


एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याची अमेरिकेत खूप चर्चा आहे. या चर्चांना एका पोस्टने बळ दिले आहे ज्यात दोन मुद्दे लिहिले गेले आहेत. ही संख्या ८६ आणि ४७ आहे. या दोघांच्या डिकोडेड व्हर्जननुसार जेम्स कोमी यांनी ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. जेव्हा हा वाद वाढला तेव्हा जेम्स कोमीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट डिलीट केली आणि स्पष्ट केले की या नंबर्सचा हिंसेशी काही संबंध आहे हे आपल्याला माहित नाही. आता प्रश्न असा आहे की ‘८६ ४७’ लिहिणे हा वादाचा विषय का बनला आहे.
Jaykumar Gore vs Ramraje Naik Nimbalkar : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस (Vaduj Police) माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समन्स बजावले होते. संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू केली आहे, वडूज पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजे यांच्यासह 11 जणांना समन्स बजावले आहे. या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. या प्रकरणातील संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते. मला गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. ज्यावेळी मला पत्र आलं त्यावेळी मी त्रास होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून याबाबतची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना घटनेबाबत सांगितली. मात्र, त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही. माझी बदनामी होत असल्याचं त्या महिलेने म्हटलं होतं, यावरून मंत्री गोरेंना विरोधकांनी धारेवर धरलं होतं, त्यानंतर या प्रकरणात कारवाई करत संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या प्रकरणी ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तुषार खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडूज, दहवडी, म्हसवड, तलभीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला आहे.
गोरे यांनी यावर अधिवेशन चालू असताना स्पष्टीकरण दिलं होतं, “2017 साली माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे.” याप्रकरणी आता चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील समन्स पाठवण्यात आलं आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..

Zomato Gold New Rules: कधीकाळी एका जागी बसून जेवण घरी मागवण्यासाठी थेट हॉटेलला फोन लावले जात होते. बऱ्याचदा तुमच्या भागात डिलीव्हरी देत नाही असं म्हणून कैक ग्राहकांच्या ऑर्डर नाकारण्यातही आल्या. हीच परिस्थिती सुधारली ती म्हणजे बहुविध फूड डिलीव्हरी अॅप्सनी. त्यातही विशेष लोकप्रिय ठरलं ते म्हणजे Zomato App.
फूड डिलीवरी प्लेटफॉर्म Zomato नं सातत्यानं ग्राहकांसाठी काही कमाल ऑफर्स आणल्या. मात्र, आता हीच कंपनी खातेधारकांकडून नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या धर्तीवर जास्तीचे पैसे घेण्याच्या तयारीत दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही. झोमॅटोनं नुकताच गोल्ड मेंबरशिप नियमांमध्ये काही बदल केले असून, फूड डिलीव्हरीवर वाढीव रक्कम घेण्याची तयारी केली आहे.
16 मे पासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार झोमॅटोला फूड डिलीव्हरी अॅपवर वाढीव रक्कम द्यावी लागणार आहे. सहसा झोमॅटो गोल्डधारकांना पावसाच्या दिवसांमध्ये सरचार्ज लावला जात नव्हता. मात्र आता ही सूट मिळणार नसून, कंपनीनं एका नोटीफिकेशनच्या माध्यमातून अॅप युजर्सना याची कल्पना दिली आहे. ’16 मे नंतर पावसाच्या दिवसांमध्ये फूड डिलीव्हरीवर सरचार्ज माफ केलं जाणार नसून ही सुविधा आता झोमॅटो गोल्ड बेनिफ्ट्समध्ये गणली जाणार नाही’, असं या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं गेलं.
पावसाळी दिवसांमध्ये डिलीव्हरी पार्टनर्सना काम करणाना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये वाढीव रकमेच्या माध्यमातून कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्याचा मानस बाळगत आहे. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असून, सरचार्ज नेमका किती असेल याबाबतची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. या निर्णयामुळं झोमॅटो हे अॅप वापरणाऱ्या आणि त्यातही झोमॅटो गोल्ड वापरणाऱ्यांना मात्र भुर्दंड सोसावा लागणार हे खरं.
झोमॅटोनं एक सुविधा बंद केली असली तरीही काही सुविधा मिळणं मात्र सुरूच राहणार आहे. जिथं, 7 किमीच्या अंतरापर्यंत फ्री डिलीव्हरी, 30 टक्के रेस्तराँ डिस्काऊंट अशा सुविधांचा समावेश आहे. झोमॅटो गोल्डमध्ये काही निवडक पार्टनर रेस्तराँमध्य फ्री डिलीव्हरीचा फायदा युजर्सना घेता येतो. मात्र Domino’s सारख्या स्वत:ची डिलीव्हरी सर्विस देणाऱ्यांचा मात्र या यादीत समावेश नाही. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे झोमॅटोकडून सणावारांच्या दिवसांमध्येसुद्धा फूड डिलीव्हरीच्या नावाखाली जास्तीचे पैसे आकारले जातात. कंपनीच्या स्पष्टीकरणानुसार इतर काही गोष्टींसाठीचा खर्च या वाढीव रकमेतून केला जातो. एकिकडे कंपनीकडून हे धोरण लागू केलं जात असलं तरीही वाढणाऱ्या रकमेचा भार अॅप युजर्सना मात्र सहन होत नसून अनेकांनीच या अॅपसाठी पर्याय शोधण्यासही सुरूवात केली आहे हीच वस्तूस्थिती.



Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज शुक्रवारी सोन्याच्या दरात किचिंत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 16 May 2025)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १६ मे २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९३,२८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८५,५०७ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९५,७२० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९५७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
| शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
| मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८५,३६० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ९३,१२० प्रति १० ग्रॅम आहे. |
| पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८५,३६० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ९३,१२० रुपये आहे. |
| नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८५,३६० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ९३,१२० रुपये इतका आहे. |
| नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८५,३६० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ९३,१२० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

ज्युलिओ रिबेरो
पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. हल्ला एवढा भयंकर होता की पंतप्रधानांनी जातीने उपस्थित राहून जबाबदारी घेणे गरजेचे होते, त्यामुळे ते दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले.
त्यानंतर झपाट्याने घडलेल्या घटना आणि भारताने दिलेले प्रत्युत्तर याचा विचार करता मोदींची कामगिरी उत्तम होती, असे निश्चितच म्हणता येईल. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सर्व गणिते बरोबर जुळवून पत्ते टाकले आणि म्हणूनच त्यांचे पारडे जड झाले. या बळावर मोदी आणि त्यांचा पक्ष पुढील काही निवडणुकांत यश मिळवू शकतील. भाजपसाठी निवडणुका जिंकण्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांची त्यांच्या मतदारांवरील पकड मजबूत झाली आहे. माझ्या ओळखीच्या बहुतेकांनी या कठीण काळातील मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाची समस्या दूर होईल, हे गृहितक चुकल्याचे पहलगाम हल्ल्यामुळे सिद्ध झाले. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचे जाहीर झाले तेव्हा मी दक्षिण मुंबईतील ‘इंडियन मर्चंट्स चेंबर’मध्ये एका व्याख्यानाला उपस्थित होतो. तेथील काही पत्रकार माझ्याकडे आले आणि माझी त्यावरीव प्रतिक्रिया विचारू लागले. मी म्हटले, “मी या वेळी जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी असतो, तर माझे काम काही काळासाठी सोपे झाले असते परंतु केंद्र सरकार जोपर्यंत तेथील लोकांची मने जिंकत नाही, तोपर्यंत दहशतवादाला आळा घालणे आणि तेथील स्थानिकांची नाराजी दूर करणे शक्य नाही.” पोलीस खात्यात ३६ वर्षे काम केल्यानंतर मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की, जनतेच्या सक्रिय सहकार्याशिवाय पोलिसांची ताकत प्रभावी ठरू शकत नाही. स्थानिकांच्या सहकार्याला पर्याय नाही, हे पोलिसांना स्वीकारावेच लागेल.
पहलगाम हल्ला स्थानिक रहिवाशांमधील काही असंतुष्ट घटकांच्या मादतशिवाय शक्यच नव्हता. घटनेनंतर लगोलग जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या आदेशाने संशयितांची डझनभर घरे उद्ध्वस्त केली गेली. नायब राज्यपालांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल टाकले. काश्मिरात असे पाऊल उचलण्याची काहीच गरज नव्हती. ज्यांच्यावर काश्मिरी जनतेचे पोटापाण्याचे व्यवसाय अवलंबून आहेत, अशा पर्यटकांनाच लक्ष्य करण्यात आल्याने स्थानिकांत आधीच दहशतवाद्यांविषयी असंतोष निर्माण झाला होता. या नाराजीचा लाभ घेत केंद्र सरकार त्यांना आपल्या बाजूने वळवू शकले असते, पण सरकारने ती संधी गमावली. केवळ दहशतवाद्यांशी लागेबंधे असल्याच्या संशयावरून घरांमध्ये स्फोट घडवून आणण्यास सुरुवात करण्यात आली. हल्ल्यांवरील प्रतिसादासंदर्भात प्रशासनाने जी बैठक घेतली, त्यात एकही सूज्ञ आवाज उमटला नाही, हे आश्चर्यकारकच!
मात्र पुढे तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांनी पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि एनएसएशी सल्लामसलत करून उत्तरादाखल पाकव्याप्त काश्मीर, पंजाब आणि पख्तूनवा येथील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले आणि गमावलेले विश्वास पुन्हा प्राप्त केला. मुरीदके आणि भावलपूर येथील मसूद अझहरच्या ठिकाणांवर केलेले हल्ले विशेष उल्लेखनीय ठरले.
डिसेंबर १९९९ मध्ये काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून त्यातील प्रवाशांना सोडण्याच्या मोबदल्यात सरकारने ज्या तीन दहशतवाद्यांना मुक्त केले होते, त्यापैकी मसूद अझहर हा एक होता. त्याच्या सुटकेनंतर तो आयएसआयचा सर्वांत मोठा हस्तक बनला आणि जेवढ्या प्रवाशांच्या मोबदल्यात त्याला सोडण्यात आले होते, त्यापेक्षा कितीतरी अधिक सामान्य नागरिकांच्या हत्येस कारणीभूत ठरला.
