माझ्या हिश्श्याचे किस्से: नापास होण्याच्या भीतीने बनले अभिनेता; रघुवीर यादव यांनी घरातून पळून जाऊन गाठली होती नाटक कंपनी

0
1
माझ्या हिश्श्याचे किस्से:  नापास होण्याच्या भीतीने बनले अभिनेता; रघुवीर यादव यांनी घरातून पळून जाऊन गाठली होती नाटक कंपनी


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेते रघुवीर यादवजी आणि माझ्यामध्ये एका बाबतीत साम्य आहे. मुंबईत आल्यावर मी अन्नुभाई अर्थात अन्नू कपूर यांच्यासोबत नाटकांतून करिअरची सुरूवात केली आणि रघुवीरजींनीही अन्नूभाईंचे वडील मदनलाल कपूर यांच्या नाटक कंपनीतूनच कामाचा प्रारंभ केला. काही दिवसांपूर्वी अन्नूभाईंची बहीण सीमा कपूर यांच्या आत्मकथेचे प्रकाशन झाले. त्यावेळी रघुवीर भैयांनी काही किस्से ऐकवले. तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे.

रघुवीरजींना ॲक्टिंगची फारशी आवड नव्हती. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात यावे, हा नियतीचा फैसला असावा. या देशाला आणि जगाला एक अद्भुत कलाकार मिळावा, असे कदाचित तिला वाटत असावे. रघुवीरजींनी सांगितले की, आपल्या आजोबांनी त्यांच्या गावात मुलाच्या (म्हणजे रघुवीरजींच्या मामाच्या) स्मृती प्रीत्यर्थ लक्ष्मीनारायण यादव विद्यालय नावाची शाळा बांधली होती. रघुजीही तिथेच शिकत होते. त्यांना सायन्स शाखेत घातले होते, पण या विषयात त्यांना अजिबात रुचि नव्हती. बारावीचा निकाल यायच्या आदल्या दिवशी ते खूप तणावात होते. कारण आपण नक्की नापास होणार, हे त्यांना माहीत होते. मामाच्या नावाची शाळा असूनही भाचा नापास झाला, म्हणून घरी मारही बसणार होता.

रघुवीर भैयांनी सांगत होते.. मी झाडाखाली बसून निकालाचा विचार करत होतो, तेवढ्यात नरेशकुमार सूरी नावाचा गावातील एक मुलगा तिथे आला. तो प्रोफेशनल पळपुटा होता. दर दोन-चार महिन्यांनी घरातून पळून जायचा. तो माझ्याजवळ आला आणि ‘कसला विचार करतो आहेस?’ असे विचारले. मी सांगितले की, उद्या निकाल आहे आणि मी नापास होणार, हे मला माहीत आहे. त्यामुळे काय करावे, काही कळत नाहीय. तो म्हणाला, घरातून पळून जाऊ.. आणि मग आम्ही दोघे पळून गेलो. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा रेल्वे बघितली होती. मी रेल्वेत बसलो. आम्ही ललितपूरला पोहोचलो.

तिथे भटकत असताना भोपाळ नाटक कंपनीचा बोर्ड दिसला. तिथे कपूर साहब (मदनलाल कपूर) यांच्या कंपनीचे नाटक सुरू होते. नाटकाचे नाव होते- ‘नागिन’. दोघे जण आतमध्ये गेलो. आम्ही पाहिले की एक टकला माणूस हीरोची भूमिका करतो आहे आणि त्याच्या सोबत नागिणीची भूमिका करणारी एक सुंदर मुलगी नाचतेय. एका अजागळ, टकल्या माणसाबरोबर देखणी मुलगी नाचत असल्याचे पाहून मला खूप विचित्र वाटले. त्याचाच विचार करत करत आम्ही बस स्टँडवर आलो आणि तिथेच झोपलो.

