देशातील सामाजिक सलोखा धोक्यात; जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचे मत

0
18
देशातील सामाजिक सलोखा धोक्यात; जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचे मत



पुणे :‘काश्मीर खोऱ्यात वाढलेले पर्यटन आणि व्यापार शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे काश्मीर देशातल्या इतर राज्यांशी जोडले जात आहे. अशा परिस्थितीत पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे,’ असे मत जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘काश्मीर सोडून देशातील अन्य ठिकाणी हल्ल्याआडून राजकारण केले जात आहे,’ अशी खंतही दाब्रू यांनी व्यक्त केली.

‘सरहद’ संस्थेतर्फे आयोजित ‘काश्मीरचे तिसरे सम्राट ललितादित्य’ स्मृती व्याख्यानात ‘पहलगाम हल्ल्याचे काश्मीरमधील शांतता, प्रगती आणि सुरक्षिततेवर परिणाम’ या विषयावर द्राबू बोलत होते. निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, विजय फाउंडेशनचे संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार, शैलेश पगारिया या वेळी उपस्थित होते.

दाब्रू म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरची एकूण अर्थव्यवस्था २.६५ लाख कोटींची आहे. त्यात पर्यटनाचा वाटा केवळ ७ टक्के आहे. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा नाही. सफरचंद, आक्रोड, चेरी, केशर, रेशीम, शाल अशी अनेक उत्पादने तेथे घेतली जातात. ती देशाच्या कानाकोपऱ्यांत विक्रीसाठी पाठवली जातात. व्यापार हाच काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्या निमित्ताने काश्मीरचा देशातील इतर भागांशी संबंध येतो. आता पर्यटनामुळे स्थानिकांतही विश्वास निर्माण होत आहे. काश्मीरसह देशात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मात्र, हल्ल्यामुळे या सामाजिक सलोख्याला आणि एकोप्यालाच धक्का बसला आहे.’

‘पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला स्वीकारार्ह नाही. काश्मीरची जनता हल्ल्याविरोधात रस्त्यावर येत आहे. सर्व जाती-धर्मांचे लोक निषेध व्यक्त करत आहेत. काश्मीरचा वापर केवळ राजकीय प्रचारासाठी केला जातो. महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या निवडणुकीतही काश्मीरचा मुद्दा पुढे केला जातो. आता नव्याने काश्मीरकडे पाहताना तेथील नागर संस्कृतीचा पुनर्विचार करायला हवा,’ असे मत दाब्रू यांनी व्यक्त केले.
‘भारताचा स्वित्झर्लंड म्हणून लोकप्रिय असलेल्या पहलगाम येथे कोट्यवधी पर्यटक दर वर्षी भेट देतात. नजीकच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. काश्मीरच्या पर्यटनाला चालना मिळाली. पहलगाम हल्ल्यामागे काश्मीरमधील शांतता नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता,’असे हसबनीस यांनी सांगितले.

संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. साची मोरे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.

पहलगाम हल्ल्यामागे काश्मीरमधील शांतता नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. नागरिकांनी सरकारवर दबाव येईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात काहीही अर्थ नाही. आताच्या काळात नागरिकांमध्ये एकोपा गरजेचा आहे.- सुदर्शन हसबनीस, निवृत्त लेफ्टनंट जनरल



Source link