




नागपूर : मध्यप्रदेशातून आईवडिलांसह कामाच्या शोधात नागपुरात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींनी दोन युवकांसह पलायन केले. चौघांनी कर्नाटकमध्ये पळून जाऊन संसार थाटला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कपीलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोन्ही युवकांचे समूपदेशन करुन पालकांच्या ताब्यात दिले. गेल्या ११ फेब्रुवारी २०२५ चे सायंकाळी कोराडी हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीची १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी व तिची १६ वर्षाची मैत्रीण या दोघीही बाजार आणण्याकरिता कपीलनगर हद्दीतील खसाळा बाजारात गेल्या होत्या. रात्र झाली तरी त्या घरी परत आल्या नाही. त्यांचा शोध घेतला असता सापडल्या नाही. त्यांना कोणीतरी अज्ञात आरोपीने फुस लावून पळवून नेल्याच्या तक्रारीवरून कपीलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी माहितीवरून तांत्रिक तपास केला. शहरातील मुख्य मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासल्या वर त्या बसने बाहेरगावी गेल्याचे निदर्शनास आले. त्यांचा शोध घेतला असता सुरवातीला त्या हैदराबाद आणि तेथून त्या बंगळुरू येथे गेल्याचे निदर्शनास आले.
तपास पथकाचे अधिकारी त्यांना बंगळुरू येथून ताब्यात घेण्यासाठी जाणारच होते तर त्यांना त्या दोन्ही मुली नागपुरला येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रेल्वेस्टेशनवर पाळत ठेवून दोन मुली आणि दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांची सविस्तर चौकशी केली असता त्या पैसे कमविण्यासाठी बंगळुरूला गेल्याचे समोर आले. त्यांना या कामात त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांनी मदत केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्या चौघांचे समुपदेशन केले. दोन्ही मुली व दोन संशयीत मुलांना पुढील कारवाईसाठी कपीलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही संपूर्ण कारवाई महिला पोलीस निरीक्षक ललीता तोडासे यांनी सहायक फौजदार गजेंद्रसिंग ठाकूर, पोलीस हवालदार राम निरगुडवार, पोलीस अंमलदार ऋषीकेश डुमरे, विलास चिंचुलकर, नरेश शिंगणे, महिला पोलीस अंमलदार अश्विनी खोडपेवार व पल्लवी वंजारी यांनी पार पाडली.

How Patanjali Organic Farming empowering farmers : दररोज सकाळी, ग्रामीण भारतातील शेतकरी एका नवीन आशेने शेतात जातात. पण आजच्या काळात रासायनिक शेतीमुळे त्याचे जीवन आणखी कठीण झाले आहे. माती पूर्वीसारखी सुपीक नाही, पिकेही कमकुवत होऊ लागली आहेत आणि आर्थिक टंचाई देखील आहे. अशा वेळी, पतंजली शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशेचा किरण म्हणून उदयास आली आहे. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन, ते केवळ मातीचे पुनरुज्जीवन करत नाही तर शेतकऱ्यांचे जीवन देखील बदलत आहे. आता शेतकरी केवळ शेतात कष्ट करत नाहीत तर एका समृद्ध उद्याकडे वाटचाल करत आहेत.
हो, पण तुम्हाला माहिती आहे का की पतंजली सेंद्रिय शेती मातीचे आरोग्य सुधारण्यात आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावत आहे?
पतंजली सेंद्रिय शेतीचा मुख्य उद्देश रासायनिक शेतीमुळे होणारे नुकसान कमी करणे आणि नैसर्गिक पद्धतींनी शेतीला प्रोत्साहन देणे आहे. हे मातीची सुपीकता पुनरुज्जीवित करण्यावर आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करते. संशोधनावर आधारित अहवालांवरून असे दिसून येते की, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या दीर्घकालीन आणि अतिरेकी वापरामुळे मातीची ताकद कमी झाली आहे, परिणामी पीक उत्पादनात घट झाली आहे आणि पर्यावरणाला हानी पोहोचली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, पतंजलीने सेंद्रिय शेतीचा अवलंब केला, जी माती आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पतंजली करत असलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना योग्य प्रशिक्षण देणे. पतंजलीचा ‘किसान समृद्धी कार्यक्रम’ शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या सोप्या आणि फायदेशीर पद्धती शिकवतो. यामुळे शेतकरी कमी रसायनांचा वापर करतात, मातीचे आरोग्य सुधारते आणि पिके देखील निरोगी आणि चांगली होतात. यासोबतच, पतंजली शेतकऱ्यांना पाणी वाचवण्याचे मार्ग आणि दीर्घकाळात फायदेशीर असलेल्या शेतीबद्दल माहिती देते. यामुळे शेतीत सुधारणा तर होतेच, शिवाय पर्यावरणाचे रक्षण होते आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदे मिळतात.
पतंजली शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रामाणिक आणि योग्य व्यवसाय पद्धतींचा अवलंब करते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सेंद्रिय उत्पादनांना योग्य किंमत मिळेल याची खात्री होते, जेणेकरून त्यांचे उत्पन्न वाढेल. कंपनी शेतकऱ्यांना चांगले बियाणे, सेंद्रिय खते आणि नैसर्गिक कीटकनाशके देखील पुरवते, जेणेकरून त्यांचे पीक चांगले होईल आणि बाजारात चांगल्या किमतीत विकले जाईल. याशिवाय, पतंजली शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडत आहे जेणेकरून त्यांना नवीन बाजारपेठांबद्दल माहिती मिळत राहील.
याशिवाय, पतंजली कंत्राटी शेती देखील करते. यामध्ये शेतकरी कोरफड, तुळशी आणि मोगरा सारखी विशेष पिके घेतात आणि पतंजली ही पिके खरेदी करते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी निश्चित बाजारपेठ मिळते. या सर्वांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि ते रासायनिक शेतीचे धोके टाळतात. सेंद्रिय पिके बाजारात चांगल्या किमतीत विकली जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि ते त्यांच्या कुटुंबाला चांगले जीवन जगू शकतात.
(This article is part of IndiaDotCom Pvt Ltd’s consumer connect initiative, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)

