वणी असेल.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील रामलाल हासे हे औषधी वनस्पतींचा विशेष अभ्यास असणारे, पर्यावरणप्रेमी निवृत्त शिक्षक. त्यांच्या शेतीमध्ये ते विविध प्रयोग करीत असतात. म्हाळादेवी येथील आपल्या शेतात मिरी लागवडीचा पथदर्शी प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. आपल्या शेतात केलेल्या मिरीलागवडीतून गेली तीन वर्षे त्यांना मिरी पिकाचे उत्पन्न मिळत आहे. कोकणच्या लाल मातीत येणारे मिरीचे पीक अकोल्याच्या काळ्या मातीतही येऊ शकते हे हासे यांनी सिद्ध केले आहे.
पाच वर्षांपूर्वी तत्कालीन कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व आत्माचे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली काळी मिरी लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. तालुक्यातील काही निवडक शेतकऱ्यांना काळी मिरीची दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यात आली. मिरी लागवडी संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. निवडक शेतकऱ्यांचा कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन केंद्राचा अभ्यास दौरा घडवून आणला गेला.
हासे यांनी आपल्या म्हाळादेवी येथील डोंगरकुशीत असणाऱ्या शेतात आंबा बागेत शास्त्रीय पद्धतीने मिरी रोपांची लागवड केली. हासे यांना आठ रोपे मिळाली होती. त्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली. वेळोवेळी खत, पाणी मिळाल्याने रोपांची झपाट्याने वाढ होत गेली. मिरीचे वेल आंबा, फणस झाडांवर नैसर्गिक पद्धतीने चढत गेले. बागेतील थंड वातावरण, ऊन आणि सावली असल्याने वेलांची चांगली वाढ झाल्याचे हासे यांनी सांगितले. शास्त्रोक्त पद्धतीने या रोपांचे संगोपन केल्यानंतर लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून मिरीचे उत्पादन सुरू झाले. लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी चार किलो ओली मिरी फळे मिळाले. तर गतवर्षी आठ किलो ओली फळे मिळाली. यंदा दोन वेलींनाच १० किलो ओली फळे मिळाली.
कोणतेही रासायनिक खत अथवा औषधांचा वापर न करता पूर्ण नैसर्गिक वातावरणात घेतलेले हे पीक आहे. शून्य उत्पादन खर्च असलेले, सेंद्रिय, विषमुक्त उत्पादन घेतले असल्याचे हासे यांनी सांगितले. मिरी हे कोकणातच येणारे पीक आहे, असा समज आहे. मात्र, या पिकासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती केली, तर कोकणालगतच्या डोंगर भागातील सपाटीवरही हे पीक चांगले येऊ शकते, असे हासे यांनी सांगितले.
प्रक्रिया करून सुकविल्यानंतर मिळणारी काळी मिरी चविष्ट असल्याचे हासे यांनी सांगितले. दर्जेदार व उत्कृष्ट दर्जाची मिरी अकोले तालुक्यात तयार होऊ शकते हे हासे यांनी दाखवून दिले आहे. मिरीचा भाव हजार ते बाराशे रुपये किलो असला, तरी हासे मिरी विकत नाहीत. मिरीच्या अंदाजे वीस ग्रॅमच्या पुड्या करून लोकांना ते मिरी भेट देत असतात. नातेवाईक, मित्रपरिवार, अधिकारी, पदाधिकारी यांना या भेटी दिल्या जातात. भेट मिळालेली काळी मिरी पाहून अनेकांचा ही मिरी अकोल्यात पिकविलेली आहे यावर विश्वास बसत नसल्याचे हासे यांनी सांगितले.
अकोले तालुक्यात मिरी लागवड वाढावी यासाठी हासे यांनी या वर्षी मिरी रोपांची छोटी रोपवाटिका सुरू केली आहे. रोपवाटिकेत त्यांनी पेन्नीयर जातीची २०० रोपे तयार केली होती. त्यांपैकी सुमारे दीडशे रोपे शेतकऱ्यांनी नेली. अकोल्याबरोबरच शेजारच्या संगमनेर, तसेच इगतपुरी तालुक्यातही ही रोपे पोहोचली. या वर्षी तीनशे-साडेतीनशे मिरी रोपे तयार करणार असल्याचे हासे यांनी सांगितले.
