


आठवड्यात एकूण किती तास काम करावे याविषयी अनेकदा भारतात चर्चा झाली आहे आणि यावर लोकांची मतमतांतरे पाहायला मिळाली आहेत. सात ते आठ तास दिवसाला काम केल्याने मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अनेक अहवालही समोर आले आहेत. त्यानंतर कंपन्यांनी चार दिवसीय कामाचा आठवडा लागू करावा, अशीही चर्चा होऊ लागली.
मुख्य म्हणजे जर्मनीसारख्या काही देशांनी याचा अवलंबही केला. परंतु, जगात एक असाही देश आहे, जेथील नागरिकांना आठवड्यात केवळ २४ तास काम करावे लागते. होय, हे अगदी खरे आहे. हा देश कोणता आहे? आणि २४ तासांच्या कामाच्या आठवड्यामागील त्यांचा उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊ.
पॅसिफिक महासागरातील वानुआटु हा देश सुंदर समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, हा देश पुन्हा चर्चेत असण्याचे कारण म्हणजे या देशात एका आठवड्यात केवळ २४.७ तासच काम केले जाते. जगातील सर्वात कमी सरासरी कामाचा आठवडा असणारा वानुआटु हा देश आहे. या बेटाच्या संस्कृतीत कामापेक्षा आणि ऑफिसमध्ये अधिक वेळ घालवण्यापेक्षा कुटुंब, समुदाय आणि वैयक्तिक कल्याणाला प्राधान्य दिले जाते.
अनेक देश काम आणि जीवन यांच्यात योग्य संतुलन शोधण्याचा प्रयत्न आजही करत आहेत. कामाचे तास नक्की किती असावे, यावर अजूनही वाद सुरू आहे. परंतु, या सर्व देशांसाठी वानुआटु बेट आदर्श आहे. गेल्या वर्षभरात काम-जीवन संतुलनाचा विषय अनेक वेळा चर्चेत आला आहे, आता ईवाय कर्मचारी अण्णा पेरायल यांच्या मृत्यूनंतर याविषयावर आणखी जोर दिला जात आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात असे दिसून आले आहे की, भारत आणि अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये जास्त तास काम करणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. यात भूतान देश जगात आघाडीवर आहे. भुतानमधील ६१ टक्के कामगार आठवड्यात ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात. बांगलादेशमध्ये कामगारांचे प्रमाण ४७ टक्के आणि पाकिस्तानमध्ये हे प्रमाण ४० टक्के आहे, यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कामगारांपैकी सुमारे ५१ टक्के लोक आठवड्यातून ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात.
जास्त तास काम करणाऱ्या कामगारांचे प्रमाण असलेल्या इतर देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती आणि लेसोथो या देशांचा समावेश आहे. कामाचा जास्त ताण असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर, कल्याणावर आणि उत्पादन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. आता देशांसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. देश कामाच्या तासांवर पुनर्विचार करत आहेत.
आइसलँड या देशाने अलीकडेच चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा प्रयोग केला. त्यांच्या प्रयोगातून असे दिसून आले की, कामाचे तास कमी केल्याने कर्मचाऱ्यांची उत्पादकता कायम राहिली, कर्मचाऱ्यांच्या कल्याणात सुधारणा झाली आणि त्यांच्या आरोग्यालाही फायदा झाला. स्पेन आणि न्यूझीलंडनेही अशाच प्रकारचे प्रयोग केले आहे, त्यामुळे प्रत्येक देश आता कामाचे तास कमी करण्याविषयी आवश्यक पावले उचलताना दिसत आहेत.



