
पाटण; गणेशचंद्र पिसाळ : हवामान खात्याचा अंदाज दर्शविणार्या अल निनोच्या भविष्यवाणीमुळे चालू वर्षी भारताला दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेही याबाबत आता सावधान पावले उचलायची तयारी ठेवली असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याच्या सिंचनाची गरज व निम्म्याहून अधिक राज्याला वीजपुरवठा करणार्या कोयना धरणातील सध्याच्या पाण्यावरही अल निनोचे सावट पाहायला मिळत आहे.
या इशार्याचा तितक्याच गांभीर्याने विचार केला तर सध्या उपलब्ध पाणीसाठ्यातून आगामी काळात कोयनेतून अतिरिक्त वीजनिर्मिती करणे शक्य होणार नसल्याने राज्याला ऐन उन्हाळ्यात विजेची टंचाई जाणवेल, शिवाय शासनाचा अब्जावधीचा अतिरिक्त महसूलही पाण्यात जाणार आहे. आणि जर हे गांभीर्याने घेतले नाही तर भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर कोयनेच्या पाण्यावरही आगामी काळात निर्बंध येण्याच्या शक्यता आहेत. अल निनोच्या पार्श्वभूमीवर शासकीय खबरदारी व उपाय योजनांचा विचार केला तर यावर्षी सध्या धरणात असलेल्या उपलब्ध 50 टीएमसी पाण्यापैकी सरासरी 20 टीएमसी पाणी हे आगामी काळातील संभाव्य धोक्याचा विचार करून बाजूला ठेवावे लागणार आहे. धरणातील पाण्याचा विचार लक्षात घेता यावर्षी आत्तापर्यंत पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी 51.08, पूर्वेकडे सिंचन 26.54, पूरकाळात 7.69, विनावापर 30.84 , आपत्कालीन विमोचक दरवाजा 2.16 अशा एकूण 118.31 टीएमसी पाण्यानंतरही धरणात सध्या तब्बल 51.08 टीएमसी पाणी शिल्लक आहे.
यामुळे जून 2023 नंतर देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्याच्या उपाययोजना राबवणे आवश्यक राहील.पश्चिमेकडील लवादाचा आरक्षित कोटा लक्षात घेता आगामी काळासाठी यापैकी शिल्लक 16.42 टीएमसी तर सिंचनासाठी सरासरी 10 टीएमसी व मृतसाठा पाच अशा एकूण 31.42 टीएमसी पाण्यानंतरही धरणात नव्या तांत्रिक वर्षारंभाला सरासरी 20 टीएमसी पाणी शिल्लक राहण्याच्या शक्यता आहेत.





