



how much sleep do you need to control cholesterol and diabetes: “लवकर नीजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य-धनसंपदा लाभे”, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजेच जे लोक रात्री लवकर झोपतात व सकाळी लवकर उठतात, त्यांना चांगले आरोग्य आणि संपत्ती मिळते. झोप तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य वेळी पुरेशी झोप मिळणे अन्न आणि पाण्याइतकीच जगण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित ठेवायचं असेल तर तुम्हाला किती तासाची झोप घ्यायला हवी, माहिती आहे का? याविषयीचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे, त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
खरंतर कामाचे तास, वाढत्या ताणतणावाची पातळी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे झोपेच्या अनियमित पद्धती उद्भवू शकतात. यामुळे केवळ तुमच्या दैनंदिन दिनचर्येतच व्यत्यय येतो असे नाही, तर तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहसारख्या जीवनशैलीच्या परिस्थिती उद्भवू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढू शकतो.
झोप आपल्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने करण्यास मदत करते. झोपेच्या वेळी मेलाटोनिन नावाचे संप्रेरक शरीराला आराम देते, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कमी होतात. निद्रानाशामुळे तुमचे शरीर असामान्यपणे कार्य करू शकते. पुढील दिवशी तुमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. हे तुमच्या मेंदूला थकवते, ज्यामुळे शरीराच्या नैसर्गिक कार्यावर परिणाम होतो.
२००९ च्या “झोपेची समस्या” नावाच्या एका अभ्यासात असे आढळून आले की, सहा तासांपेक्षा कमी झोपलेल्या पुरुषांमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉल जास्त होते. याव्यतिरिक्त, जवळजवळ समान प्रमाणात झोपलेल्या महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आता या अभ्यासावरून हे स्पष्ट होते की, झोपेचा पुरुष आणि महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो.
लठ्ठ लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते यात शंका नाही. तसेच २०२० मध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी कॉग्निटिव्ह अँड ब्रेन सायन्सेस, अकादमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्स, बीजिंग यांच्या संशोधनातून असे दिसून आले की, झोपेच्या कमतरतेमुळे सीरम कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि यकृतामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, झोपेच्या अनियमित पद्धतीमुळे शरीराची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू शकते. डायबिटीज केअरमधील २००९ च्या अहवालात असे आढळून आले की, वारंवार निद्रानाश असलेल्या लोकांना टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.
अमेरिकन अकादमी ऑफ स्लीप मेडिसिन आणि स्लीप रिसर्च सोसायटीने शिफारस केली आहे की, प्रौढांनी दररोज किमान सात ते आठ तास झोपावे. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे म्हणजे अधिक फोन, टिव्ही पाहणे आणि खाणे, यामुळे बर्याचदा कार्ब आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले जंक फूड खाल्ले जातात. हे सर्व टाइप २ मधुमेहाचा धोका आणि लठ्ठपणा वाढवते.



Who is 26/11 terrorist attack mastermind Tahawwur Rana : भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईवर झालेल्या 26/11 या भ्याड दहशतवादी हल्ल्यामागचा खरा सूत्रधार तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भारतात त्याला थेट मुंबईत आणणार की दिल्लीतील कारागृहात ठेवणार याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर राणाला तताडीनं एनआयएकडे सोपवलं जाणार आहे. ज्यानंतर पुढील काही आठवडे एनआयए कोठडीत त्याची चौकशी केली जाईल.
बीबीसीच्या वृत्तानुसार तहव्वूर हुसैन राणा याचा जन्म पाकिस्तानात झाला आणि तिथंच तो लहानाचा मोठा झाला. पुढे वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्करातील वैद्यकीय विभागात डॉक्टर पजावर सेवेत रुजू झाला. 1997 मध्ये राणा त्याच्या पत्नीसह कॅनडाला गेला आणि 2001 मध्ये त्या दोघांनी कॅनडाचं नागरिकत्वं स्वीकारलं.