त्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर भारतीय सैन्याने हल्ल्यांमध्ये त्याच्या जवळच्या नातेवाईकांपैकी अनेकांचा मृत्यू झाला, त्यापैकी काही जण त्याच्या द्वेषपूर्ण आणि विध्वंसक कारवायांत सक्रिय सहभागी होते. आपल्या सरकारने आधीच स्पष्ट केले होते की, केवळ दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ले केले जातील आणि तेही रात्रीच्यावेळी- जेव्हा सामान्य नागरिकांचा त्या परिसरात वावर नसेल तेव्हाच केले जातील. तरीही, जनरल मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने आपल्या लष्कराच्या आणि हवाई दलाच्या आस्थापनांना लक्ष्य करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या दोन दिवस चाललेल्या धुमश्चक्रीत दोन्ही देशांना त्यांनी अन्य विविध देशांकडून मिळविलेल्या त्यांच्या शस्त्रास्त्रांची, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची अचुकता व कार्यक्षमता तपासण्याची संधी मिळाली. उदाहरणच द्यायचे तर एर्दोगान यांनी पाकिस्तानला भेट म्हणून दिलेली तुर्की बनावटीची क्षेपणास्त्रे तुलनेने निरुपयोगी असल्याचे स्पष्ट झाले. आपण रशियाकडून मिळवलेले ब्राह्मोस खरोखरच विनाशकारक असल्याचे सिद्ध झाले. त्याच्या साहाय्याने पाकिस्तानचे तीन हवाई तळ उध्वस्त केले गेले.
दोन्ही देशांच्या वृत्तवाहिन्यांनी या हवाई युद्धाचे विभिन्न पद्धतीने वृत्तांकन केले. अशा वैमनस्याच्या काळात ते स्वाभाविकच होते, पण या वृत्तांकनाचा अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यालाही विमानांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे निष्पन्न होते. अर्थात आपण वैमानिक गमावला नाही, ही त्यातील जमेची बाजू. प्रत्यक्षात काय घडले, हे पुढे येईलच, पण ते एवढ्यात स्पष्ट होणार नाही. त्याला बराच वेळ लागेल. आपले जवान शहीद झाले असतील, तर त्यांच्या नातेवाईकांना कळवल्यावर ते आपल्यालाही कळेलच. नियंत्रण रेषेच्या आपल्या बाजूला विमानाचे अवशेष आढळल्यास ते तुलनेने लवकर कळेल.
युद्धविरामसाठी अमेरिकेने त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मध्यस्थी केली की नाही वगैरे वाद अप्रस्तुत ठरतात. १० मेच्या संध्याकाळपासून गोळीबाराची एकही घटना घडलेली नाही हे महत्त्वाचे. पाकिस्तान असो वा आर्थिकदृष्ट्या तुलनेने प्रगत असलेला भारत असो, दोन्ही देशांना युद्ध परवडणारे नाही. मोदींनी आपली अर्थव्यवस्था २०३० पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे जे धाडसी उद्दीष्ट ठेवले आहे, ते साध्य करणे अशा घटनांमुळे काही प्रमाणात अवघड होईल. कदाचित स्थिती पूर्वपदावर येण्यास दोन- तीन किंवा त्याहूनही अधिक वर्षे लागतील.
पंतप्रधानांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून उत्स्फूर्त भाषण केले आणि दहशतवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नसल्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा माग काढून त्यांना निष्प्रभ करण्याचे पूर्ण अधिकार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात यावेत. बर्लिन ऑलिंपिकमध्ये सहभागी इस्रायली खेळाडूंची हत्या झाल्यानंतर मोसादने अशी अतिशय नियोजनबद्ध कारवाई केली होती. दहशतवादाचा वणवा पेटता ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयएसआयला तसाच धडा शिकवणे गरजेचे आहे.
यापलीकडे जाऊन, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जम्मू-काश्मीरमधील समस्या सोडवण्यासाठी मोदींना त्यांच्या आक्रमक दृष्टिकोनाचा पुनर्विचार करावा लागेल आणि त्यात सुधारणा करावी लागेल. तेथील दहशतवादाचा अंत करण्यासाठी स्थानिकांची मने जिंकावी लागतील. तेथील रहिवाशांना आदर आणि सन्मानाने वागवावे लागेल. ही जबाबदारी नेहमीच भारताचे समर्थन करत आलेल्या अब्दुल्ला कुटुंबाकडे सोपवता येईल. काश्मीर समस्या सोडविण्यासाठीच्या प्रयत्नांतील अब्दुल्ला कुटुंबाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे समजून घेण्यासाठी वाचकांनी चंद्रशेखर दासगुप्ता यांचे ‘वॉर अँड डिप्लोमसी इन काश्मीर १९४७-४८’ आणि रॉचे माजी अध्यक्ष अमरजीत सिंग दुलत यांचे अलीकडचे ‘द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय’ ही पुस्तके वाचली पाहिजेत.
ज्युलिओ रिबेरो (लेखक मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त आहेत.)