काळी मिरीची लागवड म्हटले, की केरळ नाही तर कोकणची भूमी आठवते. परंतु या मसाल्याची राणी समजल्या जाणाऱ्या काळ्या मिरीचे पीक अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील एका निवृत्त शिक्षकाने यशस्वीरीत्या घेतले आहे. अकोलेच्या मातीमध्येही मिरी रुजू शकते. अन्य पिकांसोबत जोड पीक म्हणून तिचे उत्पादन घेता येते हेच त्यांनी यातून दाखवून दिले आहे.

आपल्याकडची शेती सतत बिनभरवशाची म्हणून चर्चेत असते. अशा वेळी उत्पादन वाढ आणि खर्चात कपात करणे आवश्यक ठरते. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक बनले आहे. याअंतर्गतच आता ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाचा वापर पुढे आला आहे. या एका तंत्रज्ञानाने शेतीच्या सर्व कामांचे व्यवस्थापन तर अचूक होऊ लागले आहेच शिवाय त्यातून खर्चातही मोठी बचत होऊ लागली आहे. कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावातील उच्चशिक्षित डॉ. युगंधर राजेंद्र सरकाळे या तरुणाने याच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करत डाळिंब लागवड केली आहे.
डॉ. युगंधर याचे वडील सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे. ते स्वत: प्रयोगशील शेती आणि त्यातील नवनवीन बदलाबाबत सजग शेतकरी म्हणून परिसरात ओळखले जातात. त्यांच्या या संस्कारातच डॉ. युगंधर शेती पाहू शिकू लागले. जिज्ञासू वृत्तीने शेतीकडे पाहण्यास सुरुवात केली. त्याने अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजीनियरिंग मध्ये एम.एस. आणि २०१९ साली पीएचडी असे शिक्षण पूर्ण केले. मुळची शेतीची आवड, वडिलांनी दिलेला प्रयोगशीलतेचा धडा आणि उच्च शिक्षणामुळे त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. याअंतर्गतच ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाचा वापर पुढे आला. हे तंत्रज्ञान त्याने आपल्या शेतात वापरण्याचे ठरवले. याचा पहिला प्रयोग डाळिंबाच्या शेतीवर करण्याचे ठरले.
हा विचार डोक्यात आल्यावर त्याने शेतीकडे फक्त शेती म्हणून न पाहता नफा कमवणारा व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली. हे करताना शेतीच्या, शेतकऱ्यांच्या मूल्यांना कुठेही, कसलाही धोका पोहोचणार नाही याची त्याने जाणीवपूर्वक खबरदारी घेतली. सेंद्रिय शेतीवर त्याचा भर आहे. सामान्य शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाताना मानवी आरोग्याबरोबर मातीच्या आरोग्याची काटेकोरपणे काळजी घेण्याची त्याची मानसिकता आहे. त्यासाठी दिवस-दिवस मातीच्या ढेकळांतून, माळरानांतून फिरण्याची त्याने मनाची तयारी केली आहे.
वडिलांची शेतीची आवड यातून त्यांचे मार्गदर्शन तर होतेच. शिवाय डॉ. युगंधरने बाजारपेठ तज्ज्ञ, कृषी सल्लागार, सातारा जिल्हा बँकेमधील कर्मचारी, जागतिक पातळीवरील शेतीविषयक शास्त्रज्ञ, शेतज्ज्ञ आणि शेतकरी वर्गांचा समावेश आपल्या सहकारी, मार्गदर्शकांमध्ये केला. पीक लागवड आणि सिंचनापासून ते कीटक व्यवस्थापन आणि पर्यावरणातील बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी ए.आय. प्रणालीचा होणारा उपयोग त्यांच्या लक्षात आला. यासाठी होणारा खर्च आवाक्यामध्ये बसतो आहे का, याचे भान राखत चाचणी सुरू केली.
‘मॅप माय क्रॉप’ने उपलब्ध करून दिलेल्या ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून युगंधर याने शेती व्यवसायाला सुरुवात केली.
