



सांगली : पुणे-बंगळूरु महामार्गावर इटकरे गावाजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने नर बिबट्या गंभीर जखमी होण्याची घटना मध्यरात्री घडली असून, पुढील उपचारासाठी त्याला पुण्याला हलविण्यात आले आहे. सहा वर्षांचा पूर्ण वाढ झालेला हा नर बिबट्या असल्याचे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अजित साजणे यांनी दिली.
मध्यरात्री इस्लामपूरच्या बाजूने महामार्ग बिबट्या ओलांडत असताना इटकरे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्याचा मागील पाय जायबंदी झाला. अपघातात बिबट्या जखमी झाल्याची माहिती वन विभागाला कळविण्यात आली. वन विभागाचे वनरक्षक भीवा कोळेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव पथकाच्या मदतीने बिबट्याला इस्लामपूर कार्यालयात आणण्यात आले. या ठिकाणी पशुवैद्यकीय तज्ज्ञाकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. सलाइन लावण्यात आले. यानंतर वन विभागाच्या विशेष वाहनाने त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे.





पुणे : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामुहिक बलात्कार प्रकरणात गेले सहा महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला वालचंदनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वालचंदनगर पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला रात्री उशीरा पुण्यात आणण्यात आले.
सूरज उर्फ बापू गोसावी (रा. भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बोपदेव घाट प्रकरणात यापूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) आणि अख्तर अली शेख (२८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना अटक केली होती. बोपदेव घाटात ३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री महाविद्यालयीन तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. बोपदेव घाटातील टेबल पाॅईंट परिसरात तरुणी आणि तिचा मित्र गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी कनोजिया, शेख आणि गोसावी यांनी तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला मारहाण केली. दोघांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील चीजवस्तू काढून घेतल्या. त्यानंतर तिघांनी कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली होती.
याबाबत पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पसार झालेले आरोापींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० हून जास्त पथके तयार केली होती. धमकावून लुटणे, तसेच बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ४५० सराइतांची पोलिसांनी चौकशी केली. बोपदेव घाट, सासवड, कोंढवा, येवलेवाडी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, कनोजिया आणि शेख यांना अटक करण्यात आली. शेखला प्रयागराज परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर गोसावी पसार झाला होता. पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती. गेले सहा महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.
गोसावीच्या मागावर पोलिसांची पथके होती. मात्र, तो त्याची ओळख लपवून वास्तव्य करत होता. तो त्याच्या परिचितांशी संपर्कात नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. गोसावी अकलूज भागातील एसटी स्थानक परिसरातून पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना शनिवारी दुपारी मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, सचिन गायकवाड, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर यांनी ही कारवाई केली. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशीरा त्याला पुण्यात आणण्यात आले.
वालचंदनगर पाेलिसांच्या पथकाने बोपदेव घाट प्रकरणातील फरार आरोपीला शनिवारी पकडले. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, याप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. – निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

