Maritime security has been put on high alert सागरी सुरक्षेत वाढ

0
1
Maritime security has been put on high alert सागरी सुरक्षेत वाढ


पालघर: पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पालघर घटकात सागरी सुरक्षा अधिक सतर्क करण्यात आलेली आहे. तसेच सर्व सागरी खाडी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस अधिकारी व अमलदार यांना सर्तक राहणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

पालघर जिल्हा सागरी सुरक्षेकरिता पालघर घटकात एकुण चार नौका आहेत. त्यापैकी एक बोट कार्यरत असुन त्याद्वारे नियमीत सागरीगस्त करण्यात येत आहे. चार बोटींपैकी नादुरुस्त असलेल्या एका बोटीची स्थानिक दुरुस्तीदार यांना वर्क ऑर्डर देण्यात आली असुन त्या बोटीच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. तसेच उर्वरीत दोन बोटीचे आधुनिकीकरण (दुरुस्ती) करण्यासाठी 25 मार्च रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निधी मंजुर असल्याने दुरुस्ती कामाची प्रक्रिया सुरू आहे.

पालघर घटकातील मत्स्यविभाग यांच्याशी समन्वय साधुन दोन ड्रोनव्दारे खाडी किनारी देखरेख (पेट्रालिंग) करण्यात येत असुन त्यावर स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातुन निगराणी ठेवण्यात येत आहे. पालघर घटकात आवश्यकतेनुसार खाजगी बोटीद्वारे सागरीगस्त करण्यात येत आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल, मत्स्यविभाग, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, कस्टम व पोलीस दल यांचे कडुन वेळोवळी संयुक्त सागर गस्त राबविण्यात येते. पालघर घटकात लॅन्डिंग पॉईंट, कोस्टल पोस्ट, मर्मस्थळ येथे या सर्व ठिकाणी बंदोबस्त लावला असुन त्यावर बारकाईने निगराणी ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा

पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या अनुषंगाने पालघर घटकातील सर्व सुरक्षा यंत्रना यांना सतर्क राहण्याबाबत बल्क मॅसेज पाठविण्यात आलेला आहे. तसेच सागर रक्षक दल, सुरक्षा रक्षक, स्थानिक मच्छिमार सोसायटी, मच्छिमार यांचे संपर्कात असून काही संयशास्पद आढळुन आल्यास त्यांना तात्काळ पालघर नियंत्रण कक्ष व स्थानिक पोलीस ठाणे येथे कळविण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

गस्ती नौकेसाठी प्रशासकीय मान्यतेला विलंब

पालघर पोलिसांनी सागरी गस्तीसाठी डहाणू येथे दोन तसेच सातपाटी व विरार येथे प्रत्येकी एक अशा चार गस्ती नौका भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. नोव्हेंबरपासून १०० दिवसांचा करारनामा असल्याने या बोटी २० मार्चपासून कार्यरत नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवरील पूर्ण हंगामासाठी १ ऑगस्ट ते ३१ मे (अंदाजे २४५ दिवस) या गस्ती नौका भाडेतत्त्वावर घेण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला असला तरी त्याला अजूनही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.

१२० किलोमीटरसाठी फक्त एक नौका

मुंबई व मुंबई उपनगर तसेच पालघर व ठाणे या चार जिल्ह्यांतील सुमारे २७० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच बंदर क्षेत्रात देखरेख ठेवण्यासाठी फक्त दोन गस्ती नौका मत्स्य व्यवसाय विभागाकडे आहेत. त्यापैकी १२० किलोमीटर किनारा लाभलेल्या पालघर व ठाणे जिल्ह्यासाठी फक्त एक नौका असून या क्षेत्रात २६ मासेमारी बंदरे कार्यरत आहेत.

मत्स्य विभागाकडून दोन ड्रोनद्वारे खाडीकिनारी देखरेख ठेवण्यात येत असून किनाऱ्यावर बाहेरच्या बोटींची हालचाल आढळल्यास याबाबत त्वरित पोलिसांना कळविण्यात येईल. तसेच याबाबत स्थानिक मच्छीमारांना देखील सूचना देण्यात आल्या असून बाहेरच्या बोटी आढळल्यास सर्वांना सतर्क ठेवण्यात येईल.– राजन मेहेर, सातपाटी मत्स्यविभाग





Source link