यामध्ये सर्वप्रथम शेतामध्ये ‘वेदर स्टेशन्स’ बसवले. त्यामुळे त्यांना रोजचे हवामान, वातावरणातील बदलाबाबतच्या सूचना आता मोबाइलवर मिळू लागल्या. येणाऱ्या काळात काही क्षेत्रात, काही विशिष्ट रोगाची, किडीची संभावना असेल तर त्याबाबत आधीच जागरूक केले जाऊ लागले. त्यासाठी कोणते औषध फवारण्याची गरज आहे याबद्दल मार्गदर्शनही होते. ‘फसल’च्या माध्यमातून ही सुविधा प्राप्त झाली. याशिवाय फवारणी दिवसाच्या कोणत्या कालावधीत करणे योग्य आहे, फवारणी करून फायदा होणार आहे किंवा नाही अशा बारकाव्यांसहित मार्गदर्शन केले जाते. यातून वेळ, पैसा आणि कष्ट या तिन्हींची बचत होऊ लागली. युगंधरने आपल्या शेतामध्ये या प्रकारचे ‘आय.ओ.टी. सेंसर’ बसवून संपूर्ण शेतात ‘एआय’ प्रणालीचा वापर केला आहे.
डॉ. युगंधर याची शेती सर्कलवाडीतील निसर्गरम्य डोंगराळ भागात आहे. आसपासची शेती अजून वापरात नसल्यामुळे भरमसाठ रासायनिक फवारण्या नाहीत. डोंगरउतारावरून आलेले पावसाचे पाणी शुद्ध स्वरूपात शेतीला मिळते आहे. पाणी साठवण्यासाठी शेततळी, विहिरी आहेत. व्यावसायिक बाजू सांभाळत असताना दीर्घायुष्य देणारी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्याकडे त्याचा विशेष कल आहे. म्हणूनच रायसायनिक ऐवजी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आग्रही आहे. हुमणी सारख्या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेणखताचा वापर पारंपरिक पद्धतीने न करता त्या खतावर आधी तीन-चार महिन्याची प्रक्रिया करून शेणखताचे रूपांतर कंपोस्ट खतामध्ये केले जाते. शेतात एका बाजूला ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते.
शेतात खत आणि पाणी वापराने मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव वाढतो. हे तण पिकाच्या वाटणीचे खत, पाणी शोषून घेते. शिवाय तणावरील कीड पिकाला मारक ठरू शकते. हे सर्व रोखण्यासाठी युगंधरने डाळिंबाच्या संपूर्ण शेतात ‘विडमॅट’चा वापर केला आहे. मातीच्या सुरक्षिततेबरोबर फळांमध्ये रासायनिक खताचा घातक अंश आढळून येत नाही हा ‘विडमॅट’चा फार मोठा फायदा आहे.
सध्य:स्थितीत ड्रॅगनफ्रुट, अवाकाडो, केळी, डाळिंब या मालाला चांगला उठाव असण्याचा हा काळ आहे. तज्ज्ञांशी चर्चा करत युगंधरने आपल्या शेतात डाळिंब लागवड करण्याचे ठरवले. तेल्यासारख्या प्रचलित रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने रोपे बनवणाऱ्या तज्ज्ञ अशा धावडे-पाटील यांच्याकडून त्यांनी चार हजार रोपे उपलब्ध करून घेतली. प्रत्येक रोपाला भरीव बांबूचा आधार दिला. बांबूचा आधार देताना ‘पिनबोरर’चा हल्ला होऊ नये अशी काळजी घेतली. ही कृती रोपाच्या पुढील वाढीसाठी आणि वाऱ्यापासून होणाऱ्या नुकसानीसाठी तारक ठरली.
रोपांची वाढ तपासत, योग्य वेळी छाटणी आणि थीनिंग केले गेले. ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक खतांचा संतुलित वापर केला. डोंगरातले प्रदूषण नसणारे नितळ पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश, भरपूर जैविक खते यातून रोपांची निकोप वाढ होऊ लागली.
फलधारणेसाठी डोंगरात असणाऱ्या मधमाश्यांमुळे नैसर्गिकरीत्या परागीकरण होईल म्हणून मग मधमाश्यांच्या पेट्याही आणल्या आहेत. मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून फळाच्या गुणवत्तेबरोबरच त्याच्या रंगरूपाचाही विचार होतो. त्यासाठी डाळिंबाच्या प्रत्येक फळाचे ऊन, पाऊस, किडीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारे बॅगिंग, क्रॉप कव्हरिंग केले जाते. उन्हाळा किंवा मृग बहारांपैकी एक बहार घेतला जातो. बरेच निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतले जातात. याकडेही डॉ. युगंधर याचा जोर आहे. पूर्णपणे शेतीवर अवलंबून नसतानाही त्याने शेतीवर केलेला अभ्यास आणि कष्ट पाहून केवळ कौतुकच नाही तर प्रचंड आश्चर्य वाटत राहते.
