


अहिल्यानगरः पंतप्रधानांसारख्या व्यक्तीविषयी केलेल्या टीकाटिप्पणीबद्दल शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, शुक्रवारी अहिल्यानगरमध्ये बोलताना केली. मंत्री राधाकृष्ण विखे आज खरीप हंगामा आढावा बैठकीसाठी नगरमध्ये होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
संजय राऊत यांच्या पुस्तकात पंतप्रधान गृहमंत्री यांच्याबद्दल केलेल्या टीकाटिप्पणीकडे, बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांना वाचवले असा उल्लेख पुस्तकात केल्याकडे लक्ष वेधले असता, मंत्री विखे म्हणाले, ‘संजय राऊत विकृती आहे. त्यांचा मी निषेध करतो. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविषयी बोलणे, लिहिण्याची त्यांची पात्रता नाही. त्यांनी आधी स्वतःच्या पायाखाली काय जळते आहे ते पहावे.’
त्यांचे मुंबईतील भूखंडाचे घोटाळे बाहेर काढले तर त्यांच्या नेत्यांबद्दल स्वतंत्र पुस्तकच छापावे लागेल, अशी टीकाही विखे यांनी बोलताना केली.पंतप्रधानांसारख्या पदाची गरिमा ठेवली गेली पाहिजे. परंतु ज्यांनी जनाधार गमावला आहे, लोकांचा ज्यांच्यावर विश्वास राहिला नाही, त्यांचा अशाप्रकारे पुस्तके लिहून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई व्हायला हवी, असे विखे म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना मंत्री विखे म्हणाले की, या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत, अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी वेगळा विचार होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे.




India Pakistan Tensions : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहणार असल्याचं एस.जयशंकर यांनी म्हटलंय. तसंच पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत देखील एस.जयशंकर यांनी संवाद साधलाय.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. जोपर्यंत पाकिस्तानकडून सुरू असलेला दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहणार असल्याचं एस. जयशंकर यांनी म्हटलंय, पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिलाय. तसंच दहशतवाद्यांना लपण्यासाठी देखील पाकिस्तान मदत करतो. त्यामुळे याचा फटका पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसतोय. त्यामुळे वेळीच पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर आळा न घातल्यास पाण्याच्या थेंबाथेंबासाठी त्यांना तरसावं लागणार.
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळावरच हल्ला केला हे पाकिस्तानला आम्ही सांगितलं होतं
पाकिस्तानी सैन्याला यात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला देखील दिला होता
मात्र, पाकिस्तानी सैन्याला दिलेला पर्याय त्यांनी स्वीकारला नाही
भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकचं मोठं नुकसान झालं, त्याचे पुरावे देखील दिले
त्यामुळे युद्धबंदी कोणाला हवी होती? हे यावरून स्पष्ट होतं
भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रबंदी झाली असली तरी भारताचे परराष्ट्रमंत्री अनेक देशांच्या संपर्कात आहेत. एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री यांच्यासोबत चर्चा केलीय.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिल्यांदाच तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अधिकृत संवाद साधला.
हा संवाद ऐतिहासिक ठरलाय. कारण भारताने तालिबान प्रशासनाशी केलेला हा पहिला मंत्रीस्तरीय संपर्क आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. दरम्यान यानंतर पाकिस्तान भारताला नेहमीच पोकळ धमक्या दिल्यात. मात्र, भारत-पाकमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर सिंधू पाणी करारावरची स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी पाकिस्ताकडून करण्यात येतेय मात्र, जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणं पाकिस्तान बंद करत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहणार असल्याचा इशारा भारताकडून देण्यात आला आहे.


