



Mother’s Day 2025 Special Gift Ideas: ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हणतात, परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता आले नाही म्हणून त्याने प्रत्येकासाठी आई निर्माण केली. आई हा शब्दच जगावेगळा आहे. आईचे प्रेम आपण कधीही मोजू शकत नाही. आईसाठी तिचे मुलं हे जीव की प्राण असतात. मुलं सुखी राहावीत म्हणून आई वाट्टेल ते करते. खरं तर आईचे प्रेम खूप भाग्यशाली लोकांना मिळते. आईचं महत्त्व व स्थान आपल्या आयुष्यात सर्वात उच्च पदी आहे. या आईच्या प्रेमाची जाणीव असावी. तिच्याविषयी आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून एक खास दिवस असतो तो दिवस म्हणजे मातृ दिन म्हणजेच मदर्स डे.
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी संपूर्ण जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. या दिवशी मुले आईसमोर आपले प्रेम व्यक्त करतात. मुलांच्या सुखासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आईचे आभार मानायचा हा दिवस असतो.
या दिवशी कोणी आपल्या आईला छानसं गिफ्ट देऊन शुभेच्छा देतात. तुम्ही यंदा आईला कोणते गिफ्ट देणार आहात? जर अजून ठरले नसेल तर ही बातमी नक्की वाचा.
जर तुमच्या आईला पूजा करायला आवडत असेल तर तुम्ही पूजा थाळी किंवा देवाची एखादी सुंदर मूर्ती भेट म्हणून देऊ शकता. याशिवाय तुळशीचे रोप सुद्धा तिला भेट म्हणून देऊ शकता.
तुम्ही या मदर्स डे ला आईला सुंदर साडी गिफ्ट म्हणू देऊ शकता. साडी हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. जर तुमच्या आईला सलवार सूट आवडत असेल तर तुम्ही क्लासिक असा सूट सुद्धा आईला गिफ्ट देऊ शकता.
तुम्ही तुमच्या आईला सुंदर अशी पर्स गिफ्ट देऊ शकता. सिल्वर आणि गोल्डन रंगाची पर्स कोणत्याही आउटफिटवर मॅच होऊ शकते. जर तुमची आई वर्कींग महिला असेल तर तुम्ही ऑफिसला नेता येईल अशी ऑफिस हॅन्ड बॅग पण गिफ्ट देऊ शकता.
जर तुम्हाला माहितीये, तुमची आई कोणते प्रोडक्ट वापरते, त्या ठराविक ब्रॅण्डची तुम्ही तिला स्किन केअर किट गिफ्ट म्हणून देऊ शकता.
जर तुमच्या आईला फिट राहायला आवडतं किंवा तिने फिट आणि हेल्दी राहावं, अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या आईला यंदा मदर्स डे ला योगा मॅट गिफ्ट म्हणून देऊ शकता.
यंदा मदर्स डे ला तुम्ही तुमच्या आईला खूश करण्यासाठी एक सुंदर अशी फोटो फ्रेम गिफ्ट देऊ शकता. तिचा एकटीचा जुना तरुणपणातील फोटो किंवा तिचा आणि बाबांचा एकत्र फोटो, तुमच्या बरोबरचा एखादा सुंदर फोटो तुम्ही फ्रेम बनवून तिला गिफ्ट देऊ शकता.
जर तुमच्या आईला वाचनाची आवड असेल तर तुम्ही संबंधित तिच्या आवडीच्या विषयाचे पुस्तक तिला भेट म्हणून देऊ शकता. जर तिला कुकींग ची आवड असेल तर तुम्ही तिला पाककृतीचे सुद्धा पुस्तक देऊ शकता.
जर आईचा फोन जूना झाला असेल तर तुम्ही तिला छान एखादा स्मार्टफोन गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आईला एखादे सुंदर घड्याळ किंवा स्मार्ट वॉच सुद्धा गिफ्ट देऊ शकता.
जर तुम्हाला मदर्स डे गोड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आईसाठी खास केक किंवा चॉकलेट्स घेऊ शकता किंवा खास आईसाठी केक घरीच बनवू शकता.