Love Story : प्रेमात ना वय पाहिलं जातं ना रंग, प्रेम कुठल्या वयात कुठल्याही क्षणी होऊ शकतं. गेल्या काही वर्षांमध्ये प्रेमाचे अनेक विचित्र प्रेम कहाणी किंवा घटना पाहिल्या आहेत की आपल्याला धक्काच बसतो. अलिगढचे सासू जावयाचं प्रेम, काका आणि भाची, मामी आणि भाचा अशा प्रेम प्रकरणामुळे समाजात प्रेमाची विचित्र घटनांमध्ये अनेकांना धक्का बसलाय. अलीगढमधील सासू जावयाची बहुचर्चित प्रेम कहाणी चर्चेत असताना राजस्थानामधील बिकानेर जिल्ह्यातील अशीच एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आलं आहे.
65 वर्षांचा प्रियकर, 19 वर्षांची प्रेयसी, हो अगदी बरोबर वाचलं तुम्ही या प्रकरणामुळे सर्वांना धक्का बसलाय. हे प्रकरण समोर तेव्हा आलं जेव्हा या दोघांनी बुधवार, 16 एप्रिल रोजी आत्महत्या केली. हे धक्कादायक प्रेमप्रकरण बिकानेर जिल्ह्यातील नोखा शहरातील आहे. नोखा येथील गट्टाणी शाळेच्या मागे 65 वर्षीय नारायण राम जाट राहत होते. मुलगा दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर राहतो आणि नारायण राम तळमजल्यावर राहत होते. बुधवारी दुपारी मुलगा वरच्या मजल्यावरून खाली आला आणि त्याने वडिलांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण दरवाजा आतून बंद होता. वारंवार जोरात दार वाजवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मुलाला काहीतरी अनुचित असल्याचा संशय आला. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला आणि आत डोकावून पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. वडील फाशीला लटकत होते त्यासोबत एका मुलीचाही मृतदेह फासावर लटकलेला आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांनाही ताबडतोब खाली आणून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत नारायण राम यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा नोखा इथे राहतो तर धाकटा मुलगा बंगळुरू येथे राहतो आणि काम करतो. नारायण रामची पत्नी तिच्या धाकट्या मुलासह बंगळुरूमध्ये राहते. नारायण राम त्यांच्या घराच्या तळमजल्यावर एकटे राहत होते आणि त्यांचा मोठा मुलगा वरच्या मजल्यावर राहत होता. नोखा पोलीस स्टेशनचे प्रभारी अमित स्वामी यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी वरच्या मजल्यावर राहणारा नारायण राम यांचा मुलगा खाली आला आणि त्याने त्याच्या वडिलांना हाक मारली. वारंवार हाक मारूनही काहीच हालचाल झाली नाही तेव्हा मुलाला काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटली. त्यानंतर शेजाऱ्यांना बोलावण्यात आले. दरवाजा तोडल्यानंतर वृद्ध वडील आणि एका मुलीचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आले. पोस्टमॉर्टेमनंतर दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्या खोलीत वृद्ध नारायण राम आणि मुलीने आत्महत्या केली. त्याच खोलीत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या सुसाईड नोटबद्दल कोणालाही माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या सुसाईड नोटमध्ये त्या दोघांनी संपूर्ण प्रेमकहाणी लिहिलेली आहे. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर लोक थक्क झाले. मात्र, आतापर्यंत हे माहित नाही की दोघांमध्ये प्रेमसंबंध किती काळापासून सुरू होते.

