रामराजे-अजित पवार  भेटींमुळे फलटणच्या राजकारणात हलचल

0
4
रामराजे-अजित पवार  भेटींमुळे फलटणच्या राजकारणात हलचल

मुंबई/: फलटणच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मोठी हालचाल सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सलग दोन दिवस भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवारी (11 फेब्रुवारी) मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी रामराजे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (12 फेब्रुवारी) मंत्रालयात पुन्हा एकदा त्यांच्या दालनात जाऊन चर्चा केली. या भेटींनंतर माध्यम प्रतिनिधींनी रामराजे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतेही वक्तव्य देण्याचे टाळले.

यामुळे या भेटी केवळ औपचारिक होत्या की त्यामागे काही राजकीय डावपेच आहेत, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. फलटणमधील राजे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत.

आयकर धाडीच्या पार्श्वभूमीवर भेटींचे महत्त्व

काही दिवसांपूर्वीच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘गोविंद मिल्क’ आणि त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकली होती. या धाडीत काहीही अवैध आढळले नसल्याचा दावा संजीवराजे यांनी केला होता. मात्र, या घटनाक्रमानंतर लगेचच रामराजे यांनी दोन वेळा अजित पवार यांची भेट घेतल्याने या घडामोडींचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

जर राजे गटाने शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार गटात प्रवेश केला, तर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीला वेग मिळेल, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही या हालचाली महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

सध्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या गुप्त हालचाली आणि अजित पवार यांच्यासोबतच्या चर्चांमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.