
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. टॉस गमाववल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 67.4 षटकांत 245 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात द. आफ्रिकेची धावसंख्या 11 षटकांत 1 बाद 34 झाली आहे.
द. आफ्रिकेला पहिला धक्का
दक्षिण आफ्रिकेला 11 धावांवर पहिला धक्का बसला. सिराजने एडन मार्करामला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत पाच धावा करता आल्या.
तत्पूर्वी आज सामन्याच्या दुस-या दिवशी भारताने कालच्या आठ बाद 208 धावसंख्ये पुढे खेळण्यास सुरुवात केली. केएल राहुलने (101) शानदार शतक झळकावून इतिहास रचला. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडिया सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचली. राहुलचे हे कसोटी कारकिर्दीतील 8वे शतक ठरले. तो वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही.
खेळपट्टीचे स्वरूप पाहता यजमान द. आफ्रिकेला आव्हान देण्यासाठी ही चांगली धावसंख्या आहे. एकप्रकरे राहुलने भारतीय संघाला ड्रायव्हिंग सीटवर बसवले आहे. आता यजमान फलंदाजांना लवकरात लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांची आहे.







