



Bhopal rape and blackmailing case: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अनेक तरुणींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता. दोन सख्ख्या बहिणींनी तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. दरम्यान आरोपींच्या क्रूरतेचा व्हिडीओ समोर आला असून तो पाहिल्यानंतर पोलीसही हादरले आहेत. आरोपींना यामध्ये दोन तरुणीही साथ देत होत्या. ज्या मुलींचं ब्रेनवॉशिंग करायच्या. या तरुणी एखाद्या एजंटप्रमाणे काम करत होत्या. मुलींना जाळ्यात ओढून त्यांना मोठी स्वप्नं दाखवणं हे त्यांचं काम होतं. ते पूर्ण कऱण्यासाठी आरोपींशी मैत्री करणं गरजेचं आहे असं त्या भासवत होत्या. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
भोपाळमध्ये बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात बळी पडलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या तक्रारीनंतर, आरोपींच्या क्रूरतेचे व्हिडिओही समोर आले आहेत. हे पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. एका व्हिडिओमध्ये, मास्टरमाइंड आरोपी तीन मुलींवर एकत्रित बलात्कार करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, मुलीला सिगारेटने चटके देत असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्येही या टोळीने केलेले गुन्हे समोर आले आहेत.
भोपाळच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपण कशाप्रकारे आरोपीच्या जाळ्यात अडकलो हे सांगितं आहे. तिच्या एका मैत्रिणीने आरोपीशी मैत्री करुन दिली होती. यानंतर त्याने एक एक तर दोन्ही बहिणींना जाळ्यात ओढलं आणि लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडीओ शेअर केले. यानंतर त्याने इतका त्रास दिला की, अखेर त्यांना कॉलेज सोडावं लागलं.
मोठ्या बहिणीने सांगितलं की, आरोपीने आधी मैत्री करुन नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर त्याने बलात्कार केला. जेव्हा लग्नाची विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने धर्मांतर करण्यास सांगितलं. विरोध केल्यानंतर लैंगिक अत्याचाराच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्या छोट्या बहिणीलाही अशाच प्रकारे फसवण्यात आलं.
आरोपी मुलींना निर्घृण मारहाण करायचे. तसंच याचे व्हिडिओही बनवायचे आणि मोबाईलमध्ये सेव्ह करायचे. विद्यार्थ्यावर क्रूर अत्याचार केल्याचा व्हिडिओ देखील सापडला आहे. डीसीपी संजय अग्रवाल यांनी इंदूर पोलिसांना एक पत्र पाठवलं असल्याचं सांगितलं आहे.
टोळीचा प्रमुख फरहान याच्या मोबाईल फोनवरून पोलिसांना त्याचे क्रूर कृत्य दाखवणारे व्हिडिओ सापडले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो तीन मुलींवर एकत्र बलात्कार करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पीडितेला सिगारेटने जाळताना दिसत आहे.
या टोळीच्या जाळ्यात एक डझनहून अधिक मुली अडकल्याचा पोलिसांना संशय आहे. यामधील एक मुलगी अल्पवयीन आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधून डझनभरापेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ मिळाले आहेत. पोलिसांनी डिलीट केलेले व्हिडीओही रिकव्हर केले आहेत. पोलीस व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणींची ओळख पटवत आहेत.
आरोपी मोबाईलमधील व्हिडीओ कुठे शेअर करायचा याची माहिती पोलीस मिळवत आहेत. आरोपीने पॉर्न इंडस्ट्रीला हे व्हिडीओ पाठवले तर नाहीत ना याचा पोलिसांना संशय आहे. यासाठी त्याच्या बँक खात्याची छाननी केली जात आहे.