Gold Rate India: सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी उसळी घेतली आहे. अमेरिका-चीन यांच्यातील वाढणारे ट्रेड वॉर, गोल्ड ईटीएफ इन्फ्लोमध्ये तेजी, कमकुवत झालेला डॉलर आणि सेंट्रल बँकेकडून होणारी सोन्याची खरेदी यासगळ्या कारणामुळं सोनं महागले आहे. सराफा बाजारात आज 18 एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. जाणून घेऊया सोन्याचे आजचे दर
आज 22 कॅरेट सोन्याचे दर किंचितशी दरवाढ झाली आहे. 1 ग्रॅम सोन्याचे दर 25 रुपयांनी वधारले आहेत. तर, चांदीच्या दरात घट झाली आहे. सोनं आणि चांदीचे आजचे दर जाणून घेऊयात. सराफा बाजारात 22 कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचे दर 250 रुपयांनी वाढून 89,600 रुपयांवर स्थिरावले आहेत. त्या व्यतिरिक्त 22 कॅरेट प्रति 100 ग्रॅम सोन्याचे दर 2500 रुपयांनी उसळून 8,96,000 रुपयांवर पोहोचले आहे.
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर आज 18 एप्रिल रोजी 200 रुपयांनी उसळून 73,310 रुपयांवर पोहोचले आहे. त्याव्यतिरिक्त 24 कॅरेट प्रति 100 ग्रॅम सोन्याचे दर 2700 रुपयांनी उसळून 9,77,300 रुपयांवर पोहोचले आहे. 16 एप्रिल रोजी 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 97,460 रुपयांवर होता. आता 24 कॅरेट 100 ग्रॅमचा दर 9,74.600 रुपयांवर आहे.
18 कॅरेट सोन्याचे दर आज 200 रुपयांनी उसळून 73,310 रुपयांवर पोहोचला आहे. त्याव्यतिरिक्त 18 कॅरेट प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 2000 रुपयांनी वाढून 7,33,100 रुपयांवर पोहोचला आहे.
आज चांदीचे दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. 100 ग्रॅम चांदीचे दर 9900 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याव्यतिरिक्त सराफा बाजारात 1 किलो चांदीचे रेट प्रतिकिलो 99,900 रुपयांवर पोहोचले आहे.
एका रिपोर्टनुसार, 2025 च्या अखेरीत सोन्याची किंमत 3,700 डॉलर औंसपर्यंत पोहोचले आहे त्यामागचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणुकदारांकडून सतत वाढणारी मागणी आणि सेंट्रल बँकेकडून सोन्याची वाढणारी खरेदी हे आहे.

Bank News : भारतातील सर्व बँकांच्या कार्यकारिणीवर आणि कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं आतापर्यंत अनेकदा बँकांना चुकीच्या कार्यवाहीसाठी आणि उणिवांसाठी शिक्षा किंवा दंड ठोठावल्याचं आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता यामध्ये आणखी तीन बड्या बँकांचा समावेश असून, अनेकांचीच खाती असणाऱ्या या बँकांवरील कारवाईमुळं आपल्या ठेवींवर काही परिणाम तर होणार नाही? हा एकच प्रश्न सामान्य खातेधारकांना सतावत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकतंच नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. नुकतीच देशातील सर्वोच्च बँकिंग संस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली.
RBI नं जारी केलेल्या माहितीनुसार (Kotak Mahindra) कोटक महिंद्रा बँकेकडून ‘कर्ज वितरणासाठी कर्ज प्रणाली’चे निर्देश तसंच ‘कर्ज आणि आगाऊ वैधानिक’, इतर निर्बंधांसंदर्भातील सूचनांचं पालन न केल्यामुळं बँकेला 61.4 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, ‘बँकांमधील ग्राहक सेवा’ संदर्भात आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं (PNB) पंजाब नॅशनल बँकेवर 29.6 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरबीायकडूनच जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार Know Your Customer – KYC संदर्भातील काही सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी आयडीएफसी फर्स्ट बँकेला (IDFC First) आरबीआयनं 38.6 लाखांचा दंड ठोठावला आहे. वरील तिन्ही बँकांवर ही कारवाई करत असतानाच त्याची सर्वतोपरि जबाबदारी बँकांची असून, आरबीआयनं सांगितल्यानुसार बँकांच्या खातेधारकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही याची नोंद घ्यावी.
आरबीआयकडून बँकांवर कारवाी केली जाणारी ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा एचडीएफसी, आयसीआयसीआय या आणि अशा अनेक मोठ्या बँकांवर आरबीआकडून कारवाईचा बडगा उचलला गेल्याचं पाहायला मिळालं आहे. आखून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याची बाब लक्षात येताच आरबीआय बँकांना शासन घडवताना दिसते. दरम्यान यामध्ये खातेधारकांना यामुळं कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षतासुद्धा बँकेकडून घेण्यात येते.