चंद्रपूर : शेतमाल तारण न ठेवता बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ४६ लाख ५८ हजार ५० रुपये तीन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा खळबळजनक प्रकार वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उघडकीला आली. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निलंबित पर्यवेक्षकासह चार जणां विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सचिव चंद्रशेन शिंदे यांनी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गारघाटे यांच्यासह विजय कळसकर, गुरुदत्त कुळसंगे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता ४०६, ४०९, २४०,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाजार समितीत यापूर्वी कांदा अनुदानाता लाखोंचा घोटाळा झाला होता. याप्रकरणात पर्यवेक्षक कोमल गारघाटे यांना निलंबित केले होते. गारघाटे यांच्याकडे शेतमाल तारण योजनेची जबाबदारी होती. तारण योजनेत शेतमाल ठेवल्यानंतर शेतकऱ्याला मालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के रक्कम दिली जाते. गार घाटे याने २१ एप्रिल २०२२ ते १२ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये शेतमाल तारण योजनेत ठेवला नाही.
बनावट कागदपत्र तयार केली. वरोऱ्या येथील अनिल मधुकर तडसे याच्या बँक खात्यावर ३१ लाख ७७ हजार २५८, विजय पुंजाराम कळसकर (रा. परसोडा ) यांच्या बँक खात्यावर १९ लाख 85 हजार ३७२ आणि गुरुदत्त महादेव कुळसंगे याच्या बँक खात्यावर चार लाख ९५ हजार ४२० जमा केले. या तिघांच्या खात्यावर ४६ लाख ५८ हजार ५९ रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बँक खात्यातून वळते करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तारण योजनेत शेतमाल (सोयाबीन) जमा केले नव्हते. कांदा अनुदान घोटाळ्यात पर्यवेक्षक गारघाटे यांना आधीच निलंबित केले होते.

India Pakistan War : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच असून युद्धस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक मिसाईव आणि ड्रोन नष्ट केले. भारताने त्यांच्या तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या दाव्यावर भारताने पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी मोठा खुलासा केला आहे.
पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण पश्चिम सीमेवर आक्रमक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. पाकिस्तान ड्रोन आणि इतर लढाऊ विमानांचा वापर करून भारतीय लष्करावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. नियंत्रण रेषेवरही जड कॅलिबर आणि ड्रोन शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील श्रीनगर ते नालियापर्यंत 26 हून अधिक ठिकाणी हवाई घुसखोरीचे प्रयत्न केला. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानचे हल्ले उलथवून टाकले आहेत. मात्र, उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भुज, भटिंडा या हवाई दलाच्या तळांचे नुकसान झाले अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
पाकिस्तानने पहाटे 1.40 वाजता हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर करून पंजाबमधील एअरबेस स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एका निंदनीय कृत्यात, पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई दलाच्या तळांवरील वैद्यकीय केंद्रे आणि शाळेच्या परिसरांना लक्ष्य केले.
पाकिस्तानने नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करत आपल्या क्रीर वर्तनाचा आणखी एक पुरावा दिला आहे. पाकिस्तानने जाणूनबुजून लष्कर तळांवर हल्ले केले. भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठानांना टार्गेट केले. यामध्ये रफीकी, चकलाला, रहिमयार खान, मुरीद, सुक्कूर आणि चुनिया येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले.
आपल्या कारवाया लपवण्यासाठी पाकिस्तानने लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा गैरवापर केला. पाकिस्ताननेही अनेक खोट्या बातम्या पसरवल्या. भारताचे अनेक लष्करी तळ नष्ट केल्याचे खोटे दावे केले आहेत.
पाकिस्तानकडून भारताविरुद्ध सतत चिथावणी दिली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून, रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून भारतीय शहरांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सतत डागले जात आहेत. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानी हल्ले हाणून पाडले आहेत. शुक्रवारीही पाकिस्तानने भारतातील 26 शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून हल्ला केला होता.