डाळिंबास साधारण १८ ते २० महिन्यांनंतर पहिला बहार येतो. परंतु युगंधर त्याच्या बागेचा पहिला बहार दहाव्या महिन्यात घेतो आहे. झाडांवर चांगल्या पद्धतीने फलधारणा झाली असली तरी झाडाला ते फळ पेलण्यासाठी आवश्यक असणारी मंडपाची व्यवस्थाही त्यांनी आपल्या शेतात केली आहे. शेती व्यवसायातील त्याचे हे मोठे यश मानावे लागेल. ‘एआय’ प्रणाली वापरून डाळिंब शेती करण्याबरोबरच युगंधर आपल्या शेतात इतर पिकेही घेत आहे.
पिकाची लागवड करताना ज्या रोपांची लागवड करायची ते कुठून आणायचे, त्याला निरोगी आणि सशक्त कसे बनवायचे, इथपासून युगंधर याचे बारीक लक्ष असते. लागणारी रोपे पॉलिहाऊसमधून आणायची, शेडनेटमधून आणायची, ओपन नर्सरीतून आणायची की लॅबमध्ये तयार केलेली टिश्यू कल्चरची रोपे लावायची याबाबतचा निर्णय तज्ज्ञांसोबत चर्चा करून मगच घेतला जातो. कोणत्या जातीची रोपे लावायची यासाठी संबंधित तज्ज्ञांशी चर्चा होते.
युगंधर याच्या शेतात सध्या भगवा जातीचे डाळिंब, रेड जारवी/रेड डायमंड जातीचे पेरू, जॅपनीज १५ पपई, नामधारी ऑरेंज, अंबर आणि इंडस यलो याग्ना जातींचे झेंडू, कुंदन टरबूज, ब्लॅक सुप्रीमो आणि बाहुबली जातींचे कलिंगड, इंद्रा ढोबळी मिरची, माहीम जातीचे आले, सेंट व्हाईट शेवंती, अंजीर, स्ट्रॉबेरी ही पिके जोमाने वाढत आहेत.
यातील प्रत्येक पिकासाठी विशिष्ट आकाराचे बेड बनवणे, शेताच्या बांधावर इन्सेक्ट नेट लावणे, एखाद्या पिकासाठी क्रॉप कव्हर लावायचे की नाही, लावले तर कसे लावायचे यासाठी त्याने वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले आहे. डोंगराळ भागात जंगली जनावरे येऊ नयेत म्हणून योग्य ती यंत्रणा राबवलेली आहे. शेतात शेतमालाचे नुकसान करणाऱ्या मोरांना, माकडांना हुसकावून लावण्यासाठी वाऱ्यावर तडतड आवाज करणारे यंत्र बसवलेले आहे.
फळबागांमधून फळमाशी, डंखमाशी यांना आकर्षित करणारे इन्सेक्ट ट्रॅप, चिलटांसाठी चिकट सापळे, वेगवेगळ्या किडीसाठी सोलर पंप यांचाही वापर केला आहे. गेल्या १० महिन्यांपासून युगंधर सर्कलवाडीमध्ये असणारी स्वत:ची आणि सोबत घेतलेल्या शेतकऱ्यांची अशी एकूण ३० एकरामध्ये ए.आय. तंत्रज्ञानाने शेती व्यवसाय राबवत आहे.
शेतकऱ्याकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या या शेतीतील मातीची सुपीकता वाढली पाहिजे, यातून त्यांचाही फायदा झाला पाहिजे याकडे त्याचे लक्ष असते. त्याचे अंजिराचे प्लॉट्स फळांनी लगडलेले आहेत. झेंडूचे पीक शेताचे सौंदर्य वाढवत आहे. पहिल्याच पिकात ए.आय. प्रणालीवर केलेला खर्च निघेल याबद्दल त्याला विश्वास आहे. कलिंगड, टरबूज यांची शेती अत्यंत बहरलेली आणि सशक्त आहे.
तुम्ही दरवेळी स्वत:चे शंभर टक्के दिले तरी शेती फायद्यात राहीलच असे नाही याची त्याला कल्पना आहे. मात्र ‘एआय’च्या माध्यमातून अंदाज घेत अभ्यासपूर्वक शेती केली तर किमान घातलेले पैसे वसूल होतात, असे डॉ. युगंधर याचे म्हणणे आहे.
