सातारा : चार मृत महिलांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार; अखेरच्या श्वासापर्यंत जपला पैरा | पुढारी

0
17









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कारंडवाडीतील चार महिलांवर शनिवारी सायंकाळी काळाने घाला घातला. शेतात पैर्‍यावर कामासाठी गेलेल्या वृद्ध महिलांचा कालव्यात ट्रॉली पलटी झाल्याने मृत्यू झाला. या घटनेने शोकसागरात बुडालेली कारंडवाडी अद्यापही सावरलेली नाही. मृत चारही महिलांवर रविवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नेहमी शेतात पैरा पद्धतीने काम करणार्‍या या चौघींनी अखेरच्या श्वासापर्यंत हा पैरा जपला.

कारंडवाडी हे सातारा शहरापासून अवघ्या 8 ते 10 कि.मी. वर असलेले गाव. सुमारे 900 उंबरठा असलेल्या या गावची लोकसंख्या साडेतीन हजाराच्या आसपास आहे. शेती व एमआयडीसी हे येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन. या गावासाठी शनिवार हा घातवार ठरला. अरूणा शंकर साळुंखे (वय 58), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65) व उल्का भरत माने (वय 55) या चौघींजणी अन्य सहकारी महिलांसोबत शनिवारी शेतात कामाला गेल्या होत्या. सायंकाळी पावसाने जोर धरल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीमधून त्या घरी परत येत होत्या. त्यावेळी महाडिक कॉलनीजवळ ट्रॉली कालव्यात पलटी झाली अन् या चारही महिलांना काळाने हिरावून नेले.

या घटनेची माहिती कळताच आख्खं गाव घटनास्थळी लोटलं. या महिलांचे मृतदेह पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत होते. कुटुंबिय व नातेवाईकांचे अश्रू काहीकेल्या थांबत नव्हते. अवघी कारंडवाडी शोकसागरात बुडाली. रविवारीही गावात निरव शांतता पसरली होती. शोकाकूल वातावरणातच मृत चारही महिलांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चौघींनाही एकाचवेळी अशा पद्धतीने अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने अनेकांना हुंदका आवरत नव्हता.

सकाळी शेतात जाताना…

शेतात पैरा पद्धतीने काम करत एकमेकींसोबत राहण्याची त्यांची नित्याचीच सवय होती. मात्र, शनिवारी त्यांचा पैरा अखेरचा ठरला. सकाळी शेतात जाताना त्यांना माहितही नव्हते की आज पैर्‍याचा अखेरचा दिवस असेल. एका दुर्घटनेने त्यांना एकाचवेळी कायमचे हिरावून नेले.











Source link