
‘मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्तांची फार उशिरा माफी मागितली आहे. मात्र आता माफीने काहीही साध्य होणार नाही. आणि शिवरायांच्या दरबारात माफी नसायची. थेट ‘कलम’ केलं जायचं. मोदी यांनी कितीही माफी मागितली तरी आता जनता राज्यातलं भ्रष्टाचारी सरकार थेट कलमच करणार आहे’ अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. पालघर येथे वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात बोलताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणात मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी शिवाजी महाराज आणि शिवभक्तांची नतमस्तक होऊन माफी मागत असल्याचे म्हणाले होते. यावर शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते, राज्याच्या विधानपरिषदेतील अंबादास दानवे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.