पाकला पाठिंबा देणं तुर्कीएला चांगलंच भोवणार आहे. व्यापारापाठोपाठ आणि जेएनयू विद्यापीठाने तुर्कीएच्या इनोनू विद्यापीठासोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जेएनयू विद्यापीठ देशासोबत आहे हे दर्शवण्यासाठी हा करार स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे तुर्कीएची मोठी अडचण होणार आहे.
– पाकला पाठिंबा देणं तुर्कीच्या अंगलट
– तुर्कीएची चारही बाजूंनी कोंडी
– व्यापारापाठोपाठ शैक्षणिक करारही स्थगित
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच आता तुर्कीए देशही चारही बाजूने अडकला आहे. पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देण्याच्या निर्णयावर तुर्कीएला आता पश्चाताप व्हायला सुरुवात झाली असेल. कारण व्यापार, पर्यटनापाठोपाठ आता शैक्षणिक क्षेत्रातही तुर्कीएला धक्का बसला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयूने तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार स्थगित केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या तुर्कीएतील विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कीएच्या अंगलट आलं आहे. जेएनयूने एक्स पोस्ट करून करार स्थगित केल्याची घोषणा केली आबे.
– 3 फेब्रुवारी 2025 रोजी जेएनयूचा तुर्कीच्या विद्यापीठासोबत करार
– 2 फेब्रुवारी 2028पर्यंत कराराची वैधता
– राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव करार स्थगित
– तुर्कीएच्या भारतविरोधी भूमिकेमुळे जेएनयूचा निर्णय
तुर्कीएवर भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सींनी बहिष्कार टाकला आहे. तुर्कीसोबतच्या सर्व व्यापा-यांवर भारतीय व्यावसायिकांनी बॉयकॉट केला आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडणार असणा-या तुर्कीएची मात्र खोड मोडत नाही. तुर्कीएचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी पाकच्या पंतप्रधानांना फोन करून पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवला आहे.
– ट्रॅव्हल्स एजन्सींचा बहिष्कार
– टूर पॅकेजेस आणि अनेक बुकिंग रद्द
– तुर्कीएच्या सफरचंदावर बहिष्कार
– मार्बल व्यावसायिकांकडून तुर्कीएचा बॉयकॉट
– तुर्कीएच्या ‘TRT वर्ल्ड’ अकाऊंटवर भारतात बंदी
– मुंबई विमानतळावरील ड्रॅगन पासची सेवा स्थगित
– तुर्कीएची कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द
सेलेबी कंपनीवर कारवाईमुळे कंपनीमध्ये काम करणारे 4000 मराठी मुलं बेरोजगार होणार आहेत. यासाठी शिवसेनेनं आंदेलन केलं. यापुढे ज्या कोणत्या कंपनीला कंत्राट दिलं जाईल त्या कंपनीनं या तरुण-तरुणींना कामावार ठेवावं अशी मागणी शिवसेनेच्या मुरजी पटेलांनी केलं आहे.
भारताने कायम तुर्कीएला अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला. तुर्कीएमध्ये झालेल्या भूकंपामुळे त्यांना सर्वात आधी मदत करणारा भारत देशच होता. मात्र तुर्कीएनं या उपकाराची परतफेड पाकिस्तानला शस्त्र पुरवून केलीये. त्यामुळे तुर्कीएला भारतीयांच्या संतापाला आणि बहिष्काराला सामोरं जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा विलंबाने धावेल.
मुख्य मार्ग
कुठे : ठाणे – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे विलंबाने पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद लोकल कल्याण – ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल, एक्स्प्रेस ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथे येणाऱ्या अप मेल, एक्स्प्रेस कल्याण – ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
कुठे : वडाळा रोड – मानखुर्ददरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत
परिणाम : ब्लॉक काळात वडाळा रोड – मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल / बेलापूर / वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावरील लोकल सेवा सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ दरम्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर / वाशी दरम्यानची लोकल सेवा सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५४ दरम्यान डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील. ब्लॉक काळात पनवेल – मानखुर्द – पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४.३० दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गिका / मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Chanakya Niti for happy married life: आचार्य चाणक्य यांनी सामाजिक कल्याणासाठी एक धोरण तयार केलं होतं, ज्याला ‘चाणक्य नीति’ असं म्हणतात. या धोरणात करिअर, यश, संपत्ती, मैत्री, प्रेमसंबंध, सन्मान आणि वैवाहिक जीवन यासह जवळपास प्रत्येक विषयाशी संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत. असं मानलं जातं की चाणक्याची धोरणं आजही तितकीच प्रासंगिक आहेत जितकी हजारो वर्षांपूर्वी होती.
आचार्य चाणक्यजींनी त्यांच्या नीतिशास्त्रात स्त्रियांबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की, स्त्री एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते, मग ती आई म्हणून असो किंवा बहीण, मुलगी, मित्र आणि पत्नी म्हणून. स्त्रियांमध्ये तिच्या गुणांनी माणसाचं नशीब बदलण्याची ताकद असते. चाणक्य नीतीमध्ये पुरुषांसाठी भाग्यशाली ठरणाऱ्या महिलांचा उल्लेख करण्यात आला आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या स्त्री मध्ये असे गुण असतील तर लग्नानंतर तिच्या पतीचे भाग्य खुलते. तर ते कोणते गुण आहेत, आपण आज जाणून घेऊया…
समाधानी स्त्री: आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्री मध्ये समाधानाचा गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण समाधान हा सुखी जीवनाचा पाया आहे. अशी स्त्री नेहमी कुटुंबाला जोडून ठेवते. तसंच, अशी महिला प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्या पतीची साथ देते.
धार्मिक विचार असलेली स्त्री: आचार्य चाणक्यजी मानत होते की, ज्या घरात रोज पूजा केली जाते, तिथे देवी लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे ज्या महिला धार्मिक स्वभावाच्या असतात, त्यांच्या पतीचे भाग्य खुलते.
शांत राहणे : आचार्य चाणक्य यांनी क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं सांगितलं आहे. आचार्य चाणक्यजी मानतात की, जी स्त्री रागवत नाही, ती आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असते. कारण क्रोधामुळे तुम्ही सर्व काही नष्ट करू शकता.
गोड बोली : चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की ज्या स्त्रियांची वाणी गोड असते ती आपल्या पतीचे भाग्यही बदलू शकते. कारण गोड बोलून घरातील वातावरण नेहमी आनंदी आणि सुखी राहतं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारत राहते.
संयम बाळगणारी स्त्री: आचार्य चाणक्यजी मानतात की, जीवनात यश मिळवण्यासाठी संयम बाळगणे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच महिलांमध्ये हा गुण आवश्यक मानला जातो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)