



Satara: सातारा जिल्ह्यातील लोणंद-सातारा मुख्य रस्त्यावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या इचलकरंजी येथील भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Satara Accident)
या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. यामध्ये मृत ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय 24), आणि रजनी संजय दुर्गुळे वय 48 रा.पेठ वडगाव तालुका हातकलंगले अशी नावे आहेत. पुढील तपास सुरु आहे..
सातारा-लोणंद मार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून समजली माहिती अशी, इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक (एम एच 04 सीपी 2452) ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे चा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक क्रमांक (एम एच 42 बीएफ 77 84) हा ट्रक सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या विषयात टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले .याबाबतची नोंद करण्याचे काम लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते .पुढील तपास सातारा पोलिस सुशील भोसले करीत आहेत.
हेही वाचा:
अधिक पाहा..


चंद्रपूर: शनिवारी सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आज रविवार ११ मे रोजी सकाळी मूल तालुक्यातील महादवाडी येथे जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या विमला बुधा शेंडे (६८) हिचेवर वाघाने हल्ला केला असता तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जिल्ह्यात तेंदुपत्ता हंगाम सुरू आहे. तेंदू पाने गोळा करण्यासाठी गावातील महिला, पुरुष, मूल, मुली सकाळीच जंगलात जातात. उन्हाच्या तीव्रतेने पाण्याच्या शोधात वाघ जंगलात फिरत असतो. त्याच वेळी तेंदुपत्ता तोडण्याचे काम सुरू असते.
जंगलात माणसाला बघून वाघ हल्ला करतात. शनिवारी सिंदेवाही तालुक्यात अशाच प्रकारे तीन महिलांचा मृत्यू झाला. तर आज रविवारी मुल तालुक्यातील महादवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात विमल बुधा शेंडे ही महिला ठार झाली. नागाला या गावातील रहिवासी असलेली विमला गावातील महिलांसोबत सकाळीच जंगलात गेली होती यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विमाला हिचेवर हल्ला केला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटना महादवाडी पिंपळखुट बीट येथे कक्ष क्रमांक ५३७ मध्ये घडली. माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गावात वाघाची भीती व तणावाचे वातावरण आहे.
Harshvardhan Sapkal : काँग्रेसचे (Congress) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी कराड येथील प्रीतिसंगमावर भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) हत्येवरून खळबळजनक विधान केले आहे. “महात्मा गांधींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा पक्ष आहे. या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं. काँग्रेसचे दोन पंतप्रधान शहीद झाले. पण काही लोकांना ना इतिहासाची जाणीव आहे, ना स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची. गांधी हत्येला विसरणं म्हणजे देशाच्या मूलभूत मूल्यांवरच घाला आहे. महात्मा गांधींची हत्या ही केवळ हत्या नव्हे, ती एक विचारधारेवर झालेली दहशतवादी कारवाई होती, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या (BJP) वाटेवर असल्यानं काँग्रेस संपणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसचा आणि देशाचा डीएनए एक आहे. काँग्रेसचे विचार, धोरणे आणि परंपरा या लोकजीवनातून आल्या आहेत. देशात लोकशाही उभी करणारा, स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस पक्ष डुबणं कदापि शक्य नाही. टीका करणाऱ्यांना देशाचा इतिहास माहीत नाही, स्वातंत्र्य सैनिकांची किंमत नाही. दोन पंतप्रधानांचं बलिदान ते विसरत आहेत. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवाद होता, असं त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचं, याचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आला आहे.’काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची दीर्घकालीन भूमिका राहिली असली, तरी त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की काँग्रेसमुक्त भारत कधीच शक्य नाही. उलट परिस्थिती अशी आहे की, भाजप पक्षच आता काँग्रेसयुक्त होत चालला आहे. काँग्रेसमधून अनेक नेते वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले असले, तरी काँग्रेस पक्ष संपलेला नाही आणि भविष्यातही संपणार नाही. काही नेते अडचणींमुळे पक्ष सोडत असतील, पण खरे काँग्रेस कार्यकर्ते मात्र आजही पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..

