रसिक स्पेशल: सरोत युद्धे, सरो आरिष्टे, दीपावलीचे दीप उजळो…

0
18
रसिक स्पेशल: सरोत युद्धे, सरो आरिष्टे, दीपावलीचे दीप उजळो…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Article | Written By Prasad Kulkarni On Diwali Festival

प्रसाद कुलकर्णी11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

या धरतीवरच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अंध:कार दूर होवो आणि तिथं आत्मतेजाचे नंदादीप उजळोत. माणसाच्या माथ्यावरचा दारिद्र्याचा शाप कायमचा मिटो. धर्म, जाती, पंथ यांतील तेढ नष्ट होवो आणि आपुलकीच्या धाग्यांनी माणसं जोडली जावोत. सर्वत्र आनंदाचं वातावरण भरुन राहो. त्या दीपदेवतेच्या साक्षीनं एवढं जरी आपण करू शकलो, तरी ही दिवाळी सफल झाली, असं म्हणता येईल.

आज दिवाळी! दिवाळी म्हणजे सणांचा राजा. त्यात पुन्हा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलेयत. म्हणजे आनंदाचा डबल धमाका! या मंगल मुहूर्तावर नवी आशा, नवी चेतना आणि नवा उत्साह घेऊन मांगल्याचे नवे पर्व सुरू होते आहे. अन् काळजात उदंड आशेचे नंदादीप नि ओंजळीत उद्याच्या भविष्याची उत्कट स्वप्ने घेऊन आपण तिच्या स्वागताला उभे आहोत.

तसे पाहू गेले तर गेल्या काही वर्षांत जग खूप पिचून निघाले आहे. कोरोनाची महामारी, दोन देशांतील युद्धे, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक मंदी, माणसां – माणसांमधला विसंवाद… आपण खूप सोसले आहे. माणूस माणसापासून तुटला आहे. विवंचनांनी ग्रासला आहे. संवाद हरवला आहे. पण मी असीम आशावादी आहे. पहाट होण्यापूर्वीचा अंधार सर्वाधिक गडद असतो, असे म्हणतात. तसेच काहीसे मला वाटते आहे. सृष्टीमध्ये बऱ्या-वाईट गोष्टी घडतच असतात. त्याने नाउमेद होऊन चालत नाही. अशा वेळी लागतो तो दुर्दम्य आत्मविश्वास आणि उदंड आशा. खरे सांगायचे, तर वाईट आहे म्हणून बऱ्याचे बरे चालले आहे. काळोख आहे म्हणून जीवाला प्रकाशाची आस आहे. येऊ घातलेल्या मंगलपर्वाची चाहूल या दिवाळीच्या पाऊलखुणांमध्ये दिसते आहे.

जे जे सुंदर, उदात्त आणि मंगल आहे, त्याची आपण मनोभावे पूजा करतो. दीपावली हा तर मांगल्याचाच सण..! आज नरक चतुर्दशीच्या पहाटे विवंचनांच्या, द्वेषाच्या आणि अज्ञानाच्या नरकासुराचे दहन होईल आणि संध्याकाळी दिवेलागणीला दिव्यांच्या ओळीत एकेक दिवा जसा लागू लागेल तसतसे कृष्णगहन तमाच्या पार्श्वभूमीवर भविष्याचे आकाश लकाकू लागेल. त्या प्रकाशात लक्ष्मीचे आगमन होईल. उत्साहाची आतषबाजी होऊ लागेल. आणि सारा आसमंत आनंदाने भरुन जाईल. माता लक्ष्मी सारे वातावरण प्रसन्नतेने भारुन टाकील.

आज या घडीला जगाला सर्वाधिक गरज आहे, ती माणसा – माणसांमधल्या संवादाची. संवाद हरवला की त्याची जागा विसंवाद घेतो. विसंवादातून गैरसमज निर्माण होतात. आणि गैरसमजातून पुढचे रामायण आणि महाभारत घडते. आज जगात अगदी हेच घडते आहे. या विसंवादापायी कुटुंब व्यवस्था कोलमडते आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होते आहे. धर्माच्या नावावर युद्धे लढली जात आहेत. चला तर मग, या शुभ मुहूर्तावर आपण एक संकल्प करू, ज्योतीने ज्योत पेटवण्याचा… माणसे जोडत जाण्याचा! ज्योत से ज्योत जगाते चलो… प्रेम की गंगा बहाते चलो!

जी माणसे संवादाला पारखी झाली आहेत, त्यांच्या काळजाच्या दरवाजावर आपण टकटक करण्याचा प्रयत्न करूया. काळजाच्या दरवाजाला कडी आतून असते, बाहेरून नाही. त्यांना आपल्या काळजाचा दरवाजा स्वतःहून उघडू दे. आणि काळजाचा काळजाशी संवाद सुरू होऊ दे. व्हाट्स अॅप आणि फेसबुकच्या जमान्यात नाती हरवलेली ही माणसं एकमेकांकडं जाऊ – येऊ लागोत. आपली सुख – दुःखं एकमेकांशी शेअर करोत. शेअर केल्यानं दुःख कमी होतं, तर सुख द्विगुणित होतं. या निसर्गनियमानुसार प्रत्येकाचं सुख वृद्धिंगत होवो. काव्य – शास्त्र – विनोदांना बहर येवो. माणसाचं एकाकीपण दूर होवो. त्या जगन्नियंत्याकडे अशी प्रार्थना करूया की, या धरतीवरच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अंध:कार दूर होवो आणि तिथं आत्मतेजाचे नंदादीप उजळोत. माणसाच्या माथ्यावरचा दारिद्र्याचा शाप कायमचा मिटो. धर्म, जाती, पंथ यांतील तेढ नष्ट होवो आणि आपुलकीच्या धाग्यांनी माणसं जोडली जावोत. सर्वत्र आनंदाचं वातावरण भरुन राहो. त्या दीपदेवतेच्या साक्षीनं एवढं जरी आपण करू शकलो, तरी ही दिवाळी सफल झाली, असं म्हणता येईल.

सरोत युद्धे, सरो आरिष्टे, दीपावलीचे दीप उजळो। तळपत सारे, नभात तारे अन् दु:खाचे तमही जळो।।

हे विश्वंभर, प्रसन्न अंबर आनंदाने लखलखू दे। मुखामुखावर पुन्हा एकदा हर्ष तेवढा झळकू दे।।

चैतन्याचे लेऊन तोरण सजून येवो हरेक दार। प्रेम रूजू दे, क्षेम असू दे घरात यावी पुन्हा बहार।।

रांगोळीसम प्रत्येकाच्या आयुष्यातही रंग भरो। हे श्रीरंगा, तुझ्या कृपेने सकलजनांचे विघ्न हरो।।

ऐक ईश्वरा, तुला प्रार्थना आरोग्याचे दे वरदान। तुझ्या कृपेने सुखात राहो समस्त सारे थोर लहान!

(संपर्क- 13ashirwad@gmail.com)



Source link