






पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, ५ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाबाबतची माहिती दिली. यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आल्या. तसेच, १५ मेपूर्वी दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.
● सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६), श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील.
● जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार आणि खासगी विद्यार्थ्यांसाठी ७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार.
● उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य.
● छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीद्वारे संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
● गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी https:// mahahsscboard. in या संकेतस्थळाद्वारे ६ ते २० मे या कालावधीत स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाइन अर्ज करण्याची सोय.


IPL 2025 Playoffs Scenario in marathi: आयपीएल २०२५ आता प्लेऑफच्या दिशेने जात आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरता सर्वच संघ प्रयत्नशील आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता प्लेऑफ गाठण्यासाठी ८ संघांमध्ये लढत होणार आहे. पंजाबचा संघ लखनौविरूद्ध सामन्यानंतर दुसऱ्या स्थानी पोहोचला. तर केकेआरच्या विजयाचाही लखनौला धक्का बसला आहे.
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २३६ धावा करत २३७ धावांचे आव्हान लखनौला दिले. पण लखनौचा संघ २० षटकांत फक्त २०० धावाच करू शकला, यासह पंजाबने ३७ धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह पंजाब संघाने टॉप-४ मध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. ११ सामन्यात १५ गुणांसह पंजाब दुसऱ्या स्थानी आहे. तर लखनौचा संघ १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. आरसीबीचा संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानी आहे.
पंजाब किंग्सच्या विजयामुळे ८ पैकी ३ संघांना पात्र ठरण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघांचा समावेश आहे.
सनरायझर्स हैदराबाद
पंजाब किंग्सचा संघ विजयामुळे १५ गुणांवर पोहोचला आहे. केकेआरविरूद्धचा त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला होता. पण आता पंजाब किंग्सचा संघ १५ गुणांवर पोहोचल्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ सर्व 4 सामने जिंकूनही त्यांच्यापुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आता हैदराबादच्या प्ले ऑफ च्या आशांना पूर्णविराम लागला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाताला प्लेऑफ गाठण्यासाठी आता सर्व सामने काही करून जिंकावे लागतील. याचबरोबर पंजाबने उर्वरित ३ सामन्यांपैकी एकच सामना जिंकावा अशी प्रार्थना करावी लागेल. याचबरोबर केकेआरला त्यांचा नेट रन रेटही सुधारावा लागणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स
लखनौला प्लेऑफ गाठण्याकरता उर्वरित सर्व सामने जिंकायचे होते. पण पंजाबबरोबरचा सामना त्यांनी मोठ्या फरकाने गमावला आहे. त्यामुळे पंजाब संघ अजून एक सामना जिंकला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
आरसीबीने उर्वरित ३ सामन्यांपैकी १ सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मुंबई इंडियन्सला प्लेऑफकरता ३ पैकी २ सामने जिंकावे लागतील. तिन्ही सामने जिंकले तर टॉप-२ मध्ये राहता येईल. गुजरातला ४ पैकी २ सामने जिंकावे लागतील. पंजाबला ३ पैकी १ सामना जिंकावा लागेल. दिल्लीला प्लेऑफकरता ४ पैकी ३ सामने जिंकावे लागतील.

मुंबई: नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अ चे लोकार्पण केव्हा होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. असे असताना या दोन्ही प्रकल्पाच्या लोकार्पणाचा १ मे चा मुहुर्त हुकला असून आता नवीन मुहुर्ताची प्रतीक्षा आहे. इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम पूर्ण झाले असून ७६ किमीचा हा टप्पा वाहतुकीसाठी सज्ज आहे. मात्र लोकार्पणासाठीची तारीख निश्चित होत नसल्याने लोकार्पण रखडले आहे. तर दुसरीकडे मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ साठी अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने या टप्प्याचे लोकार्पण रखडल्याचे चित्र आहे.
दोन्ही प्रकल्पाचे एकत्रित लोकार्पण
महाराष्ट्रा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ७०१ किमीच्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. तर टप्प्याटप्प्यात आतापर्यंत या प्रकल्पातील नागपूर ते इगतपुरी असा ६२५ किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. तर इगतपुरी ते आमणे या ७६ किमीच्या शेवटच्या टप्प्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. तसेच हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल असे वाटत होते. मात्र लोकार्पणाची प्रतीक्षा लांबली आणि शेवटी १ मे चा मुहुर्त निश्चित करत त्यादृष्टीने एमएसआरडीसी कामाला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ मे रोजी ते मुंबई दौऱ्यावर असताना शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन राज्य सरकारचे होते.
यासाठी पंतप्रधानांची वेळही मागण्यात आली होती. मात्र ही वेळ न मिळाल्याने १ मेचा मुहुर्त चुकल्याचे म्हटले जात आहे. तर त्याचवेळी मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ मुळेही समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणास विलंब होत असल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकारने समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे आणि मेट्रो ३मार्गिकेतील टप्पा २ अ चे एकाच दिवशी एकाच सोहळ्यात लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ साठी अद्याप मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने लोकार्पणा विलंब होत आहे. परिणामी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठीही वाट पाहावी लागत आहे.
लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता
याविषयी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता, लवकरच लोकार्पणाची तारीख जाहिर होईल, असे सांगितले. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडे (एमएमआरसी) याबाबत विचारणा केली असता सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षा असून यासंबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे एमएमआरसीकडून सांगितले जात आहे. एकूणच लोकार्पणाची तारीख अद्याप निश्चित नसून दोन्ही प्रकल्पाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे. दरम्यान बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, वरळी टप्पा २ अ सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी प्रवास भुयारी मेट्रोने अवघ्या काही मिनिटात करणे शक्य होणार आहे. इगतपुरी ते आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते मुंबई अंतर केवळ आठ तासात कापण्याचे मुंबईकरांचे स्वप्नही प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यामुळेच या दोन्ही प्रकल्पाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. येत्या दोन-तीन दिवसात लोकार्पणाची ताऱीख निश्चित होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

पुणे : शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार करण्यात गुंतलेला प्रशांत कांबळे उर्फ लॅपटाॅप याला राज्य दहशतवाद विराेधी पथकाने रविवारी पिंपरी-चिंचवड परिसरातील चऱ्हाेली भागातून अटक केली. ठाणे येथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेले १५ वर्ष फरार होता.
कांबळे याच्यविरुद्ध कांबळे याच्याविरुद्ध एटीएसच्या मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात बेकायदाशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये (यूएपीए) २०११ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. गेले काही वर्ष तो फरार होता. रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात आदिवासी पाड्यांमधील मुलांना शिकविण्याचे तो काम करत होता. शहरी भागात बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार तो करत होता. ओळख पटू नये म्हणून त्याने वेशांतर केले होते. एटीएसकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी करण्यात आला होते.
एटीएसच्या पुणे पथकाला कांबळे हा पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील चऱ्होली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी (३ मे) त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईतील न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एटीएसच्या पुणे पथकातील पोलीस निरीक्षक सुजाता कानवडे आणि पथकाने ही कारवाई केली.