वसई– गुन्हे शाखा १ च्या पथकाने अमली पदार्थांच्या व्यवहारातील एका टोळीचा पदार्फाश करून २२ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश असून दोन आरोपी हे नायजेरियन आहेत. दक्षिण आफ्रितून तस्करी करून हे कोकेन भारतात आणण्यात आले होते.
गुन्हे शाखा १ च्या पथकाने अमली पदार्थांचा व्यवहार करणार्या एका टोळीचा छडा लावला आहे. याप्रकरणी भाईंदर मधून एका सबिना शेख (४२) या महिलेला अटक केली. तिच्याकडे ११ किलो वजनाचे सुमारे १७ कोटींची अमली पदार्थ जप्त करण्यात आले होत. तिच्या चौकशीत ती वसईतील नायजेरिय नागरिकांच्या मदतीने अमली पदार्थांची खरेदी विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या टोळीतील दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली. त्यात एका नायजेरियन महिलेचा समावेश आहे. या तिघांकडून एकूण १४ किलो वजानचा कोकेन, अमेरिकन आणि नायजेरियन चलनाच्या नोटा असा एकूण २२ कोटी ३३ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आफ्रिकेतून भारतात आणले कोकेन
या कारवाईबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले की, हे कोकेन आफ्रिकेतून आणण्यात आले होते. कोकेन कॅप्सूल मध्ये भरून मानवी तस्करांच्या माध्यमातून पोटात दडवून आणण्यात आले होते. याप्रकरणातील ४ थ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. यातील तिसरी महिला आरोपी नायजेरियन असून ती एव्हरशाईनच्या महेश पार्क इमारतीत राहते. ही इमारत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा अड्डा बनली आहे. तिला घर भाड्याने देणाऱ्यावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती बडाख यांनी दिली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार सचिन हुले, अश्विन पाटील, पोलीस शिपाई गौरव बारी, सौरभ इंगळे, धीरज मेंगाणे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सचिन चौधरी, संतोष चव्हाण आदींच्या पथकाने की कारवाई केली.
पंधरा दिवसातील दुसरी मोठी कारवाई
वसई विरार तसेच मिरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात गुन्हे शाखा २ च्या पथकाने वसईतील एव्हरशाईन येथून एका नायजेरियन नागरिकाला ११ कोटींच्या अमली पदार्थासह अटक केली होती. अमली पदार्थ विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या ३ महिन्यात २३३ ठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी ५० जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत साडेपाच कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एप्रिल महिन्यात सुमारे १२ कोटींची अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

