


नागपूर : टिपेश्वर अभयारण्यातून आतापर्यंत अनेक वाघांनी स्थलांतर केले. केवळ स्थलांतरच नाही तर लांब अंतराच्या स्थलांतरणामुळे त्याचे ‘रेकॉर्ड’ देखील नोंदवले गेले. याच अभयारण्यात काहीही दोष नसताना १४ माणसाच्या मृत्यूचा ठपका ठेवून ‘अवनी’ या वाघिणीला ठार करण्यात आले. आता याच अभयारण्याने आणखी एक नवी नोंद केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पहिल्यांदाच रानगव्याची वैज्ञानिक नोंद करण्यात आली. अलीकडच्या काही वर्षात या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढली. त्यानंतर आता पहिल्यांदाच रानगव्याची नोंद या अभयारण्यात करण्यात आली. नागपुरपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावरील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला, त्यावेळी वाघांची संख्या थोडीथोडकीच होती. मात्र, उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या अभयारण्यात अलीकडच्या काही वर्षात वाघांची संख्या चांगलीच वाढली. तुलनेने अधिवास कमी पडत असल्याने वाघ येथून स्थलांतर करत असल्याचे देखील समोर आले आहे. आता रानगव्याच्या नोंदीने पुन्हा एकदा हे अभयारण्य चर्चेत आले आहे. टिपेश्वरमध्ये वैज्ञानिकरित्या पहिल्यांदाच रानगव्याची नोंद करण्यात आली. यापूर्वी १९८५ मध्ये व त्यानंतर २००२-०३ मध्ये रानगवा दिसल्याची चर्चा होती.
मात्र, त्याची कोणतीही वैज्ञानिक नोंद झाली नाही किंवा त्याचे छायाचित्रदेखील मिळाले नाही. मे २०२० मध्ये करोनाकाळात खुनी नदीजवळील डोंगरगावच्या शेतात रानगवासदृश्य प्राणी दिसला, पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही. ११ एप्रिलला टिपेश्वर अभयारण्याच्या कक्ष क्र. ११० मध्ये काही पर्यटकांनी रानगवा पाहिल्याचे सांगितले. त्याचे छायाचित्र घेण्यात देखील यश आले. दरम्यान, हा रानगवा महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प किंवा तेलंगणातील कावल व्याघ्रप्रकल्पातून आला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण यापूर्वी वाघांमुळे या दोन्ही व्याघ्रप्रकल्पाचा संबंध टिपेश्वर अभयारण्यासोबत आला आहे. त्यामुळे त्याच कॉरिडॉरचा वापर रानगव्याने केला असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
गेल्या काही वर्षात व्याघ्रसंवर्धनाच्या अनुषंगाने टिपेश्वर अभयारण्यात उत्कृष्ट व्यवस्थापन दिसून येत आहे. विशेषकरुन गवती कुरणे आणि पाण्याच्या व्यवस्थापनात या अभयारण्यात चांगले काम होत आहे. वन्यप्राणी अशाच चांगल्या अधिवासाच्या शोधात स्थलांतर करतात. त्यामुळे टिपेश्वर अभयाण्याच्या दृष्टीने ही एक चांगली उपलब्धी आहे.