सकाळी सूरी त्याच्या आत्याच्या घरी घेऊन गेला. खाण्याचा कात विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आम्ही त्यांच्याकडे दोन-तीन दिवस राहिलो. मी एकेदिवशी छतावर झोपलो असताना मला तिथेच सोडून सूरी पुन्हा पळून गेला. मी पुन्हा भोपाळला नाटक कंपनीच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे किशन नावाचा एक मुलगा होता. या नाटक कंपनीच्या मालकाची भेट घालून दे, असे मी त्याला म्हणालो. तो मला आत घेऊन गेला. तिथे बाबूजी अर्थात कपूर साहेब बसले होते. त्यांच्या आजूबाजूला काही जण बसले होते. किशन बाबूजींच्या जवळ गेला आणि ‘याला तुम्हाला भेटायचे आहे,’ असे सांगितले. मी त्यांना म्हणालो की, मला तुमच्या कंपनीत ठेऊन घ्या.. ‘तुला काय येते?’ असे त्यांनी विचारले. मी म्हणालो, गाणी गातो.. त्यांनी मला काही गायला सांगितले. मग मी गझल ऐकवली.. बदली तेरी नजर तो नजारे बदल गए, ये चांदनी ये चांद सितारे बदल गए। लहरों से पूछ लीजिए साहिल भी है गवाह, कश्ती मेरी डुबोकर धारे बदल गए.. माझे गायन ऐकून बाबूजींना हसू आले. म्हणाले, तुम सुरीले तो हो, मगर तुम्हारा ‘तलफ़्फ़ुज’ बहुत खराब है..

मला ‘तलफ़्फ़ुज’चा अर्थ माहीत नव्हता. ते कुठल्या तरी तालाविषयी म्हणत असावेत, असे मला वाटले. मी म्हणालो, तबल्यासोबत गायलो, तर येईल व्यवस्थित.. त्यावर बाबूजी पुन्हा हसले आणि म्हणाले की, तबल्याने तलफ़्फ़ुज नीट होत नाही. तलफ़्फ़ुज म्हणजे उच्चार. तुझे उच्चार अशुद्ध आहेत. मी म्हणालो, तुम्ही मला भरती तर करुन घ्या, मी तलफ़्फ़ुज आणि उच्चार दोन्ही चांगले करतो. त्यांनी मला अडीच रुपये महिना पगारावर कंपनीत ठेऊन घेतले. त्यानंतर मला बाबूजींनी सोबत बसवून उर्दू बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकवले. त्यातून माझे ‘तलफ़्फ़ुज’ सुधारले. तिथूनच माझी ॲक्टिंगची सुरूवात झाली. बाबूजींनी तिथे मला इतके चांगले ट्रेनिंग दिले की, ॲक्टिंगमध्ये मी जे काही शिकलो आणि बनलो आहे, त्यात त्यांचा खूप मोठा हातभार आहे. या गोष्टीवरुन मला अल्ताफ हुसैन हाली यांचा एक शेर आठवतोय…

फरिश्ते से बढ़ कर है

इंसान बनना

मगर इस में लगती है

मेहनत जियादा।

रघुजींचे आणखी एक टँलेन्ट इथे सांगितले पाहिजे. मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे. माझ्या ‘चेहरे’ या सिनेमातील त्यांचे पात्र बासरी वाजवणारे होते. मी कथावाचनासाठी त्यांना ऑफिसमध्ये बोलावले, तेव्हा ते दोन-तीन बासऱ्या घेऊन आले. त्यांनी त्या वाजवून दाखवल्यावर मी म्हणालो, ‘ही तर कमाल झाली! या बासऱ्या तुम्हाला कुठे मिळाल्या? बाजारात तर त्या मिळत नाहीत..’ त्यावर त्यांनी सांगितले की, मी स्वत:च त्या बनवल्या आहेत. माझा विश्वासच बसला नाही. दुसऱ्या दिवशी ते एक छोटा बांबू घेऊन आले, माझ्यासमोर बासरी बनवली आणि वाजवून दाखवली. रघुजींच्या बासरीचा आवाज ऐकल्यावर आमचे रेकॉर्डिस्ट ऑस्कर विजेते रसूल पूकुट्टी म्हणाले की, बॅकग्राउंड म्युझिकच्या वेळी वादकाला बासरी वाजवायला सांगू नका, रघुवीरजींच्या बासरीचा आवाजच ठेवा. तो खूप वेगळा आणि अनोखा आहे. या सिनेमात जो बासरीचा आवाज आहे, तो रघुवीरजींनी वाजवलेल्या बासरीचाच आहे. आज रघुवीरजींसाठी त्यांच्या ‘पीपली लाइव्ह’ सिनेमातील हे गाणे ऐका…

सखी सैया तो खूब ही कमात है,

महंगाई डायन खाए जात है…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link