फलटण-दहिवडी रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?
पृथ्वी चौक ते कोळकी मार्गावर रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे; अपघाताची भीती, तातडीने सुरक्षेची उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
फलटण प्रतिनिधी : फलटण शहरातून जाणाऱ्या फलटण-दहिवडी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, या कामादरम्यान रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. विशेषतः पृथ्वी चौक ते कोळकी या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यालगत धोकादायक खड्डे असल्याने वाहनचालकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे काही ठिकाणी वाहनांना रस्त्याच्या कडेला जागा मिळत नाही. रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने हे खड्डे वाहनचालकांना सहजपणे दिसून येत नाहीत. परिणामी, वाहन रस्त्याच्या कडेला गेल्यास थेट खड्ड्यात अडकण्याची अथवा वाहनाचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे अथवा रस्त्याची पुरेशी माहिती नसल्याने अनेक वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या फलटण-दहिवडी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना संबंधित विभागाने नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी धोकादायक खड्ड्यांची सूचना देणारे फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर किंवा पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
पृथ्वी चौक ते कोळकी या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने संबंधित प्रशासन व रस्ते काम करणाऱ्या ठेकेदाराने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याच्या कडेला तयार झालेल्या खड्ड्यांभोवती सुरक्षात्मक व्यवस्था करावी, रात्रीच्या वेळेस पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी तसेच आवश्यक ठिकाणी सूचना फलक आणि बॅरिकेड्स लावावेत, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
एखादा मोठा अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा फलटणकर नागरिकांनी व्यक्त केली आहे.
