Wednesday, August 19, 2026
Homeसाताराधुळीचे साम्राज्य, खड्ड्यांची दहशत – रस्ता बंद आंदोलनाचा इशारा

धुळीचे साम्राज्य, खड्ड्यांची दहशत – रस्ता बंद आंदोलनाचा इशारा

फलटण | प्रतिनिधी पालखी महामार्ग अंतर्गत फलटण शहरात सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्यांच्या कामात प्रचंड अकार्यक्षमता आणि नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अनेक भागांत नागरिक आणि व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः महात्मा फुले चौक ते टेलिफोन ऑफिस या प्रमुख मार्गावरील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने परिसरातील दुकानदार, गाळेधारक तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या धुळीमुळे मंडई परिसरात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी आणि सायकलस्वारांचे हाल होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, संतापाची भावना उफाळून आली आहे.

स्थानिक गाळेधारक व नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप कोणतेही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची मागणी आहे की, तातडीने नियोजनबद्ध काम सुरू करून धुळीपासून व खड्ड्यांपासून दिलासा द्यावा.

“प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या कामांची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी,” अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार, पुढील दोन दिवसांत ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर ‘रस्ता बंद आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

🔻 महत्त्वाचे मुद्दे:

  • रस्त्यांचे खोदकाम झाल्यावर काम अर्धवट सोडले
  • महात्मा फुले चौक ते टेलिफोन ऑफिस परिसरात धुळीचे साम्राज्य
  • अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता
  • स्थानिक नागरिक आणि गाळेधारक संतप्त
  • प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी
  • ठोस पावले न उचलल्यास रस्ता बंद आंदोलनाचा इशारा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments