
Rahul Gandhi PM Modi Verbal Fight: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानांवरुन उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजारी असून त्यांनी 4 जूननंतर इलाज करुन घ्यावा असा खोचक सल्ला ठाकरे गटाने दिला आहे. पंतप्रधान स्वत:ला देवाचा अवतार म्हणवतात असं संदर्भ देत ठाकरे गटाने पंतप्रधानांच्या विधानांवरुन त्यांना ‘सामना’च्या अग्रलेखातून उपहासात्मक पद्धतीने लक्ष्य केलं आहे. याच लेखामध्ये ठाकरे गटाने यंदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच पंतप्रधान मोदींचा ‘पप्पू’ केला असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.
‘मोदींचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही’
पंतप्रधानांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देत ठाकरे गटाने मोदींचं मानसिक स्वास्थ ठीक नाही असं म्हटलं आहे. “एका मुलाखतीत ते म्हणाले, ‘‘मैं तो ‘अविनाशी’ हूं. मैं काशी का हूं.’’ भगवान शंकरास अविनाशी म्हटले जाते. ज्याचा कधीच विनाश होत नाही असा तो अविनाशी. मोदी यांनी स्वतःला स्वयंप्रभू शिवशंकर म्हणून जाहीर करून टाकले. हे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचेच लक्षण आहे,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. पंतप्रधानांनी निवडणुकीच्या प्रचार केलेल्या मंगळसूत्र विधानाबरोबरच ठराविक समाजाविरोधातील विधानांचा संदर्भ देत ठाकरे गटाने पंतप्रधानांची वक्तव्य ही त्यांची निराशा दर्शवतात असं म्हटलं आहे. याच लेखात राहुल गांधींचं कौतुक ठाकरे गटाने केलं आहे.
‘राहुल गांधींनी मोदींचा ‘पप्पू’ केला’
“स्वत स्वयंप्रभू म्हणतात, ‘‘मी बायोलॉजिकल नाही. म्हणजे आईच्या उदरातून माझा जन्म झाला नाही. मला तर वरून परमात्म्याने पाठवले. मी देवाची देणगी आहे.’’ यावर या स्वयंप्रभूंचे चमचे, ‘‘वाह.. वाह.. वाह..’’ करीत टाळ्या वाजवतात व ‘‘प्रभू की जय हो’’ म्हणतात. यावर राहुल गांधी यांनी जाहीर सभेत स्वयंप्रभूंना एक नाजूक प्रश्न विचारला आहे, ‘‘आपल्याला आपण देव असल्याचे भास नक्की कधी होतात? म्हणजे सकाळी होतात, संध्याकाळी होतात की, झोपेत म्हणजे स्वप्नावस्थेत होतात?’’ राहुल गांधी हे स्वयंप्रभू मोदींची ही अशी खिल्ली उडवतात. राहुल गांधी यांनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत ‘पप्पू’ अवस्थेत पोहोचले. हीच ‘पप्पू’ अवस्था अविनाशी आहे. मोदी हे अविनाशी अवस्थेला पोहोचले आहेत ते असे,” असंही लेखात म्हटलं आहे. स्वयंप्रभूंनी एका प्रचार प्रवचनात प्रजेला सांगितले की, ‘‘मी 85 कोटी जनतेला फुकट धान्य देतो. त्यामुळे तुम्ही मला मते द्या. नाहीतर तुम्हाला पाप लागेल.’’ मोदी यांची ही विधाने म्हणजे देववाणी असल्याचे त्यांच्या भक्तांना वाटत असेल तर भक्तांनीही आपापली डोकी तपासून घेतली पाहिजेत,” असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.
नक्की वाचा >> Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; ‘या’ तारखांना विधानसभेचं मतदान?
ऐसा कोई सगा नही, जिसको मोदी ने ठगा नही
“मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो? त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे. त्यांना विश्रांती व उपचारांची गरज आहे. मोदी यांना घरसंसार, नातीगोती असे काहीच नसल्याने या वयात व मानसिक अवस्थेत काळजी घ्यायची कोणी? ऐसा कोई सगा नही, जिसको मोदी ने ठगा नही. त्यामुळे स्वयंप्रभू अवस्थेला पोहोचूनही मोदी एकाकी आहेत. मनाने ते कमजोर पडले आहेत. कमजोर मनाच्या व्यक्तीलाच विचित्र भास होतात. स्वतःविषयी भ्रामक कल्पना मनात आकार घेतात. मोदी यांचा अविनाश हा त्यातलाच प्रकार आहे. 4 जूननंतर भाजप शिल्लक राहिलाच तर मोदींच्या मन-आजाराची त्यांना काळजी घ्यावीच लागेल. निदान पतंजलीच्या रामदेवबाबाने तरी स्वयंप्रभूने केलेल्या उपकारांची जाण ठेवून पुढे यायला हवे, पण शेवटी ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, तू सत्तेवरून जाता राहील कार्य काय?’ हीच अवस्था स्वयंप्रभूंची होईल,” असं लेखाच्या शेवटची म्हटलं आहे.