India Pakistan Tension Impacts : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या सीमाभागात असणाऱ्या तणावाचे दूरगामी परिणाम सद्धा स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. रेल्वे आणि हवाई वाहतूक या युद्धजन्य परिस्थितीमुळं प्रभावित झाली असून, कमीजास्त प्रमाणात नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण कायम आहे. शनिवारी पाकिस्तानशी भारतानं शस्त्रसंधी करत दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाल्याचं वृत्त समोर आलं असलं तरीही देशाच्या सीमावर्ती भाग किंवा त्यानजीकच्या भागांमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी मात्र हा तणाव पाहता आपला निर्णय बदलल्याचं स्पष्ट होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार पुण्यातून देशाच्या सीमावर्ती भागात जाणाऱ्या रेल्वे तिकिटांच्या रद्द होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. पुण्याहून जम्मू, काश्मीर, राजस्थान, जयपूर, जोधपूरसारख्या सीमावर्ती भागांमध्ये जाणाऱ्या रेल्वेची तिकिटं प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर रद्द केली आहेत. सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे रेल्वे प्रवासी वाहतुकीवर थेट परिणाम दिसून येतोय.
गेल्या काही दिवसांत या मार्गांवरील गाड्यांना जबरदस्त मागणी होती. सुट्ट्यांचा माहोल, उकाडा यामुळं उत्तरेकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढता होता. इतकंच काय तर रेल्वेची प्रतीक्षा यादी (Indian Railway Waiting List) 300-350 पर्यंत गेली होती. मात्र, हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्याही तिकीट रद्दीकरणात लक्षणीय वाढ झाली.
पुणे-जम्मू तावी एक्सप्रेस (11077):
सेकंड एसी: 98 वरून 14
थर्ड एसी: 287 वरून 57
स्लीपर: 376 वरून 99
पुणे-जयपूर एक्सप्रेस (12939):
फर्स्ट एसी: 12 वरून 9
सेकंड एसी: 56 वरून 20
थर्ड एसी: 143 वरून 59
स्लीपर: 164 वरून 64
पुणे (हडपसर)-जोधपूर एक्सप्रेस (20496):
सेकंड एसी: 19 वरून 8
थर्ड एसी: 43 वरून 20
स्लीपर: 186 वरून 45
सहसा उन्हाळी पर्यटनासाठी प्रवाशांची प्रचंड झुंबड उडत होती, पण आता यद्धजन्य परिस्थितीनंतर हे चित्र बदललं असून प्रतीक्षा यादी 150 ते 200 ने घसरली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (बीएसई कोड ५४४२८९)
वेबसाइट: https://ngel.in/ngel-home
प्रवर्तक: एनटीपीसी लिमिटेड
बाजारभाव: रु. ९७/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: हरित ऊर्जा
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ८,३२६.३३ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ८९.०१
परदेशी गुंतवणूकदार १.९८
बँक/ म्यु. फंड/ सरकार ४.८७
पुस्तकी मूल्य: रु.२१.६
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: ००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ०.४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २३८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९
डेट इक्विटी गुणोत्तर: २.२२
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १.७
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (ROCE): ७.६०
बाजार भांडवल: रु. ८२,१७३ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १५५/८५
एप्रिल २०२२ मध्ये स्थापन झालेली, एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसी लिमिटेडची एक उपकंपनी आहे, जी अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. विशेषतः सौर, पवन आणि हरित हायड्रोजन यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेच्या स्रोतांवर तसेच सेंद्रिय आणि अजैविक मार्गांनी प्रकल्प हाती घेण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करते.
प्रकल्प/ उत्पादन पोर्टफोलिओ
एकूण अक्षय्य ऊर्जा क्षमता: २६,०७१ मेगावॉट
कार्यरत: ३,३२० मेगावॉट (३,२२० मेगावॉट सौर, १०० मेगावॉट पवन).
करार/पुरस्कृत: १३,५७६ मेगावॉट (१०,५७६ मेगावॉट सौर, ३,००० मेगावॉट पवन).
निर्माणाधीन: ९,१७५ मेगावॉट (६,९२५ मेगावॉट सौर, २,२५० मेगावॉट पवन).
कंपनीचे केंद्र आणि राज्य सरकारी संस्था आणि सार्वजनिक उपयोगितांसह १७ करार झाले आहेत, जे २५ वर्षांच्या वीज खरेदी सामंजस्याद्वारे स्थिर, दीर्घकालीन रोख प्रवाह सुनिश्चित करतात.
महसूल विभाजनः (आर्थिक वर्ष २०२४)
सौर ऊर्जा विक्री – ९१%
पवन ऊर्जा विक्री – ४.५%
इतर – ४.५ %
कंपनीचे तिची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जीसह, भारतातील सहा राज्यांमध्ये पवन तसेच सौर प्रकल्प कार्यरत आहेत, ज्यामध्ये राजस्थानने एकूण क्षमतेच्या ६२.२ टक्के योगदान दिले आहे. कंपनीचे १८ सौर ऊर्जा प्रकल्प, तर गुजरातेत दोन पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. कंपनी लवकरच हयड्रोजन ऊर्जा प्रकल्प हातात घेईल. कंपनीचा १५० मेगावॉटचा गुजरात पीव्ही सोलर प्रकल्प नुकताच कार्यान्वयित झाला आहे.
संयुक्त उपक्रमः
१. एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (एनआरईएल)
एनआरईएल ही एनटीपीसी ग्रीन एनर्जीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. एनजीईएलच्या पोर्टफोलिओअंतर्गत अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावते.
२. ग्रीन व्हॅली रिन्यूएबल एनर्जी
३. इंडियन ऑइल एनटीपीसी ग्रीन एनर्जी
मार्च २०२४ अखेरपर्यंत कंपनीकडे ३,०१७ मेगावॉट सौर आणि १०० मेगावॉट पवन ऊर्जा प्रकल्प कार्यरत होते, आणि ११,७७१ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प विकासाधीन होते. भारत येत्या पाच वर्षात ५०० गिगावॉट अक्षय्य ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. ज्यामुळे या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. कंपनीला अदानी ग्रीन, रिन्यू पॉवर, टाटा पॉवर रिन्यूअल्स यासारख्या प्रतिस्पर्ध्यांकडून तगडी स्पर्धा अपेक्षित असली तरीही एनटीपीसीसारखी उत्तम प्रवर्तक आणि सरकारी पाठिंबा यामुळे एनटीपीसी ग्रीन एनर्जीची विश्वासाहर्ता वाढते.
डिसेंबर २०२४ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ५०५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६६ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला होता, तर मार्च २०२४ साठी संपलेल्या म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १,९६३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. अर्थात पुढील पूर्ण वर्षाचे निकाल आणि सुरू होणारे प्रकल्प कंपनीची वाटचाल दाखवतील. कंपनी व्यवस्थापनाच्या अंदाजानुसार कार्यादेश (ऑर्डर बुक) वाढते राहून मूल्यांकन वाढण्यास मदत करेल तसेच कर्जफेडीला हातभार लावेल. सध्या १०० रुपयांच्या आत उपलब्ध असलेला हा शेअर एक प्रदीर्घ गुंतवणूक म्हणून पोर्टफोलियोत असायला हरकत नाही.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
