सातारा – राज्याच्या आर्थिक अधिवेशनादरम्यान भाजप आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर, ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना मुंबईतून अटक करण्यात आली. गोरे यांच्या बदनामीसाठी 85 हून अधिक एकतर्फी बातम्या प्रकाशित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अटकेनंतर वडूज येथील रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आज (10 मार्च) वडूज न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे.
तुषार खरात यांच्यावर गंभीर आरोप
न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्याचा ठपका तुषार खरात यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय, वडूज, दहिवडी, म्हसवड, तळबीड आणि सोलापूर येथील पोलीस ठाण्यांतही त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये ॲट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी आणि बदनामीसारख्या गुन्ह्यांचा समावेश असून, संबंधित प्रकरणांमुळे त्यांची अटक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
“ही अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर” – रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर टीका करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. “महिलेवरील अन्याय, ओबीसींच्या जमिनी बळकावणे आणि कोविड काळातील मेडिकल कॉलेजमधील भ्रष्टाचारासारखी प्रकरणे उजेडात आणल्यामुळेच तुषार खरात यांना अटक करण्यात आली,” असा आरोप पवार यांनी केला.
“सरकार सत्य उघड करणाऱ्या पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही अशा प्रामाणिक पत्रकारांच्या मागे भक्कमपणे उभे राहू,” असे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले.
“माझी बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा खटला” – जयकुमार गोरे
जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले असून, तिने राज्यपाल आणि विरोधी पक्षनेत्यांकडे मदतीसाठी पत्र पाठवले होते.
यावर प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे आक्रमक झाले आणि “माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार” असल्याचे जाहीर केले. तसेच, “माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार” असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“महिलेवर मी अन्याय केला असल्याचा आरोप केला जात आहे. जर मी दोषी असेल, तर पोलिसांनी स्वतंत्र चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे,” असे जयकुमार गोरे म्हणाले.
2019 मध्ये न्यायालयाचा निकाल, पण वाद कायम
2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जयकुमार गोरे यांना निर्दोष मुक्त केले होते आणि त्यांच्यावरील आरोपांचे रेकॉर्ड हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्या विरोधातील वाद चिघळले असून, त्यांचा फोटो महिलेने न्यायालयात सादर केला होता आणि त्यांनी माफी मागितली होती, असा आरोप करण्यात येत आहे.
आता या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधक आणि समर्थक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.