फलटणची आंबेडकरी चळवळः निष्ठावान कार्यकर्ता आर. टी. रणवरे यांचे योगदान

0
3
फलटणची आंबेडकरी चळवळः निष्ठावान कार्यकर्ता आर. टी. रणवरे यांचे योगदान

फलटणची आंबेडकरी चळवळ……..
फलटणच्या आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता आर. टी. रणवरे.
जुन्या जेष्ठ निष्ठावंत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते नाव म्हणजे आर.टी रणवरे.मनमिळावू स्वभाव जिद्द चिकाटी आणि समाजातील कलह मिटवून समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे एक जाज्वल्य व्यक्तिमत्व.शिक्षण कमी होतं पण उदात्त ध्येय आणि तात्विक बैठक असणारा सच्चा आंबेडकरी अनुयायी. निस्वार्थी भावनेने समाजहितासाठी आयुष्यभर झगडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आर.टींचं नाव आदराने घेतले जाते. रचनात्मक कार्यामध्ये ही त्यांचे योगदान मोठे आहे. मग त्यात उल्लेख करावा लागेल तो म्हणजे, राजुरी व खामगाव या ठिकाणी पाणीपुरवठा संस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले यशस्वी प्रयत्न.समाजहिताच्या कोणत्याही गोष्टी मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा करून ती गोष्ट मिळेपर्यंत पर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा ते करीत.गोरगरिबांचा प्रश्न असो की, शेतकरी, कामगार,कष्टकरी, पीडित, शोषित बांधवांचा प्रश्न असो त्यासाठी आर टींनी उपोषण धरायला ही कधी मागे पुढे पाहिले नाही.जिंती सारख्या बागायती क्षेत्रात येणाऱ्या गावात आर टींचे बालपण गेले पण त्यांनी आपली कर्मभूमी संपूर्ण फलटण, सातारा व महाराष्ट्र हीच मानली.समाजकार्याचा वसा घेतलेल्या आर.टींनी पायाला भिंगरी बांधली. स्वतःच्या कुटुंबाकडे ही दुर्लक्ष होऊ दिले नाही. आज त्यांची मुलं सुना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचाच वारसा चालवत आहेत.राजकीय सत्ता मिळविण्यासाठी प्रस्थापितांची आमिषे अनेक वेळा आली पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ते आयुष्यभर लढत राहिले. यात त्यांच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता आर. टी. रणवरे यांच्या कार्याचे शब्दांकन करताना शब्द अपुरे पडतात.इयत्ता पाचवी शिकलेला आंबेडकरी विचारांचा अनुयायी एवढे सगळे कार्य करू शकतो यावर आजच्या पिढीचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण तो विश्वास आर टी रणवरे यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला.
आयुष्यभर आंबेडकरी विचारांची निळी टोपी त्यांनी आपल्या डोक्यावर परिधान करून निस्वार्थी, स्वाभिमानी तत्वनिष्ठ आंबेडकरी भीमसैनिक म्हणून आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला.
आर.टी. रणवरे यांचा जन्म मुंबई येथे झाला. पण त्यांनी आपलं बालपण फलटण तालुक्यातील आपल्या जिंती या गावी घालवलं. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांनी आपले इयत्ता पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिंती च्या जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेत पूर्ण केले. त्यांचे वडील कॉर्पोरेशन मध्ये होते. त्या ठिकाणी असताना त्यांनी अर्ध्या एकराच्या ऊस लागवडीसाठी किती डोळे लागतील याचे अचूक गणित केले. यावर खुश होऊन तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांना मुकादम म्हणून बढती दिली. त्यामुळे त्यांची परिस्थिती काही प्रमाणात सुधारली. आर.टी. रणवरे यांना एक त्यांना एक भाऊ व दोन बहिणी होत्या.वडिलांच्या निधनानंतर मात्र संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच येऊनय पडली. तरीही त्यांनी समाजकार्याची कास सोडली नाही. समाज कार्यामुळे मुलांकडे कुटुंबाकडे लक्ष देता येत नव्हते. तरीही कुटुंबाची वाताहत मात्र होऊ दिली नाही.शेती होती पण फक्त खाण्यापुरतीच कसली जायची. त्यामुळे वरील शेती पडून होती. पुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते बैल बाजारात जाऊ लागले. त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि मावळ असल्याने लोकांची भांडणे तंटे ते मिटवू लागले. त्यांना कधीही राग यायचा नाही. त्यांचा स्वभाव सुश्राव होता.त्यामुळे त्यांचा सर्वांशी स्नेहभाव निर्माण झाला.आर. टी रणवरे संस्काराचे पक्के होते. रोज घरच्या बाहेर पडताना ते आपल्या आईचे दर्शन घेऊन आशिर्वाद घ्यायचे त्यांच्याकडे नेहमीच लोकांची वर्दळ असायची. लगेच कोणाच्याही कामासाठी शबनम बॅग अडकवून घराच्या बाहेर पडायचे. कधी कधी तर लोक त्यांना उठवायला यायचे. पण त्यांनी लोकांवर कधी राग व्यक्त केला नाही.