नाशिक – शहरात एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सुमारे ५३१ आगीच्या घटना घडल्या. यात ३१ मोठ्या, ४९ मध्यम तर ४५१ लहान स्वरुपाच्या होत्या. आगीच्या दुर्घटनांमध्ये् १० कोटी ६४ लाख ३६ हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. तर ३६ कोटीहून अधिकची मालमत्ता वाचविण्यात यश आल्याचे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने म्हटले आहे.
मनपाच्या अग्निशमन विभागाच्यातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, अग्निशमन विभागाने नुकत्याच संपलेल्या वर्षातील आग व अन्य घटनांची माहिती दिली आहे. आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दलाचे जवान व पाण्याचे बंब केवळ शहरात नव्हे तर, ग्रामीण भागातही मदतीला धावतात. वर्षभरात आगीच्या घटनांमध्ये १० कोटीहून अधिक मालमत्ता भस्मसात झाली. या काळात पक्षी अडकणे, झाड पडून वाहने अडकणे अशा २६९ बचाव मोहिमा दलाने राबविल्या. वादळी वारा व पावसात शहरात झाडे व फांद्या पडण्याच्या अनेक घटना घडतात. अशा ४३९ घटनांमध्ये दलाचे पथक सक्रिय राहिले. पाण्यात बुडालेले वा तत्सम शोध मोहिमांमधून २५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टर उड्डाण-अवतरण अशा १६ वेळा दलाच्या बंबांनी हेलिपॅडजवळ सेवा दिली. या वर्षात दलाने ३७ रंगीत तालीम (मॉक ड्रील) केल्या.
शहरात आता ७० मीटरपेक्षा उत्तुंग इमारती दृष्टीपथास पडत आहेत. अशा इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा बंधनकारक आहे. तसेच .या ठिकाणी धोक्याचा संदेश देणारी यंत्रणाही कार्यरत असते, असे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले. उत्तुंग इमारतीत आगीपासून बचावासाठी ९० मीटर उंच शिडीची यंत्रणा खरेदीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. परदेशी बनावटीची यंत्रणा निर्मितीस दीड ते पावणेदोन वर्षाचा कालावधी लागतो. या एरिअल लँडर प्लॅटफॉर्मची दलास प्रतिक्षा आहे.
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्यातर्फे अग्निशमंन सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. सहा केंद्रांमार्फत वेगवेगळ्या भागात रंगीत तालमीतून प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. रविवारी दुपारी साडेचार वाजता सहा केंद्रांची एकत्रित फेरी काढण्यात येईल. फाळके रोड, दूध बाजार, भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नलमार्गे ही फेरी निघणार आहे.

Kashmir Vande Bharat : जम्मूतील कटरा ते श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवला जाणार होता, पण पंतप्रधान मोदींचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याने त्याला थोडा अधिक विलंब लागू शकतो. मात्र, या आठवड्यापासून या गाडीचे तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) वंदे भारत कोच तयार करण्यात आले आहेत. यामुळे देशभरातून काश्मीरचा प्रवास सोपा होणार आहे. मात्र, प्रवाशांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आधी रेल्वेने जम्मूतील कटरा येथे अन्य ट्रेनने यावे लागेल आणि त्यानंतर येथून श्रीनगरला वंदे भारत ट्रेन पकडावी लागेल. जम्मू-काश्मीरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये इतर गाड्यांप्रमाणेच पाच वर्षांखालील मुलांना कोणतेही तिकीट असणार नाही.

सातारा : महाबळेश्वर येथे येत्या २ ते ५ मे दरम्यान आयोजित महापर्यटन महोत्सवास येणाऱ्या पर्यटकांना वाटेतील प्रवेशकर व वाहनतळ आकारणीमध्ये माफी देण्यात आल्याची वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी महाबळेश्वर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून व मंत्री, मदत व पुनर्वसन, मकरंद जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनातून महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या दरम्यान तीन दिवसीय महापर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा पर्यटन उत्सव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
या महोत्सवाच्या आयोजनाची सध्या जोरात तयारी सुरू आहे. या अंतर्गतच महाबळेश्वर येथील मध संचालनालय सभागृहात आयोजित आढावा बैठकीत कचरे यांनी टोल माफीची माहिती दिली. या वेळी राज्य पर्यटन विकास महामंडळाचे हनुमंत हेडे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवास मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावेत यासाठी ही टोल आणि वाहनतळ आकारणी माफी देण्यात आल्याचे कचरे म्हणाले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी महाबळेश्वर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ३ मे रोजी महाबळेश्वरच्या साबणे रस्ता येथे एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. महोत्सवात राज्यातील प्रत्येक भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे प्रदर्शन भरवले आहे. ज्याद्वारे पर्यटकांना त्याचा आस्वाद घेता येईल. ४ मे रोजी समारोप सोहळ्यापूर्वी लावणी, गोंधळ, जागर, ढोल वादन इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाच्या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
गुजरातमधील कच्छच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे शंभरहून अधिक तंबू उभारण्यात येणार आहेत. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि ‘वॉटर स्पोर्ट्स’चा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद होईल. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरण देखील होणार आहे.