
PM Narendra Modi : लोकसभेच्या निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत आहे. कॉंग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये आरोपांचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधान मोदींवर अदानी-अंबानींसंबंधी अनेकदा आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी मोदी यांनीसुद्धा राहुल गांधींवर अदानी-अंबानींवरून घेरले होते. आता पुन्हा एकदा या प्रश्नावर पंतप्रधानांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
उद्योगपती अंबानी आणि अदानी यांच्यासोबत जोडले गेले नाव
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव उद्योगपती अंबानी आणि अदानी यांच्यासोबत जोडले जाते. अनेकदा त्यांच्यावर यावरून आरोप केले गेले आहेत. याविषयी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांना विचारण्यात आला होता. तुमची मोठ्या उद्योगपतींशी मैत्री आहे, असा आरोप राहुल गांधी करीत आहेत, असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला. पाच वर्षांपासून हे स्टिकर आपल्या प्रतिमेवर चिकटवण्याचा प्रयत्न करीत आहात की तुमची अदानी आणि अंबानींशी मैत्री आहे. त्यावर मोदींनी सडेतोड उत्तर दिले आहे.
गांधी कुटुंबाची ही समस्या
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘या (गांधी) कुटुंबाची समस्या ही आहे की, हे एक ओझं असलेले कुटुंब आहे. नेहरूजींच्या सरकारला बिर्ला-टाटांचं सरकार म्हणून हिणवलं जायचं. आता मलाही अशाच पद्धतीने हिणवायची गांधी कुटुंबाची इच्छा आहे, ही या कुटुंबाची समस्या आहे. या कुटुंबात एक मानसिक समस्या आहे, असंही ते पुढे म्हणाले.
संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मी लाल किल्ल्यावरून हे सांगतो, मी लाजत नाही. मी लाल किल्ल्यावरून सांगतो या देशामध्ये संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा. माझ्या देशातील सक्षम लोकांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. मी १५ ऑगस्टच्या पाहुण्यांच्या यादीत खेळाडू आणि कर्तृत्ववान खेळाडूंना स्थान दिले. देश कर्तृत्ववानांची पूजा करत नसेल, देश त्यांचे महत्त्व मान्य करणार नाही, तर माझ्या देशात पीएचडी करणारे लोक कुठून येणार? शास्त्रज्ञ कुठून येणार? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.
‘संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा मी आदर करीन’
पंतप्रधान म्हणाले, ‘आता कोणी म्हणेल की तुम्ही धनपतीला मदत करत आहात. पण, मी करत नाहीये. हा माझ्या देशाचा अभिमान आहे, माझ्या देशात बहुराष्ट्रीय कंपन्या का असू नयेत, जगात माझ्या देशातील कंपन्यांची दुकाने का असू नयेत? होय, बेईमान असाल तर फासावर लटकवा, चुकीचे असेल तर फासावर लटकवा, पण मी माझ्या देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा मी आदर करीन.








