वीर धरणातून ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
2
वीर धरणातून ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वीर धरणातून ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


फलटण | प्रतिनिधी. वीर धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांच्या माहितीनुसार बुधवार, ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून एकूण ६,०३७ क्युसेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, वीर धरणाच्या सांडव्यावरून ४,६३७ क्युसेक आणि एस्केपमधून १,४०० क्युसेक असा एकूण ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरण परिसरातील पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नदीपात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठावर असलेली जनावरे, शेतीसाहित्य, पंप, वाहने किंवा इतर मौल्यवान वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सखल भागातील ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.