Pahalgam Terror Attack Video: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 7 दिवस उलटून गेले आहेत. सुरक्षा दल आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असताना दहशतवादी हल्ल्याचे काही व्हिडीओ समोर येत आहेत. या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला होता, तो पर्यटकांनी गजबजलेला भाग होता. अशात तिथे अनेक जण व्हिडीओ किंवा फोटो काढत होते. ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा ज्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली ते व्हिडीओ आता समोर येत आहेत. या व्हिडीओच्या आधारे सुरक्षा दल आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) तपास करत आहेत. या व्हिडीओतून दहशतवाद्यांची ओळख करण्यात आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दहशतवादी लोकांना मारताना दिसून येत आहे. खरंतर एक पर्यटक झिपलाइनचा आनंद घेत असताना तो हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करत होता. पण त्याच्या धानीमनी नसतानाही खाली जमिनीवर दहशतवाद्यांचं क्रूर कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. तो पर्यटक जेव्हा हवेत झिपलाइन करतोय त्या क्षणी खाली जमिनीवर पर्यटक धावपळ करताना आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहे. तर दहशतवादी गोळीबार करत आहे. या व्हिडीओमध्ये एका पर्यटकाला गोळी लागल्यानंतर तो जमिनीवर पडतानाही दिसत आहे.
Another horrific footage of #PahalgamTerroristAttack.
A man from Ahmedabad had recorded it unknowingly… He wasn’t even aware of what was happening on the ground… pic.twitter.com/itwPMxvJnf
— Mr Sinha (@MrSinha_) April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा 42 सेकंदांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत आहेत. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो. झिपलाइन अॅडव्हेंचर करणाऱ्या पर्यटकाला खाली काय चालले आहे याची काहीच कल्पना नसते. तो त्याचा व्हिडीओ बनवण्यात व्यस्त आहे. अचानक त्याच्या कॅमेऱ्यात एक माणूस जमिनीवर पडताना दिसतो. त्या माणसाला गोळी लागली आहे असे दिसते.
One more video of Pahalgam Massacre by Pakistan sponsored terrorists.
Tourists had taken cover behind a stall & bullet shots can be heard in BG. pic.twitter.com/1D7V44p8CI— War & Gore (@Goreunit) April 28, 2025
या व्हिडीओमध्ये अनेक लोक कपड्यांच्या स्टॉलच्या मागे स्वतःचे रक्षण करताना दिसत आहेत. ज्यात घोडेस्वार आणि इतर स्थानिक लोकांचा समावेश होता. घोडेस्वार पळून गेले नाहीत तर ते पर्यटकांसोबतही दिसत आहेत. घोडेस्वार त्यांना वाकण्यास, बसण्यास आणि उजवीकडे जाण्यास सांगत आहेत. ते त्याचा जीव वाचवण्याचाही प्रयत्न करत आहेत.
22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 27 पर्यटकांचा जीव गेला आहे. दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यातील पर्यटकांना लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारले आणि नंतर त्यांना ठार मारले. दहशतवाद्यांनी काही पुरूषांना त्यांच्या पँट काढायला लावल्या आणि पर्यटक हिंदू आहेत की मुस्लिम हे शोधण्यासाठी त्यांचे गुप्तांग तपासले. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली.
या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे आणि सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. याशिवाय, पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनाही भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


आयपीएलचा हंगाम आता ऐन भरात आहे. मुंबई आणि चेन्नई या संघांच्या नावावर १० जेतेपदं आहेत. यापैकी चेन्नईचं आव्हान गुंडाळल्यात जमा आहे. मुंबईचा संघ जेतेपदासाठी सरसावला आहे. प्रस्थापित संघांना धक्का देत पहिल्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी बंगळुरू तसंच पंजाबचा संघ उत्सुक आहे. सातत्यपूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा गुजरातचा संघ दमदार खेळतो आहे. सगळ्या सामन्यांमध्ये एका गोष्टीची वारंवार चर्चा होते आहे ते म्हणजे मॅचअप्स. सामना सुरू होण्याआधी, सामन्यादरम्यान आणि सामना संपल्यानंतरही समालोचक मॅचअप्सबद्दल बोलत असतात. दर्दी चाहत्यांनाही मॅचअप्सचं गणित चांगलंच ठाऊक झालं आहे.