फलटण : भाजप प्रदेश नेतृत्वाच्या सूचनेनुसार फलटणमध्ये आज गाव बस्ती संपर्क अभियानाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, वाठार स्टेशन मंडळ अध्यक्ष अमित रणवरे, कोळकी मंडळ अध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर, फलटण मंडळ अध्यक्ष बापुराव शिंदे, माजी अध्यक्ष बजरंग गावडे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, सरचिटणीस संतोष सावंत, नगरसेवक सुधीर अहिवळे, युवा मोर्चा अध्यक्ष संतोष गावडे, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, अजय माळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्याने करावा. अभियानात सहभागी होऊन प्रत्येक बुथ अध्यक्ष, प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन मंदिरे स्वच्छ करावीत, शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालयांना भेटी द्याव्यात व गावातील लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या अभियानाची माहिती जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ अध्यक्ष आणि आघाडी-मोर्च्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी युवा मोर्चाचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुंबई : कीडनाशके, रसायनांचा अतिरेकी वापर आणि शेती करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे फुले, फुलोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील मधपाळ अडचणीत आले आहेत. या मधपाळांना उत्तर भारतात फुलोऱ्याच्या शोधात भ्रमंती करावी लागत आहे. सध्या मधपाळ झारखंडमध्ये असून, तिथे करंजीच्या फुलोऱ्यापासून मध संकलन करीत आहेत.
राज्यात मधपाळांची नोंदणी न झाल्यामुळे त्यांची संख्या नेमकी किती, या बाबत निश्चिम माहिती नाही. पण, आजघडीला मोठ्या आणि व्यावसायिक पद्धतीने मध संकलन करणाऱ्या मधपाळांची संख्या मोठी आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे आणि फुलोऱ्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे मध संकलनासाठी बहुतेक मधपाळ आपल्या मधपेट्या घेऊन झारखंडमधील रांची जिल्ह्यात गेले आहेत. तेथील दाट जंगलातील कंरजीच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर फुले आली आहेत. या फुलांपासून मध संकलन केले जात आहे. एक – दीड महिन्यात प्रति मधपेटीतून सुमारे सहा ते दहा किलो मध संकलन होण्याची शक्यता आहे.
सरसकट सर्वच झाडे, फळे आणि भाजीपाल्यांच्या फुलोऱ्यांमधून मध संकलन होत नाही. त्यामुळे जास्त मध संकलन होणाऱ्या फुलोऱ्याचा शोध मधपाळांकडून घेतला जातो. ऑक्टोबर अखेरपासून नोव्हेबर, डिसेंबरपर्यंत मधपाळ राजस्थानला जातात त्यावेळी ओवा, बाभूळ. जानेवारी, फेब्रुवारीत मोहरी आणि मार्चमध्ये कोथिंबीरच्या फुलांपासून मध संकलन होते. ऑक्टोंबरपासून मार्चपर्यंत मधपेट्या राजस्थानमध्येच असतात. या पाच महिन्यांत प्रति पेटी सरासरी २० ते २२ किलो मध मिळतो. या काळात देशभरातील हजारो मधपाळ आपल्या लाखो मधपेट्या घेऊन राजस्थानमध्ये येतात. राजस्थानमधील कोटा, झालवाड, बारन, पंजाबमधील होशियारपूर, हरियाणातील जिंद, हिस्सार, जम्मूत साधारण १४ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान मधपेट्या जातात.
मधपाळ मध संकलनासाठी वर्षभर फुलोऱ्यांच्या शोधात मधपेट्या घेऊन उत्तर भारतात भ्रमंती करतात. मधपेट्या वाहतूक करताना त्या – त्या राज्यांतील पोलिसांकडून अडवणूक केली जाते. राज्य सरकारकडे अनेकदा मधपाळ म्हणून ओळखपत्र देण्याची मागणी केली आहे. पण, आम्हाला अद्याप ओळखपत्र मिळाले नाही. महाराष्ट्र सरकारच्या कृषी, आदिवासी, वन किंवा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोउद्योग महामंडळाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. आमच्याकडून मध खरेदी केली जात नाही. त्यामुळे मधपाळांना मधमाश्या पालन, देशभर फिरून मध संकलन करणे आणि मधाचे वेस्टन (पॅकिंग) करण्याचे करावे लागते. महामंडळाने मध खरेदीची ग्वाही दिली तर आम्हाला मध संकलन करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळेल. महामंडळाकडून मधपाळांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. महामंडळाचे अधिकारी अद्याप तांत्रिक बाबीत अडकून पडले आहेत. त्यांना प्रत्यक्ष स्थिती आणि अडचणींची कल्पनाच नाही. मधपाळांची यादीही त्यांच्याकडे नाही. मधपेटीचा आकार आणि ती कोणत्या लाकडापासून तयार करावी, यातच ते अडकून आहेत, असा गंभीर आरोप मधपाळ दिनकर पाटील यांनी केला आहे.
सरसकट सर्वच फुलांपासून मध मिळत नाही. पराग आणि मकरंद, हे दोन्ही घटक असलेल्या सूर्यफूल, तीळ, कोथिंबीर, बाजरी, मका, तूर, ओवा, बाभूळ, करंज, मोहरीच्या फुलांपासून चांगला मध मिळतो. त्यामुळे मधपेट्या घेऊन भ्रमंती करावी लागते. ग्राहकांनी थेट मधपाळांकडून मध खरेदी केला तर कमी किंमतीत दर्जेदार, भेसळमुक्त मध ग्राहकांना मिळेल. राज्य सरकारकडून फक्त मधपाळ म्हणून ओळखपत्र आणि संकलित केलेल्या मधाच्या खरेदी हमी मिळावी इतकीच अपेक्षा आहे, अशी मागणी मधपाळ दिनकर पाटील यांनी केली आहे.