सामाजिक कामांमुळे त्यांचे कुटुंबाकडे लक्ष कमी होते.पण मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. मुलांना काही कमी पडू दिले नाही. आपल्या मुलांनी डॉक्टर आणि इंजिनियर व्हावे असे त्यांना वाटायचे.त्यांनी शिक्षणावर विशेष भर दिला. कारण त्यांना माहित होते की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा महामंत्र दिला आहे. त्याच मार्गाने समाजाचा विकास होऊ शकतो. यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी आपल्या मुलांसह आपली बहीण अंताबाई हिच्या मुलांनाही शिकवलं आज तीची मुलं ही मोठ्या पदावर आहेत. एक तहसीलदार व एक मत्स्यालयात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे.
आर टी रणवरे यांनी अंधश्रद्धेवर आपला विरोध प्रकट केला.घरात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नव्हती. देव व देवाचा भगत त्यांना आपल्या घरापासून दूर ठेवले होते. आपल्या मुलांवर भीम – बुद्धांच्या विचारांचे संस्कार त्यांनी केले. त्यांनी आपल्या कुटुंबापेक्षा नेहमी समाजाचाच विचार केला. १९८२ सालची गोष्ट असेल जिंती गावी समाज मंदिर बांधायचे होते. काम मातीत करून दरजा भरण्या पुरतेच बजेट होते. पण आर.टी. रणवरे यांना मात्र समाज मंदिर मोठे बांधायचे होते. या कामासाठी दहा हजार रुपये आले होते. या दहा हजारात १२ x २० चे समाज मंदिर उभारायचे होते आर रणवरे यांनी मात्र २५ x ४० च्या हिशोबाने बांधकाम धरले. यासाठी पैसा नव्हता म्हणून आर ती रणवरे यांनी स्वतःच्या घरातील गव्हाची पोती विकली. एवढ्यावरच न थांबता फरतरवाडी, खुंटे, जिंती या गावी नाटकं, चित्रपट दाखवून पैसे उभे केले. समाज मंदिराचे काम पूर्ण केले त्याला वीस हजार रुपये खर्च आला. अशाप्रकारे आर. टी. रणवरे हे जिद्दी होते. हातात घेतलेले काम पूर्णत्वास जाईपर्यंत ते स्वस्थ बसणारे नव्हते. हे करताना काही लोकांनी अपप्रचार ही केला. पण आर. टी. रणवरे यांनी त्याला दाद दिली नाही.
सन १९३२ पुणे कराराच्या वर्षी आर.टी. रणवरे बाबासाहेबांच्या चळवळीत दाखल झाले.त्यांना सात दिवसाचा तुरुंगवासही भोगावा लागला. ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा असायची त्या त्या ठिकाणी ते स्वतः स्वखर्चाने जाऊन पोहोचायचे.१९४६ मध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावेत म्हणून घेण्यात आलेल्या पुणे येथील सभेला ते स्वतः हजर होते.१९५६ साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे केलेल्या धर्मांतरानंतर आर.टी. रणवरे यांनी गावोगावी धम्माचा प्रचार व प्रसार केला.१९६० साली ते रिपब्लिकन पक्षाचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष होते ते बिनविरोध निवडून गेले.१९६१ मध्ये फलटण तालुक्यातील विडणी या गावी कष्टकरी, गोरगरीब व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी अधिवेशन घेतले.भारतीय राज्यघटनेने दिलेल्या न्यायी हक्कांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. अनुसूचित जाती – जमाती, भटके – विमुक्त, दारिद्र्यरेषेखालील गोरगरीब बांधवांना सरकारी नोकरीत घ्यावे, त्यांना काही योजना सवलती मिळाव्यात म्हणून आर. टी.रणवरे यांनी अनेकदा आंदोलने केली. १९६३-६४ मध्ये साखरवाडी येथील साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या खंडवाढीच्या विरोधी आंदोलनात ही ते सक्रिय सहभागी झाले. १९६४ साली महार रामोशी वतन इनाम वर्ग ६ ब च्या जमिनी मूळ वतनदारांना परत मिळाव्यात या मागणीसाठी तहसील कार्यालयावर सर्व वतनदारांचा भव्य मोर्चा काढला व याप्रश्नी सरकारला विचार करावयास भाग पाडले. अशाप्रकारे आर.टी. रणवरे यांनी आपल्या कार्यातून समाज उद्धारासाठी प्रयत्न केले.