Saif Ali Khan Attacker : अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सैफच्या घरात घुसलेला या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी ३० हजार रुपये चोरायचे होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यांने पोलिसांना सांगितले की तो फक्त भारतीय पासपोर्ट मिळवण्याच्या उद्देशाने भारतात आला होता. त्याने सांगितले की, बांगलादेशी नागरिकांच्या तुलनेत भारतीय नागरिक म्हणून परदेशातील वर्क व्हिसा मिळवणे सोपे जाते. त्याला आधी आधार आणि पॅन कार्ड मिळवायचे होते आणि त्यानंतर तो पासपोर्टसाठी अर्ज करणार होता.
१६ जानेवारी रोजी वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात दरोड्याच्या प्रयत्नात झाला होता, यावेळी सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला होता. जखमांमधून रक्त वाहत असताना त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ५ दिवसांनी त्याला घरी सोडण्यात आले. या प्रकरणी हाल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी ठाणे येथून शहजाद याला अटक करण्यात आले.
शहजाद याने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशातील झालकाठी जिल्ह्यातील रहिवासी असून सैफवर हल्ला झाला त्याच्या आठ महिन्यांपूर्वी तो बेकायदेशीर पद्धतीने भारतात आला होता. तो १५ दिवस कोलकाता येथे राहिला त्यानंतर गितांजली एक्सप्रेसने प्रवास करून तो मुंबईला आला.
तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करू लागला आणि १५ जानेवारीच्या दिवशी त्याने सुट्टी घेतली. “मला बरे वाटत नव्हतं आणि मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवून घ्यायचे होते,” असे त्याने सांगितले. यासह त्याने आपण कोणाशीतरी बोलला आहोत ज्याने बनावट कागदपत्रांसाठी ३० हजार रूपयांची मागणी केली, असेही सांगितले होते. शहजादने पोलिसांना सांगितले की त्याने कागदपत्रे बनवण्यासाठी लहानशी चोरी करण्याची योजना आखली होती.
शहजाद याने पोलिसांना सांगितलं की, तो सैफ अली खान राहतो त्या इमारतीला लागून असलेल्या इमारतीच्या छतावर गेला. तेथून त्याने सैफच्या इमारतीच्या परिसरात उडी मारली. त्यानंतर इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या पायऱ्यांवरून तो वर गेला, तेथे त्याला सुरक्षा जाळी आढळली. त्यानंतर त्याने कटर वापरून एअर कंडिशनिंग डक्टमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर तो बाथरूममधून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला.
जेव्हा तो घरात शिरला तेव्हा घाबरलेल्या आयाने त्याला काय हवे आहे असे विचारले. शहजादने १ कोटी रुपयांची मागणी केली. यावेळी सैफ अली खानने खोलीत प्रवेश केला आणि त्याला पकडले. “मी पळून जाण्यासाठी त्याच्यावर चाकूने वार केले. त्याच्या पाठीवर आणि हातावर वार केले. नंतर त्याची पकड सैल झाली. त्याने मला खोलीत ढकलले आणि दार बंद केले. पण मी खिडकीतून पळून गेलो आणि पाईप वरून खाली उतरलो. मी खाली कपडे बदलले आणि बस स्टॉपवर पळून गेलो आणि तिथेच झोपलो. नंतर मी वांद्रे स्टेशनला गेलो,” असे शहजादने सांगितल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

Dr. Ambedkar Jayanti 2025 : असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar’s 134st birthday) यांच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा..