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सामना खेळला. या सामन्यात मुंबईने उत्तम फॉर्मात असलेल्या फिरकीपटू मिचेल सँटनरला अंतिम अकरातून वगळण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कर्णधार, अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करणारा, अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असलेल्या सँटनरला वगळण्याचा निर्णय चाहत्यांसाठी धक्कादायक होता. सँटनर दुखापतग्रस्त आहे म्हणून काढलं का अशी विचारणा होऊ लागली. सोशल मीडियावरही सँटनरच्या नसण्याची चर्चा होऊ लागली. याच चर्चेदरम्यान मॅचअप्सचा मुद्दा ऐरणीवर आला.
असं करताना मुंबईने विल जॅक्स या ऑफस्पिनरला प्राधान्य दिलं. ऑफस्पिनरचा चेंडू डावखुऱ्या फलंदाजांपासून दूर जातो. यामुळे त्यांना हवेत फटका मारणे कठीण जातं. लखनौच्या संघात डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, ऋषभ पंत असे एकापेक्षा एक तडाखेबंद डावखुरे फलंदाज आहेत. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने पूरन आणि पंत खेळायला आल्यावर विल जॅक्सला गोलंदाजी दिली. त्याने एकाच षटकात दोघांना बाद करत मोहीम फत्ते केली. यानंतर डावखुरा डेव्हिड मिलर खेळायला उतरल्यावर जॅक्सला गोलंदाजी दिली. अख्ख्या सामन्यात जॅक्सने दोनच षटकं टाकली पण या दोन षटकांनी मुंबईचं काम झालं.
सँटनर डावखुरा फिरकीपटू आहे. उत्तम फॉर्मात आहे पण मुंबईचं वानखेडे मैदान छोटं आहे. डावखुरे फिरकीपटू डावखुऱ्या फलंदाजांना रोखण्यात फार यशस्वी ठरत नाहीत. टी२० सामन्यात प्रत्येक गोलंदाजाला चार षटकं मिळतात. सँटनर या त्रिकुटाला रोखू शकेल किंवा त्यांना तंबूत धाडू शकेल असा विश्वास संघव्यवस्थापनाला नसेल किंवा तशी आकडेवारीच असल्यामुळे सँटनरला संघातून वगळण्यात आलं. सँटनरच्या नावाचा समावेश इम्पॅक्ट प्लेयर्स यादीतही नव्हता. विल जॅक्सने मुंबईला सँटनरची अनुपस्थिती जाणवू दिली नाही.
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्ज यांच्या लढतीदरम्यान पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलला १७व्या षटकापर्यंत गोलंदाजीच दिली नाही. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स चहलच्या नावावर आहेत. पंजाबने लिलावात तब्बल १८ कोटी रुपये खर्चून चहलला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. मात्र चेन्नईविरुद्धच्या लढतीत चहलला गोलंदाजी देण्यात आली नाही. सामना जिंकल्यानंतर बोलताना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, ‘शिवम दुबे आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. फिरकीपटू त्याला खास आवडतात. त्यांच्या गोलंदाजीवर दुबे तुटून पडतो. दुबेला वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागला असं मला वाटलं म्हणून चहलला गोलंदाजी देण्याचा निर्णय लांबवला’. दुबेच्या बॅटचा तडाखा चहलला सोसावा लागू नये आणि याचा संघाला फटका बसू नये यासाठी श्रेयसने तो निर्णय घेतला. १६व्या षटकात दुबे बाद झाला आणि पुढच्याच षटकात श्रेयसने चहलला गोलंदाजीसाठी पाचारण केलं.
चहलबाबत श्रेयसने अवलंबलेलं धोरण माजी फिरकीपटू पीयूष चावलला पसंत पडलं नाही. तो म्हणाला, ‘आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चावला तिसऱ्या स्थानी आहे. ज्या पद्धतीने चहलला वागणूक देण्यात आली ते मला आवडलं नाही. लोक मॅचअप्स वगैरे गोष्टी बोलत असतात. युझवेंद्र चहल हा स्पर्धेतला सर्वाधिक विकेट्स पटकावणारा गोलंदाज आहे. बंगळुरूतल्या चिन्नास्वामीसारख्या छोट्या मैदानावर फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर त्याने वर्षानुवर्ष विकेट्स घेतल्या आहेत. यापेक्षा चांगलं उदाहरण असू शकत नाही. शिवम दुबे त्याच्या गोलंदाजीवर आक्रमण करू शकतो हे मान्य पण चहल त्याची विकेटही काढू शकतो हेही लक्षात घ्यायला हवं होतं. चहलच्या खात्यात अनेक अस्त्रं आहेत, तो परिस्थितीनुरुप योग्य शस्त्र परजू शकतो’.