शेतीसाठी ‘एआय’ प्रणालीच्या वापराबद्दल सरकारचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. स्वबळावर अशी शेती करण्याची तयारी असणारे शंभर शेतकरी एकत्र येऊन ‘अॅग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी’ स्थापन करू शकतात. शेतीचे क्षेत्र आणि उत्पादन वाढल्यामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानावर झालेला खर्च विभागला जाऊन शेती फायद्यात राहते. एकीच्या बळावर व्यापाऱ्यांशी संपर्क साधून शेतकरी आपल्या मालाला योग्य तो भाव मिळवून देऊ शकतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती समोरील पारंपरिक आव्हानांना सामोरे जाताना ‘एआय’ तंत्रज्ञान शाश्वत ठरणार असून यासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. – डॉ. युगंधर सरकाळे

दुबई: एप्रिलमधील पाच दिवसांच्या व्यापारात आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत जवळपास १५ टक्के घट झाली असून, सोमवारी ब्रेंट क्रूडचे व्यवहार पिंपामागे ६३ डॉलरपेक्षा थोडे जास्त पातळीवर सुरू होते. गेल्या वर्षी याच काळात पिंपामागे ९० डॉलरवर गेलेल्या किमतीच्या तुलनेत सध्याची घसरण जवळजवळ ३० टक्क्यांच्या घरात जाणारी आहे.
अमेरिकेने ट्रम्पनीतितून आयात करात केेलेल्या वाढीने जगभरात उडवून दिलेल्या अनिश्चिततेच्या धुरळ्यातून तेलाच्या किमती तीव्रपणे घसरल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलेल्या करवाढीचा जागतिक व्यापारावर नकारात्मक परिणामांतून खनिज तेलाच्या बाजारपेठेला अतिरिक्त अस्थिरतेचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.
सौदी अरेबिया आणि आखातातील तेल उत्पादकांसह, इतर देशांसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्याच्या किमती ६० डॉलरच्या जवळ जाणे हे त्यांच्यासाठी तोट्याच्या ठरतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यापासून बचावासाठी बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ने संयुक्तपणे तेल आयातीवर १० टक्के शुल्क लादले आहे.
आखाती देशांच्या उपाययोजना आणि इतर देशांकडून अमेरिकेला प्रत्युत्तरादाखल स्वीकारल्या जाणाऱ्या अपेक्षित योजनांमुळे, आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिरतेला बाधा येण्यासह आणि तेलाची मागणीही कमी होऊ शकते, असे पीडब्ल्यूसीने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात, तेल निर्यातदारांच्या ‘ओपेक प्लस’ गटाचे सदस्य असलेल्या अल्जेरिया, इराक, कझाकस्तान, कुवेत, ओमान, रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींनी तेल उत्पादनास गती देण्यास सहमती दर्शविली. २०२२ नंतर या गटाने प्रथमच तेल उत्पादन वाढविण्याचे ठरविले, ज्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीत लक्षणीय घसरताना दिसून आल्या.




मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहून, फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील ६५ महिलांच्या नावावर २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आरोपींमध्ये मानखुर्द परिसरातील एका महिलेसह चार ते पाच जणांचा समावेश असून, या प्रकरणात वित्त कंपनीतील दोन कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्य सरकारने गतवर्षी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. मात्र कागदपत्रांमधील त्रुटींमुळे काही महिलांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्याचाच फायदा घेत या महिलांची फसवणूक करण्यात आली.
या महिलांना कोणतीही माहिती न देता खासगी वित्तसंस्थांकडून परस्पर कर्ज देऊन कंपनीमार्फत महागडे आयफोन खरेदी करण्यात आले. संबंधित महिलांना कुर्ला आणि अंधेरी येथील दुकानात नेऊन मोबाइलसह त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून हे मोबाइल काढून घेण्यात आले.
महिलांना २ ते ५ हजारांवर बोळवण करण्यात आली. त्यांना लाडकी बहीण योजनेचा हा पहिला हप्ता असल्याचे सांगण्यात आले. तसेच पुढील हप्ता बँक खात्यात जमा होईल, अशी समजूत घालण्यात आली. मात्र ही रक्कम कर्ज असल्याची काहीही कल्पना या महिलांना नव्हती. मात्र या ६५ महिला अनेक महिन्यांपासून हप्ता भरत नसल्याची बाब कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात आली. त्याने मानखुर्द परिसरात जाऊन या महिलांची भेट घेतली. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
सध्या आमच्याकडे ६५ जणांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. मात्र ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. – मधू घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानखुर्द
