मुंबई: दलित, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. चित्रपटातील सर्व कविता हटविल्याशिवाय प्रदर्शनाला मंजुरी मिळणार नाही, अशी अट सेन्सॉर बोर्डाने घातली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितले की, “सेन्सॉर बोर्डाने नोटीसमध्ये ‘नामदेव ढसाळ कोण आहेत, आम्हाला माहीत नाही’ असे नमूद केले आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे. दलित पँथरसारख्या क्रांतिकारी चळवळीतून समाजाला दिशा देणाऱ्या ढसाळ यांना ओळखण्यास नकार देणे, हे सांस्कृतिक अनास्थेचे लक्षण आहे.”
‘गोलपीठा’मधील कविता वादाच्या केंद्रस्थानी
नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपीठा’ या गाजलेल्या कवितासंग्रहातील काही कविता सेन्सॉर बोर्डाने आक्षेपार्ह ठरवल्या असून, त्या हटविण्याची सक्त सूचना केली आहे. तसेच, ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला ‘यू’ प्रमाणपत्र नाकारत ‘ए’ सर्टिफिकेटसाठीही अनेक अटी लादल्या आहेत.
सेन्सॉर बोर्डाची आक्षेपार्ह निरीक्षणे
- “वाघ्या-मुरळी नृत्याला स्टेज डान्स मानले जाईल.”
- “मंदिराची दृश्ये वगळावी.”
- “‘हरामखोर’ आणि कवितेतील काही शब्द हटविणे आवश्यक.”
सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप
सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेमुळे संविधानवादी आणि दलित संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “हे फक्त सेन्सॉरशिप नाही, तर नामदेव ढसाळ यांच्या वैचारिक आणि साहित्यिक प्रभावाला संपविण्याचा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार का? की विचारांना गळा घोटण्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.