पुणे : ‘घरांमधून, वास्तूंमधून माणसांच्या संस्कृतीचा इतिहास कळतो. त्या-त्या काळचा इतिहास हा त्या काळच्या वास्तूंमध्ये प्रतिबिंबित होत असतो. त्यामुळे माणसाच्या परंपरा वास्तूमध्येही उतरतात. माणसाच्या श्रद्धा, परंपरा, संस्कृती समजण्यासाठी वास्तू न्याहाळण्याचे कसब आत्मसात करणे गरजेचे आहे,’ असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध वास्तुरचनाकार नरेंद्र डेंगळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्रातील वास्तुकला : परंपरा आणि वाटचाल’ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मोरे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक-अभ्यासक डॉ. रमेश वरखेडे, प्रमोद काळे, नितीन हडप, ग्रंथाचे संपादक नरेंद्र डेंगळे, सहसंपादक मीनल सगरे, चेतन सहस्रबुद्धे आणि पुष्कर सोहोनी या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात पुस्तकाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्य़ात आले होते.
मोरे म्हणाले, ‘निवारा ही माणसांची आदीम प्रेरणा आहे. निवाऱ्यासाठी वास्तू बांधली जाते, घडवली जाते. वास्तू घडताना माणसाच्या मूलभूत धारणा, संकल्पना, प्रतीके, मिथके इत्यादी प्रेरणा त्या वास्तुरचनेवर परिणाम करतात. त्यामुळे वास्तू ही त्या समाजाचा ऐतिहासिक वारसाही असते.’
‘वास्तूमध्ये माणसाच्या वैचारिक प्रवाहांबरोबरच त्याच्या गरजाही दिसत असतात. वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांनी सिद्ध होत असते. मूलभूत धारणांना ओलांडून वास्तूकडे पाहावे लागते. माणसाचे विचार, भौगोलिक स्थानिकता, तत्त्वज्ञान-विचार प्रवाहांना वास्तूू सामावून घेत असते. या पुस्तकात वास्तुरचनेचा, वास्तुकलेचा सर्वांगाने आढावा घेण्यात आला आहे. वास्तूकडे पाहण्याची सर्वसमावेशक दृष्टी यातून नक्कीच मिळेल,’ असे मत वरखेडे यांनी व्यक्त केले.
डेंगळे म्हणाले, ‘शाश्वत विकासाची कल्पना ही पूर्वीपासूनच आपल्या परंपरेत आहे. वास्तुकलेतही ही संकल्पना सहज आढळते. अनेक जून्या वास्तू आजही टिकून आहेत. तोडून टाकणे, उद्ध्वस्त करणे सहज सोपे असते. मात्र, निर्मितीसाठी कष्टाची आवश्यकता असते. त्यामुळे पुनर्विकासामध्ये शाश्वततेचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.’

Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून खळखळून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून अश्रु थांबत नाही. काही व्हिडीओ असे असतात जे आपल्याला प्रेरणा देतात, नवीन काहीतरी शिकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पोलीस अधिकारी बनला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
दरवर्षी हजारो मुले स्पर्धा परिक्षेला बसतात त्यातील काही ठराविकच विद्यार्थी उत्तीर्ण होतात. काही पोलीस अधिकारी बनतात आणि आपले स्वप्न पूर्ण करतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण पोलीस उपअधीक्षक बनला आहे. सर्व जण उत्साहाने त्याने मिळवलेले यश साजरे करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण त्याच्या मित्राला मिठी मारून ढसा ढसा रडताना दिसतो. मेहनतीचे फळ मिळाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. त्याचे मित्रमंडळ मिरवणूक काढतात. त्याला गुलालाने माखतात, त्याच्या गळ्यात हार घालतात. या क्षणी पोलीस उपअधीक्षक झालेला तरुण मात्र भावुक होताना दिसतो. या व्हिडीओवर लिहिलेय, “सात वर्षाचा संघर्ष आज संपला. २९ मेन्स, सात मुलाखती अन् शेवटी घेतली ड्रिम पोस्ट DYSP. भावासाठी एक लाइक”
mpsc_studentt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “संघर्ष रडवतो पण एक दिवस नक्की घडवतो” तर एका युजरने लिहिलेय, “बापाला दिलेला शब्द पूर्ण करायचं … मग त्यासाठी जीव गेला तरी चालेल…” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ सलाम. हे तुझ्या या जिद्दीला. खरंच यार इतके वर्ष आणि इतके वेळेस यश मिळाले नाही तरी धीर नाही सोडला. शेवटी देवाने पण हार मानली भाऊ तुझ्या पुढे. ते म्हणतात ना संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. शेवटी भावाने त्याचे स्वप्न पूर्ण केलं…खरंच मनापासून अभिनंदन भाऊ तुला.” एक युजर लिहितो, “जिंकलास भावा..” तर एक युजर लिहितो, “भावा तुझी मेहनत,कष्ट आणि चिकाटी होती” अनेक युजर्सनी या तरुणाचे अभिनंदन केले आहे.
