



Vijay Wadettiwar On Pahalgam Terror Attack: आम्ही हल्ल्याचा निषेध करतो. हा भारत देशावरचा हल्ला आहे, असं प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी नोंदवली आहे. इथे राजकारणचा विषय नाही. पण हा हल्ला म्हणजे इंटेलिजन्सचे अपयश आहे, असंही वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे. “दहशतवाद्यांना रान मोकळे केले असा हा सगळा प्रकार आहे. इंटेलिजन्स काय करत होते? हजारो पर्यटक जिथं होते मग तिथं एकही पोलीस किंवा सुरक्षा रक्षक कसा काय नव्हता?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
“सुरक्षेसंदर्भातील व्यवस्था करणे गरजेच होते. ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी टार्गेट करून गोळीबार केला ते भयानक आहे,” असं मत वड्डेटीवार यांनी व्यक्त केलं आहे. “जम्मू-काश्मीरमधून हिंदूंचे पलायन होत आहे मग नोटबंदी झाली आणि बोलले जात होते की दहशतवाद संपेल पण संपला नाही. हे सरकारचे अपयश आहे,” असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.
वड्डेटीवार यांनी या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे तिथून काढले पाहिजे, असं म्हटलं आहे. मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात तिथे सुरक्षा बंदोबस्त असायला हवा, अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी, “दोन धर्मांना एकमेकांसमोर उभे करण्याचा हा डाव असू शकतो,” अशी शक्यताही व्यक्त केली आहे.
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या राहुल गांधींनी आपला दौरा अर्ध्यात रद्द करुन परतणार आहेत. सध्या ते या हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई उपनगरसह पालकमंत्री मंगल प्रभात लोढांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई भाजपा काश्मीरच्या पहेलगाममधील घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहे. आज सायंकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटी येथे निषेध आंदोलन केलं जाणार आहे. या भ्याड हल्ल्याविरोधात शहीद तुकाराम ओंबळे चौकात आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाने केलं आहे.


Pahalgam Terror Attack Instruction To Airlines Companies: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री राम मोहन नायडू यांनी पीडित पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही वेगवान निर्णय घेतले आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी विमान कंपन्यांनाही सज्जड दम भरला आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात…
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी वैयक्तिकरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा केली आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधून काम करण्याचे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दिले आहेत. नायडू हे काश्मीरमधील परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेवून आहेत. पीडितांना तात्काळ मदत पोहचवण्याच्या उद्देशाने श्रीनगरहून चार विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन विमानं दिल्ली आणि दोन विमानं मुंबईला पाठवली जाणार आहेत. तसेच पुढील पीडितांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमाने केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्रालयाकडून तयार ठेवण्यात आली आहेत.
पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्री असलेल्या श्री राम मोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी सर्व विमान कंपन्यांना वाढीव किमतींसंदर्भात कठोर शब्दांमध्ये सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी कंपन्यांना दम भरल्याप्रमाणे थेट इशाराच दिला आहे. “या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडू नये याची खात्री करून विमान कंपन्यांना नियमित भाडे पातळी राखावी,” असे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त, श्री राम मोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांना मृत व्यक्तीचे पार्थिव त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारे आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करावे, असं नायडू यांच्याकडून कंपन्यांना सांगण्यात आलं आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालय काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात अलर्टवर असून सर्व बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावर आणलं जाणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता दोघांचेही मृतदेह पुण्यात आणले जातील.

Marathi News Live Today : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील अनेकजण अजूनही तिकडे अडकले आहेत. त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया येत असून मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडीही पाहुयात.


Pakistan Reaction on Pahalgam Terror Attack Updates Today : जम्मू काश्मीरच्या पहलागमजवळ दहशतवादी हल्ला झाला असून यात २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केलं. तसंच, पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा आरोप त्यांनी भारतवार केला. हिंदूस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आसिफ यांनी हल्ल्याची जबाबदारी फेटाळून लावताना या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरलं आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “पाकिस्तानचा या दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाही. (भारतातील) देशातील लोकांचाच यात समावेश आहे. भारतातील अनेक राज्यांत सरकारविरोधात रोष आहे. तिथे नागालँडपासून काश्मीर आणि साऊथमध्ये छत्तीसगड, मणिपूरमध्ये लोक सरकारविरोधात आहेत. भारत सरकार लोकांच्या हक्कांवर गदा आणत आहे. त्यांचं शोषण करत आहे. अल्पसंख्यांकांचं शोषण होत आहे. याविरोधात लोक उभे राहिले आहेत. आमचा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही दहशतवादी कृत्यांचं समर्थन करत नाही. कोणत्याही स्थानिक संघर्षात निष्पाप लोकांना लक्ष्य करू नये”, असं ते म्हणाले. ते लाईव्ह ९२ चॅनेलशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “आपल्या राष्ट्रीय धोरणात सामान्य लोकांना लक्ष्य करण्याची परवानगी नाही यात शंका नाही, परंतु जर लष्कर किंवा पोलिस भारतात सामान्य माणशांवर शस्त्रे उचलत असतील तर पाकिस्तानला दोष देणे सोपे आहे.”
?Pakistan’s Defence Minister Khawaja Asif:
“Pakistan has no link to the Pahalgam incident.
We oppose terrorism. Don’t blame us—
India should address its own unrest and interference in Balochistan.”#PahalgamTerroristAttack
— Amit Tyagi (@Amit_Tyagi75) April 23, 2025
“आमच्याकडे जवळजवळ दररोज असे पुरावे गोळा होतात जे आम्ही दिले आहेत. एकदा नाही तर अनेक वेळा दिलेत की भारत बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या इतर भागात अशांततेला प्रोत्साहन देत आहे. ते अफगाणिस्तानात किंवा इतर कुठूनही पाकिस्तानात अशांतता पसरवत आहे, याचा मोठा इतिहास आहे”, असंही ते म्हणाले. दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