पुढे शिकागोमध्ये स्थायिक होत त्यानं तिथं इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली होती. इथंच त्याची भेट डेविड कोलमॅन हेडली याच्याशी झाली. याच हेडलीनं मुंबईतील हल्ल्यात षडयंत्र रचल्याचंही म्हटलं गेलं.
26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर 10 दहशतवाद्यांनी हल्ला करत 174 निष्पापांचा बळी घेतला होता. ज्यानंतर भारतानं सातत्यानं या हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानात रचला गेल्याचा गंभीर आरोप करत त्या हल्ल्यात सक्रिय असणारे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याचं म्हटलं गेलं. सदर प्रकरणात अजमल कसाब या दहशतवाद्याला 2012 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
तिथं भारतीय यंत्रणांच्या वतीनं डेविड हेडलीच्या चौकशीदरम्यान एक नाव सातत्यानं समोर आलं होतं आणि हे नाव होतं तहव्वूर हुसैन राणा. शिकागोमध्ये सुरू असणाऱ्या खटल्यादरम्यान राणाविरोधातील बरीच माहिती समोर आली. खटला त्या क्षणी फिरला जेव्हा हेडलीनं सरकारच्या बाजूनं साक्ष देत न्यायव्यवस्थेपुढं राणाविरोधातील पुरावे सादर केले, जिथं राणानंच हेडलीची मदत केल्याचं वास्तव समोर आलं होतं.
हेडली 2006 ते 2008 दरम्यान अनेकदा मुंबईत आला आणि त्यानं मुंबईतील अनेक भागांची रेकी केल्याचं तपासातून समोर आलं. ज्यासाठी राणानं आपल्या एजन्सीच्याच माध्यमातून शहरात एक ऑफिस सुरू केलं. हेडलीला बिझनेस व्हिसा मिळवून देण्यासाठीच ही कटकारस्थानं केली जात होती.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मुंबई हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता. याच प्रकरणी अमेरिकन नागरिकांना मारण्यासाठी मदत करण्यासोबत इतर 12 आरोपांमध्ये तहव्वूर राणाला शिक्षा सुनावत FBI या अमेरिकन तपास यंत्रणेनं ऑक्टोबर 2009 मध्ये तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांनाही शिकागो विमानतळावर पकडलं होतं. या दोघांच्या चौकशीदरम्यान मुंबई हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची पहिल्यांदा माहिती समोर आली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपाला धारेवर धरलं. मोदी सरकारच्या कमकुवत आणि अपयशी परराष्ट्र धोरणावर काँग्रेसने टीका केली आहे. पक्षाचे अमेरिकेशी घनिष्ठ संबंध असूनही अमेरिकेने २७ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या परकीय व्यापारावर गंभीर परिणाम होणार आहेत असं अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी)च्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या मसुद्यात म्हटलं आहे. सध्या चर्चा सुरू असलेल्या आणि बुधवारी एआयसीसी अधिवेशनात सादर केल्या जाणाऱ्या मसुद्यात काँग्रेसनं म्हटलं आहे, “राष्ट्रहिताच्या बदल्यात कधीही चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत”.
आमचे सरकार दूरदर्शी होते…
दरम्यान, एआयसीसी अधिवेशनात सादर करण्यापूर्वी मसुद्यात बदल केले जाऊ शकतात, असं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निदर्शनास आणून दिलं. या मसुद्यात म्हटलं आहे, “पंतप्रधानांच्या वॉशिंग्टन डीसी भेटीदरम्यान, पंतप्रधानांच्या उपस्थितीतच आमचा अपमान केला गेला आणि आपल्या देशावर जकात कराचा दुरुपयोग करणारा देश, असा ठपका ठेवला गेला. भारतीय स्थलांतरितांना प्राण्यांसारखी वागणूक दिली. त्यांना बेड्या घालून अमेरिकेतून हद्दपार केले गेले. दुर्दैवाने परराष्ट्र मंत्र्यांनीही स्थलांतरितांना दिलेल्या अमानुष वागणुकीचे संसदेत समर्थनही केले. तसेच अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेल्या २७ टक्के करामुळे भारताच्या परकीय व्यापारावर गंभीर परिणाम होईल.” “दुसरीकडे अमेरिका त्यांच्या देशातील वस्तूंवर आयात शुल्क कमी करण्यासाठी दबाव टाकत आहे. त्यामध्ये शेती, अल्कोहोलिक पेय, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती यांसारख्या क्षेत्रातील उत्पादनांचा समावेश आहे. त्यामुळे फक्त शेतकऱ्यांनाच नाही, तर देशांतर्गत ऑटोमोबाईल आणि औषधनिर्माण उद्योगालाही मोठा फटका बसेल”, असंही यामध्ये म्हटलं आहे. यावेळी “भूतकाळातील सरकारनं भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढवली आणि तत्त्वनिष्ठ, तसेच दूरदर्शी परराष्ट्र धोरणांद्वारे देशाचं नेतृत्व जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे”, असा दावा काँग्रेसनं केला आहे.