मॅचअप्स म्हणजे एखाद्या विशिष्ट फलंदाजाची किंवा गोलंदाजाची विशिष्ट संघाविरुद्ध किंवा फलंदाज-गोलंदाजाविरूद्धची कामगिरी. सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या फलंदाजाचे कच्चे दुवे काय आहेत किंवा एखाद्या गोलंदाजाचं बलस्थान काय आहे हे ओळखून डावपेच आखणे. एखादा फलंदाज प्रामुख्याने लेगसाईडला फटकेबाजी करत असेल तर त्यानुसार क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. एखादा फलंदाज स्वीपचा फटका सातत्याने खेळतो हे डेटातून स्पष्ट होत असेल तर या फटक्यावरच त्याला बाद करण्यासाठी आखणी केली जाते.
मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराहसारखं हुकूमी अस्त्र आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या बुमराहचा वापर एखाद्या ट्रम्पकार्डसारखा करतो. बुमराहची अॅक्शन आणि अचूकता खेळपट्टीवर नव्या आलेल्या फलंदाजांसाठी अवघड ठरते. म्हणूनच नवा फलंदाज खेळपट्टीवर आल्यानंतर हार्दिक बुमराहला गोलंदाजी देतो. बुमराह बहुतांशवेळा त्या फलंदाजाला बाद करत मोहीम फत्ते करतो.
पंजाबचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीची फिरकी खेळू शकत नाही. वरुणच्या पोतडीतील विविध अस्त्रं मॅक्सवेलच्या पचनी पडत नाहीत. त्यामुळे कोलकाता-पंजाब लढतीत मॅक्सवेल फलंदाजीला आला की कोलकाताचा कर्णधार तातडीने वरुणला गोलंदाजीस पाचारण करतो. वरुण मॅक्सवेलला माघारी धाडत कर्णधार आणि संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवतो.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी संथ आणि धीमी आहे. या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा होत नाहीत हे लक्षात घेऊन चेन्नईचा संघ फिरकीबहुल आक्रमणावर भर देतं. पॉवरप्लेच्या षटकापासून म्हणजे ६ आणि हाणामारीच्या षटकांच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे १६ पर्यंत या षटकांमध्ये अधिकाअधिक फिरकी गोलंदाज गोलंदाजी करतात आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवतात.
आयपीएल संघांच्या ताफ्यात विविध प्रकारचे प्रशिक्षक असतात. यामध्ये अॅनालिस्टचाही समावेश असतो. फलंदाज कुठल्या पद्धतीचे फटके खेळतो, मैदानाच्या कुठल्या भागात फटके मारतो, कुठला फटका मारताना तो बाद होतो, कुठल्या गोलंदाजांसमोर तो निरुत्तर ठरतो, बाद होण्यात काही साम्यस्थळं आहेत का हा सगळा डेटा व्हीडिओसकट उपलब्ध असतो. गोलंदाज असेल तर कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी कशी आहे, कुठल्या फलंदाजाला जाळ्यात अडकवलं आहे, कुठल्या फलंदाजाची धास्ती आहे, छोट्या मैदानात गोलंदाजी कशी आहे, दव पडलेलं असताना गोलंदाजी कशी आहे, नवा चेंडू हाताळताना गोलंदाजी कशी आहे असे सगळे तपशील उपलब्ध असतात. या तपशीलांमधून अन्यवार्थ शोधून त्यानुसार डावपेच-योजना आखल्या जातात.


Bilawal Bhutto Dance Video: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेला उत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तानवर कठोर भूमिका घेत काही निर्णायक पावले उचलली. याअंतर्गत भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आणि सिंधू नदीतून पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठाही थांबवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत गरळ ओकली. यानंतर बिलावल भारतीयांच्या रागाचे कारण बनलाय. दरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात ट्रेण्ड होतोय. या व्हिडीओत थिरकणारी व्यक्ती बिलावल असल्याचे म्हटलं जातंय. काय आहे यामागचे सत्य जाणून घेऊया.