पिंपरी : शहरातील २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे. हा आराखडा हरकती, सूचनांसाठी पुढील आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर सुनावणी होऊन आराखडा अंतिम करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नवीन आराखड्यात चऱ्हाेली, माेशी, रावेत, किवळे, मामुर्डी, ताथवडे या समाविष्ट गावांतील विकासाला संधी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २००२ मध्ये आराखडा तयार करून प्रसिद्ध करण्यात आला हाेता. त्याला २००८-०९ मध्ये मंजुरी मिळाली. या आराखड्याची मुदत २०२० मध्ये संपली. महापालिकेने नवीन आराखड्यासाठी २०१८ मध्ये इरादा प्रसिद्ध केला. आराखडा तयार करण्यासाठी गुजरातमधील ‘एचसीपी’ या संस्थेची नियुक्ती केली होती. दहा काेटी रुपयांमध्ये आराखडा तयार करण्यात आला आहे.
संस्थेने संपूर्ण शहरातील माेकळ्या जागांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) सर्वेक्षण केले. जागांचा प्रत्यक्ष वापर पाहिला. २०४१ पर्यंत शहराची लाेकसंख्या किती हाेईल. लाेकसंख्येच्या गरजेनुसार रस्ते, शाळा, उद्याने, रुग्णालयांसह मूलभूत सुविधांची आरक्षणे टाकण्यात आली आहेत. सर्वसाधारण सभेचे अधिकार असलेल्या प्रशासकांची मान्यता घेऊन आराखडा हरकती, सूचनांसाठी महापालिकेचे संकेतस्थळ आणि महापालिकेतील फलकावर प्रसिद्ध केला जाईल.
हरकतींसाठी एक महिन्याची मुदत दिली जाईल. सामाजिक संस्था, शहरातील आणि शहराबाहेरीलही नागरिक हरकत घेऊ शकतील. हरकतींवरील सुनावणीसाठी सात जणांची नियाेजन समिती स्थापन केली जाईल. ही समिती याेग्य हरकतींची शिफारस करेल. शिफारस स्वीकारण्याबाबतचा अधिकार सर्वसाधारण सभेकडे राहील. त्यानंतर झालेल्या बदलांसह सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने आराखडा शासनाकडे पाठविला जाईल.
महापालिकेच्या आराखड्याची २०२० मध्येच मुदत संपली. कराेना, लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता आणि विविध कारणांमुळे महापालिकेने १८ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ घेतली होती. या मुदतीत विकास आराखडा प्रसिद्ध न केल्यास शासनाकडे अधिकार जातील. त्यामुळे १८ मे पर्यंत आराखडा प्रसिद्ध करावा लागणार आहे.
महापालिकेत ताथवडे गावाचा २००९ मध्ये समावेश झाला आहे. या गावाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची मुदत २०३८ पर्यंत हाेती. परंतु, शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यामुळे ताथवडेचा आराखडा रद्द करण्यात आला आहे.
मागील विकास आराखड्याची १०० टक्के अंमलबाजवणी झाली नाही. केवळ ५० टक्के अंमलबजावणी झाली. रस्त्यांची कामे मात्र ६५ टक्के झाल्याचा दावा महापालिकेने केला.
नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हरकती, सूचनांसाठी ताे पुढील आठवड्यात प्रसिद्ध केला जाईल. सर्व प्रक्रिया हाेण्यास चार महिन्यांचा कालावधी लागेल.- प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

अहिल्यानगरः डोक्यात गोळी झाडून युवकाचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा सत्र न्यायालयाने पोपट गणपत आदमाने (रा. जवखेड दुमाला, पाथर्डी) याला जन्मठेप व एकूण ४२ हजार रुपये दंड ठोठावला. याशिवाय वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षाही देण्यात आली. पाथर्डीतील शिंगवे कामथ येथे ही घटना घडली होती.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी या खटल्याचा निकाल आज, शुक्रवारी दिला. खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील जी. के. मुसळे यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास पाथर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी केला. एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी, हवालदार अण्णासाहेब चव्हाण व अरविंद भिंगारदिवे यांनी साहाय्य केले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, शिंगवे कामथ येथील योगेश एकनाथ जाधव याचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला, या गोष्टीचा राग मनात धरून कट करून, पोपट आदमाने हा २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी कामत शिंगवे येथे गेला व घरात घुसून बाजेवर झोपलेल्या योगेश जाधव याच्या डोक्यात बंदुकीने गोळी मारून ठार मारले. योगेशचे वडील एकनाथ, वसंत खाटीक, नंदा जाधव, दीपा जाधव हे सोडवण्यासाठी मध्ये पडले असता पोपट आदमाने याने त्यांच्यावर तलवारीने वार करून जखमी केले व त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. एकनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.