काँग्रेस सरकारचं परराष्ट्र धोरण कायम भारताच्या हिताचंच होते. तसेच जागतिक संतुलन, परस्पर सौहार्द, संवादातून तोडगा काढणं, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि वादग्रस्त परिस्थितीतून शांततेनं मार्ग काढणं यांवर काँग्रेस सरकारनं लक्ष दिलं होतं, असंही या मसुद्यात म्हटलं आहे.
वैयक्तिक ब्रँडिंग केलं…
“दुर्दैवानं सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी वैयक्तिक ब्रँडिंग आणि स्वहित साधण्यासाठी भारताच्या परराष्ट्र धोरणाशी तडजोड केली आहे. आपल्या शेजारच्या देशात परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. चीननं लडाखच्या पूर्व भागातील जवळपास २००० चौ.किमी इतका भारतीय भूभाग बेकायदा बळकावला आहे. तरीही पंतप्रधानांकडून अतोनात प्रयत्न करण्यात येऊनही सध्याचे भाजपा सरकार अगोदरची स्थिती पूर्ववत करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे”, असंही यामध्ये म्हटलं आहे. “ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठ्या धरणाचं बांधकाम करणार असल्याचं चीननं सांगितलं. आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांसाठी हा एक चिंताजनक विकास ठरू शकतो”, असं काँग्रेसच्या मसुद्यात म्हटलं आहे.
“पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षात मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट झाले आणि हजारो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. अशा घडामोडींवर मौन बाळगणं हे राजनैतिक तत्त्वांचं उल्लंघन आहे”, असं या मसुद्यात सांगण्यात आलं आहे. “सध्याच्या भाजपा सरकारनं परराष्ट्र धोरणासाठीचं कमकुवत नेतृत्व आणि असहाय म्हणून शरण जाणं हे अस्वीकार्य आहे,” असंही त्यात म्हटलं आहे.

Chewing Gum Side Effects : अनेकांना च्युइंगम चघळण्याची सवय असते. कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेकांमध्ये ही सवय पाहायला मिळते. यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होत ताजा श्वास घेता येतो तसेच एकाग्रता वाढते. पण, लॉस एंजेलिसमधील (UCLA) च्या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका संशोधनातून असे दिसून आले की, चघळत असलेल्या प्रत्येक च्युइंगमच्या तुकड्यातून नकळत तुम्ही हजारो लहान प्लास्टिकचे तुकडे गिळत आहात. हे मायक्रोप्लास्टिक्स शरीरात जाऊन तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतात.
पूर्वी झाडाच्या रसापासून तयार केले जाणारे मूळ च्युइंगम मिळायचे, पण आता मिळणारे च्युइंगम हे जवळपास प्लास्टिकचे आहेत. यात आजकाल बहुतेक च्युइंग गममध्ये पॉलिथिलीन आणि पॉलीव्हिनिल एसीटेटसारखे सिंथेटिक पॉलिमर असते, जे बहुतेकदा प्लास्टिकच्या पिशव्या आणि गममध्ये वापरले जाते. तुम्ही च्युंइगम चघळता तेव्हा घर्षण आणि लाळेमुळे त्यात मिसळलेल्या फ्लेवर्सचे विघटन होते, ज्यानंतर त्यातील हजारो लहान प्लास्टिकचे कण तुमच्या तोंडात जातात. हे कण लाळेत मिसळतात आणि शरीराद्वारे गिळले जातात किंवा शोषले जातात, असे गुरुग्राम येथील आर्टेमिस हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी आणि सायबरनाइफचे संचालक डॉ. आदित्य गुप्ता म्हणाले.