Bollydawood should make a movie on him & call it :
Billu Baaylya#Bilawal_Bhutto_Zardari pic.twitter.com/DVqKWZkzGn
— Sameer (@BesuraTaansane) January 21, 2023
पाकिस्तानी राजकारणी बिलावल भुट्टो झरदारी यांनी सिंधू करारावरील भारताच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी एक वादग्रस्त विधान केले. ‘सिंधू नदी इस्लामाबादची आहे आणि ती नेहमीच इस्लामाबादकडेच राहील, असे म्हणत त्यांनी धमकीही दिली.जर सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानात येण्यापासून रोखले गेले तर नदीच्या पाण्याऐवजी भारतीयांचे रक्त वाहेल, असे ते म्हणाले. या विधानानंतर बिलावल भुट्टो झरदारींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये ते नाचताना दिसतायत.
नचनिया के साथ नाचते-नाचते बिलावल भुट्टो के अंदर की स्त्री जाग गई
लौंडिया नाच नाचने वाले अब बताएंगे की सिंधु नदी का पानी उनका था है और रहेगा pic.twitter.com/T7nCu8Vy3f
— Kikki Singh (@singh_kikki) April 26, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारत पाकिस्तानला दोष देऊन आपली कमजोरी लपवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून लोक गोंधळून जातील, असे बिलावल भुट्टो एका मेळाव्यात म्हणाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आणि म्हटले की सिंधू नदीचे पाणी थांबवणे योग्य नाही. सिंधू पाणी कराराअंतर्गत भारताने सिंधू नदी पाकिस्तानची आहे हे मान्य केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये बिलावल भुट्टो झरदारी ‘आज की रात’ या गाण्यावर नाचताना दिसतायत. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक त्यांच्यावर टीका करतायत. तर त्यांचे समर्थक या डान्स आणि गाण्याचा आनंद घेतायत.
हा व्हिडिओ पाकिस्तानी अभिनेत्री इनाया खानच्या बहिणीच्या लग्नावेळचा होता. जो पहिल्यांदा 13 जानेवारी 2023 रोजी शेअर करण्यात आला होता. इनायाच्या प्रोफाइलवर आणि बेगच्या प्रोफाइलवर या समारंभाचे इतर अनेक व्हिडिओ आहेत. यासोबतच समारंभांचे इतर व्हिडिओ इनाय खानच्या यूट्यूब चॅनेलवर देखील उपलब्ध होते. आणि ‘बिलावल भुट्टो’च्या डान्स मूव्हजवर नेटिझन्स त्यांना ट्रोल करतायत. पण ही नाचणारी व्यक्ती पाकिस्तानी मंत्री नसून मेहरोज बेग नावाचा एक विद्यार्थी आणि मॉडेल आहे. या व्हिडीओतील व्यक्ती बिलावल भुट्टो नाहीय, हे स्पष्ट झालंय.
बिलावल भुट्टो जरदारी यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली जाण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली. पाक नेते भुट्टो यांनी भारतानं सिंधूवर हल्ला केल्याचं म्हणत देशाला हल्लेखोर म्हटलं. भारताची लोकसंख्या आमच्याहून जास्त असेल मात्र पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानातही लढा देऊ, असं सांगत आमचा आवाजच भारताला सडेतोड उत्तर देईल याचाच पुनरुच्चार त्यांनी केला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीसुद्धा सिंधू जल कारारासंदर्भातील तणावपूर्ण वातावरणात आपल्या जळजळीत वक्तव्यानं आणखी भर टाकली. ‘पाकिस्तानला पुरवलं जाणारं पाणी कमी केलं किंवा वळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी याचं उत्तर पूर्ण ताकदीनं दिलं जाईल, कोणीही इथं काहीही चूक करुच नये’ असं म्हणत शांतता आमची प्राथमिकता असली तरीही अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीच तडजोड करणार नसल्याची भूमिका मांडत त्यांनीसुद्धा भारताविरोधात सूर आळवला.