मुंबई / उत्तर प्रदेश राज्यात पुन्हा एकदा दलित समाजावरील अत्याचाराची अमानुष घटना समोर आली आहे. एका ११ वर्षीय दलित मुलीवर निर्घृण लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. पीडित मुलीच्या शरीरावर दातांचे ठसे आढळले असून, गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. या क्रूर घटनेमुळे तिची मानसिक स्थिती अत्यंत अस्थिर झाली आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जाब विचारला आहे. त्यांनी समाजमाध्यमांवरून आणि पत्रकारांशी संवाद साधताना आपला संताप व्यक्त केला.
“कळायला लागल्यापासून दररोज अशा बातम्या ऐकत आणि वाचत आहे. इतक्या वर्षांत काहीही बदलले नाही. फक्त सत्ताधारी बदलले आहेत. हे सत्ताधारी डेथ टुरिझम करतात आणि जनतेला मूर्ख बनवतात. जर तुम्हाला खरोखर बदल हवा असेल, तर तुमच्या मताचा वापर सुज्ञपणे करा,” असे अॅड. आंबेडकर म्हणाले.
तसेच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट विचारले, “तुमच्या प्रशासनात अजून किती दलित मुलींना अशा प्रकारचा छळ आणि लैंगिक हिंसाचार सहन करावा लागणार आहे?”
या घटनेने उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांत तीव्र संताप असून, दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बाललैंगिक अत्याचारासारख्या घटनांना आळा बसावा यासाठी कडक शासन आणि तत्काळ न्यायाची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेतून होत आहे.

लोकसत्ता वार्ताहर
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात विपुल प्रमाणात जैवविविधता, पशु पक्षी आणि जीवसृष्टी आहे त्यामुळे पर्यावरणीय संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. सध्या वैभववाडी डोंगरात आग धुमसत असल्याने जीवसृष्टी, जैवविविधतेला धोकादायक बनले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील शिराळे, सालवा डोंगर यांचा समावेश होतो.वैभववाडीच्या मध्यभागी वसलेला, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि सात गावांचा रक्षणकर्ता असलेला सालवा डोंगर पर्यावरणीय व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या भाग आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नाजूक परिसंस्था विनाशकारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे असे दिसून येते.
अशा दुर्मिळ पर्यावरणीय संपत्तीचे संवर्धन करण्याचे आवाहन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांनी केले आहे. काही वेळा नकळतपणे तर काही वेळा अज्ञात व्यक्तीकडून असे आगीचे प्रकार घडतात. या डोंगरातील घाबरलेले वन्यजीव घाबरून पळून जात आहेत आणि असंख्य दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी एकतर विस्थापित किंवा नष्ट होऊ शकतात.
सालवा डोंगराच्या अनेक नैसर्गिक खजिन्यांपैकी सेरोपेगिया अनंती ही एक दुर्मिळ वनस्पती प्रजाती आहे. ती या ठिकाणावरून प्रथम शोधली गेली आणि वर्णन केली गेली. सेरोपेगिया अनंतीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सालवा डोंगराचे वनस्पतिशास्त्रीय महत्त्व प्रचंड आहे. या अश्या वणव्या मुळे या सारख्या दुर्मिळ वनस्पती किंवा प्राणी यांना धोका होऊ शकतो.
या भागात किंवा परिसरात सामुदायिक जागरूकता आणि प्रदेशाच्या अद्वितीय जैवविविधतेसाठी मजबूत संरक्षणाची तातडीची गरज असल्याचे मत वैभववाडी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व वनस्पती अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धक डॉ.विजय पैठणे व सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव प्रा.श्री. एस. एन. पाटील यांनी व्यक्त केले आहे.