जरी सध्या च्युइंगममधील प्लास्टिक कणांवर तितकेसे संशोधन झाले नसले तरी मायक्रो प्लास्टिकच्या संपर्कात आल्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, मायक्रो प्लास्टिक आपल्या शरीरात गेल्यास मेंदूच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. मायक्रो प्लास्टिक आतड्याच्या अस्तर तसेच काहीवेळा रक्तवाहिन्या आणि मेंदूतील अवयवांमध्ये अडथळा निर्माण करते. तसेच मज्जासंस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होण्याचीदेखील शक्यता असते.
आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, प्रत्येक एक ग्रॅम च्युंइगममधून १०० मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडते. काही च्युंइगमच्या प्रति एक ग्रॅममधून ६०० मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडते. म्हणजे जर च्युंइगमचा तुकडा मोठा असेल तर त्यातून १,००० पेक्षा जास्त मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडू शकते, जे आपण अनेकदा गिळतो, त्यामुळे ही चिंताजनक बाब आहे.
मायक्रोप्लास्टिक्समध्ये शरीरात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करण्याची क्षमता असते, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत जळजळ जाणवू शकते. तसेच मेंदूमध्ये त्रास जाणवू शकतो, अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो. मायक्रोप्लास्टिक्सच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडेटिव्ह ताणदेखील वाढू शकतो, ही प्रक्रिया मज्जातंतूंच्या पेशींना हानी पोहोचवते आणि मेंदूचे वृद्धत्व वाढवते. कालांतराने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे न्यूरोलॉजिकल आजार वाढू शकतात.
काही च्युंइगममधील मायक्रोप्लास्टिक हे मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. याचा मूड, आकलनशक्ती आणि अगदी स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. च्युंइगममधून निघणारे मायक्रोप्लास्टिकचे दीर्घकालीन परिणाम सर्वांनाच माहीत असतील तर त्याच्या सततच्या वापराने मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो.
मज्जासंस्था हा खूप संवेदनशील भाग मानला जातो, ज्याच्यावर बाहेरील गोष्टींचा लवकर परिणाम होतो. प्राण्यांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात आल्याने आकलनशक्ती, स्मरणशक्ती आणि मोटर कौशल्यांवर परिणाम होऊ शकतो. मानवी संशोधनात प्रगती होत असली तरी संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे, विशेषतः ज्यांना सतत च्युंइगम चघळण्याची सवय आहे.
च्युंइगममुळे शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात हे ओळखण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे, पण प्लास्टिक-आधारित च्युइंगमचा वापर कमी करणे ही एक चांगली कल्पना असू शकते.
वनस्पतींच्या रेझिन, चिकलपासून बनवलेल्या नैसर्गिक च्युंइगमचा वापर करा, यामुळे मायक्रोप्लास्टिकच्या कमी संपर्कात याल.


पुणे | आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी वारी पूर्वतयारीचा आढावा घेत स्पष्ट आदेश दिला की, पालखी मार्गावरील रस्ते आणि पालखीतळ दुरुस्तीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत मंत्री गोरे बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जयकुमार गोरे यांनी केलेले महत्त्वाचे निर्देश –
ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्यात येईल अशी ग्वाही देत, वारीदरम्यान आरोग्य, पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही मंत्री गोरे यांनी सांगितले.
स्वच्छ व सुरक्षित वारीसाठी समन्वयाचे आवाहन :
विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी वारीतील सुविधा आणि नियोजन यावर माहिती दिली. त्यांनी टँकर वेळेत पोहोचतील याची खबरदारी घेण्याचे आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे निर्देश दिले.
वारकऱ्यांचा आषाढी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. आता खरी कसोटी आहे ती नियोजन वेळेत प्रत्यक्षात उतरण्याची.