माझ्या हिश्श्याचे किस्से: ट्रिक फोटोग्राफीचे जादूगार मानले जायचे बाबूभाई मिस्त्री

0
18
माझ्या हिश्श्याचे किस्से:  ट्रिक फोटोग्राफीचे जादूगार मानले जायचे बाबूभाई मिस्त्री


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

बाबूभाई मिस्त्री 

अलीकडेच मी या सदरामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कॅमेरामन अशोक मेहताजी, मनमोहन सिंगजी आणि राधू करमाकरजी यांच्याविषयी लिहिले. आजच्या भागासाठी लिहायला बसलो तेव्हा मला वाटले की या इंडस्ट्रीतील दुसरे एक महान कॅमेरामन, दिग्दर्शक आणि ट्रिक फोटोग्राफीचे जादूगार बाबूभाई मिस्त्री यांच्याबद्दल लिहिले नाही तर ही मालिका अधुरी राहील. भारतात काॅम्प्युटर ग्राफिक्स आणि व्हीएफएक्सचे तंत्र येण्यापूर्वीच बाबूभाईंनी चालत्या शूटिंगमध्ये अशा अनेक ट्रिक केल्या, ज्या कुठल्याही व्हीएफएक्सच्या तोडीस तोड ठरतील. त्यामुळे आज मी बाबूभाई मिस्त्री यांच्याबद्दल सांगणार आहे.

मित्रांनो, बाबूभाई मिस्त्रींचा जन्म ५ सप्टेंबर १९१८ ला गुजरातमध्ये सुरत येथे झाला. त्यांचे मूळ नाव अब्दुस समद होते. त्यांचा जन्म गुजराती मुस्लिम कुटुंबात झाला होता. स्पेशल इफेक्ट्स आणि ट्रिक फोटोग्राफीसाठी बाबूभाई ओळखले जायचे. पण, त्यांना खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक मिळाला तो १९३७ मध्ये विजय भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ख्वाब की दुनिया’ या सिनेमातून. या सिनेमानंतर बाबूभाई ट्रिक मास्टर म्हणून ओळखले जाऊ लागले.

बाबूभाई मिस्त्री यांनी १९७४ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘हनुमान विजय’ सिनेमाचे एक दुर्मिळ पोस्टर बाबूभाईंनी केलेल्या फोटोग्राफीच्या अनेक ट्रिक या सिनेमात पाहायला मिळाल्या होत्या.

पुढे १९४२ मध्ये ‘मुकाबला’ या सिनेमाचे त्यांनी सहदिग्दर्शन केले. या सिनेमातून बाबूभाईंनी भारतात सर्वप्रथम स्प्लिट स्क्रीन दाखवली. बाबूभाईंना मी व्यक्तिशः भेटलो नाही. पण, त्यांच्याबद्दलचे िकस्से जुन्या लाइटमनकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ऐकले आहेत. ते एक चांगले कॅमेरामन तर होतेच; पण एक उत्तम दिग्दर्शकही होते. त्यांनी संपूर्ण रामायण, महाभारत, हर हर गंगे आणि हातिम ताई अशा अनेक सिनेमांचे दिग्दर्शन केले.

ट्रिक फोटोग्राफीच्या जादूने त्यांनी हे सिनेमे अजरामर केले. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर गणेशोत्सवाचा मांडव घातलेला असायचा. तिथे पडदा लावून संपूर्ण रामायण आणि महाभारत हे सिनेमे दाखवले जायचे. ते मी अनेकदा पाहिले. हनुमानजी उड्डाण करायचे.. कुंभकर्ण डोंगरावर हात ठेवून झोपायचा.. खाली युद्ध सुरू आहे, रावणाची सेना लढते आहे.. पर्वत कोसळताहेत.. अशी दृश्ये पाहून आम्ही टाळ्या वाजवायचो. मोठेपणी मुंबईत आल्यावर मला कळले की, या सिनेमांचे दिग्दर्शन बाबूभाईंनी केले होते.

बाबूभाई आपल्या प्रत्येक सिनेमात नव्या ट्रिकचा वापर करायचे. एकदा ते महालातील दृश्याचे शूटिंग करत होते. हे दृश्य अशा प्रकारे चित्रीत करायचे होते की, त्यातील पात्र महालात अंथरलेल्या गालिचावर चढून सिंहासनाकडे जाऊ लागताच सिंहासनावर बसलेला माणूस त्याला शाप देईल आणि त्याचवेळी त्याच्या पायाखालची जमीन खचून जाईल. बाबूभाईंनी महालाच्या मध्यात खड्डा करून तो पाण्याने भरला. वारा आत येऊ नये म्हणून सगळे दरवाजे – खिडक्या बंद केले.

महाराष्ट्रातील सर्वोत्तम रांगोळी कलाकार महिलेकडून विविधरंगी फुलांची सुंदर रांगोळी काढली. ती पाहताना गालिचाच अंथरलाय, असा भास व्हायचा. दृश्यातील ते पात्र गालिचापासून थोडे दूर उभे होते. हाताने इशारा करताच ते गालिचावर चढले आणि पाण्यात पडले. पण, पडद्यावर पाहताना मात्र जणू तिथली जमीनच खचली आहे, असे वाटायचे. बाबूभाईंनी आपल्या अद्भूत कल्पनाशक्तीच्या बळावर सिनेमांमध्ये अशी अनेक अप्रतिम दृश्ये घेतली. यावरुन बाबूभाईंसाठी मला जिगर मुरादाबादी यांचा एक शेर आठवतोय…

अपना ज़माना आप

बनाते हैं अहल-ए-दिल,

हम वो नहीं कि जिन को

ज़माना बना गया।

बाबूभाईंचे असे कितीतरी किस्से फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. जुन्या लोकांनी मला सांगितले की, एकदा बाबूभाई खंडाळ्यात की फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होते. एका दृश्यात त्यांना बर्फाच्छादित पर्वत दाखवायचा होता. त्यावेळी बशीरभाई लाइटमन होते.

बाबूभाईंनी पर्वताचे चित्र काढलेली पारदर्शक काच कॅमेऱ्यासमोर फिक्स केली. ब्रश आणि पांढरा रंग घेतला. काचेवरच्या चित्रातील पर्वताचे शिखर पांढऱ्या रंगाने हलकेच रंगवले. ते कॅमेऱ्यातून पाहताना मात्र पर्वताच्या शिखरावर बर्फ जमा झाल्यासारखे दिसत होते! बाबूभाईंनी आपल्या सिनेमांमध्ये कॅमेरा ब्लॉक करुन, निगेटिव्ह ब्लॉक करुन अशा अनेक ट्रिक्स आणि ऑन सेट ट्रिक्स वापरल्या. ते खऱ्या अर्थाने ट्रिक फोटोग्राफीचे जादूगार होते. आज बाबूभाईंच्या स्मरणार्थ ‘हातिम ताई’ सिनेमातील हे गाणे ऐका…

ज़रा करम ऐ खुदा

इधर कर दे,

ख़ताये हमसे हुई है

तू दर गुज़र कर दे…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link