
अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेकडून अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये पाणीटंचाईवर दिलासा; ७०० पाणी जारांचे वाटप
अकलूज | प्रतिनिधी. अकलूज परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला. नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे, नगरसेवक विलास काका क्षीरसागर, उद्योजक मोहन तिकोटे आणि ओंकार क्षीरसागर यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे पिण्याचे तसेच वापरण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देत नागरिकांची तहान भागविण्याचा सामाजिक उपक्रम राबविला.
याशिवाय अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुमारे ७०० पाणी जारांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पाणीटंचाईच्या काळात अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
या लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहून कोणतीही अडचण येऊ न देता पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली. त्यांच्या या कार्याबद्दल प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांनी समाधान व्यक्त करत मनापासून आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.