१९६५-६६ तसेच १९७४ स*** सातारा येथील पाठक हॉलमध्ये गोरगरीब, उपेक्षित, कष्टकरी, कामगार, शोषित पीडित समाज बांधव यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात बेरोजगारांना रोजगारांची संधी, शेतकऱ्यांना बैलगाडी, वैरण तगाई, शेतीची अवजारे, बी-बियाणे वगैरे सुविधा मिळाव्यात म्हणून तशा स्वरूपाचे निवेदन तयार करून दुष्काळी परिस्थितीत लोकांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष बाजीराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रा. सु. गवई यांचे मार्गदर्शन घेतले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा घेऊन तो खेड्यापाड्यापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी तन-मन-धनाने काम केले.त्यांनी यशवंतराव कृष्णराव रणवरे यांच्या मदतीने जिंती या आपल्या गावी हायस्कूल काढण्यासाठी प्रयत्न केले.१९७० साली त्यांनी फलटण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अधिवेशन भरवले. मुलांसाठी वस्तीगृह,शिष्यवृत्ती वाढ करणे, कॉलेज पर्यंत शिक्षण मोफत करणे यासारखे ठराव करून सरकारकडे पाठवले. शिक्षणाबरोबरच अस्पृश्यता निवारण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला.१९६७-६८ साली यशवंतराव कृष्णराव रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यता निवारण पंधरावडा साजरा करण्यात आला. यात त्यांनी ठिकाणी एकत्रित भोजनाचे कार्यक्रम घडवून आणले.
आर.टी रणवरे यांनी जिनिंग फॅक्टरी साठी प्रयत्न केले.१९७८-७९ च्या सुमारास सहकारी संस्थांमध्ये मागासवर्गीयांच्या 34 राखीव जागा भराव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली.तसेच वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये मागासवर्गीय प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावे. यासाठी सरकारकडे व संस्थांकडे निवेदने दिली. मागासवर्गीय अल्पभूधारकांना ऊस लागवडीसाठी अनुदान देण्यात यावे. असा महाराष्ट्र शासनाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने आर.टी. रणवरे यांनी महाराष्ट्र साखर संचालक,पुणे येथील कार्यालयाच्या समोर उपोषण केले.
फलटणच्या श्रीराम साखर कारखाना हा ही सरकारच्या आदेशाकडे डोळेझाक करत असल्याने आर. टी. रणवरे यांनी याविरोधात प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले.मागासवर्गीय दलित बांधवांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नवीन साखर कारखाना काढण्याचाही प्रयत्न केला. यासंबंधीची मीटिंग मळजाई मंदिर येथे घेण्यात आली. या मिटींगला बाजीराव कांबळे उपस्थित होते. महाराष्ट्रातील रिपब्लिकन पुढाऱ्यांशी चर्चा करून तसा ठराव करून घेतला. तसेच माननीय रा.सू गवई यांच्यामार्फत तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याकडे मुंबई येथे ठराव देण्यात आला यावेळी आर रणवरे स्वतः उपस्थित होते इंदिराजी म्हणाल्या,” बाबा आपका काम हो जायेगा!” असे आश्वासन मिळवून घेतले.
दलित समाजाकडे असलेल्या वतनी जमिनी कसायला पाहिजेत पण त्यासाठी जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु पाटबंधारे खात्याकडून मागासवर्गीय बांधवांना पाणी मिळत नव्हते यावर त्यांनी स्वतः संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली.पण तरीही त्यांना न्याय मिळाला नाही तेव्हा तेव्हा ते तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले. या उपोषणाचा परिणाम होऊन रा. सु. गवई यांच्या प्रयत्नाने खामगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी पाणी पुरवठा संस्था मंजूर झाली.पुढे राजुरी याठिकाणी एडव्होकेट बाजीराव कांबळे, सुमंतराव गायकवाड यांच्यासह रिपब्लिकन नेत्यांची चर्चा करून विठ्ठल सहकारी पाणी पुरवठा संस्था मंजूर करून घेतली. अशाप्रकारे त्यांनी जमिनीला पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले.इनाम वर्ग ६ ब च्या जमिनीच्या प्रश्नासाठी रा. सु. गवई यांच्या माध्यमातून विधान परिषदेत नॉन ऑफिशिअल विधेयक मांडण्यासाठी प्रयत्न केले हे विधेयक मांडल्यानंतर याला पाठिंबा दर्शवण्यासाठी फलटण पंचायत समितीच्या सांस्कृतिक भवनात शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला.
आर.टी.रणवरे यांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पताका घेऊन सामाजिक, शैक्षणिक चळवळ गतिमान केली. घरची परिस्थिती हालाखीची असताना ही हा निस्वार्थी भीमसैनिक कधी थांबलाच नाही. अनेक वेळा तुरुंगवास सहन केला पण दीनदलितांच्या न्याय हक्कासाठी हा भिमसैनिक शेवटपर्यंत लढत राहिला.रिपब्लिकन पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि रा. सु. गवई यांच्या विचारांवर त्याने आपले कार्य सुरू ठेवले सर्व गटबाजी विसरून सर्वांनी आंबेडकरी विचाराच्या निळा झेंड्याखाली एकत्र यावे ही त्यांची इच्छा होती. खरं तर या तत्वनिष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच फलटणची आंबेडकरी चळवळ जिवंत राहिली. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व येणाऱ्या पिढ्यांना ही समाजासाठी चंदनासारखे झिजण्याची प्रेरणा देत राहील.