file photo
सातारा; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री व्हावे, अशी अनेकांची इच्छा असून त्यात अजित पवारही आहेत. मात्र, ती सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होत नाही. अजित पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असे नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील, असे सूतोवाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला कोणताही धोका होणार नसून महायुती भक्कम असल्याचे ते म्हणाले.
सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ना. आठवले म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे सातार्यामध्ये कुटुंबीय व शेतकर्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर कोणतीही टांगती तलवार नसून टांगती तलवार उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले नसते. उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते. त्यामुळेच शिवसेनेत महाबंड झाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला कोणताही धोका होणार नसून महायुती भक्कम आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत बॅनर लावणारे उत्साही कार्यकर्ते असतात. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकांची असते, पण ती पूर्ण होत नाही.
यापूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार
आले होते, तेव्हा अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. पण, तेव्हा संधी मिळाली नाही. आता लवकर संधी मिळेल असे नाही. राज ठाकरे यांनी स्वतंत्र रहावे. त्यांना भाषण करायला आवडते. ते आमच्यासोबत आले तर त्यांना एवढे भाषण करायला मिळणार नाही. त्यांची आम्हाला आवश्यकता नाही. त्यांना सोबत घेणे भाजपला देश पातळीवर परवडणारे नाही, असे ही ते म्हणाले.
शिर्डी येथे 28 मे रोजी देशव्यापी अधिवेशन
रिपब्लिकन पक्षाचे शिर्डी येथे दि. 28 मे रोजी देशव्यापी अधिवेशन आहे. त्यापूर्वी 27 मे रोजी ऑल इंडिया कमिटीतील प्रमुखांची बैठक होणार आहे. त्यात संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्ष वाढवण्यासाठी चर्चा होणार आहे. तसेच या अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारकडे भूमिहीन कुटुंबांना 5 एकर शेतजमीन द्या, पदोन्नतीत दलितांचे आरक्षण कायम ठेवा, 2019 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना घरे द्या, अशा विविध मागण्या केल्या जाणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.





