15 जूनला घरी यायचं होतं पण नियतीने सर्वच हिरावलं, लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांवर काळाचा

0
1


Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यातील उरी सेक्टरमधून (Uri Sector) महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणि दुःखद बातमी समोर आली आहे. उरीमधील एका लष्करी तळावर (Military Base) झालेल्या दुर्दैवी हँड ग्रेनेड स्फोटात (Hand Grenade Blast) महाराष्ट्राच्या दोन धाडसी जवानांना वीरमरण (Martyrdom) आले आहे. अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण अशी या शहीद वीरांची नावे असून, ते दोघेही ‘8 राष्ट्रीय रायफल्स’मध्ये कार्यरत होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

Jammu Kashmir News: नियमित शस्त्रास्त्र हाताळणी दरम्यान भीषण अपघात

शहीद अर्जुन जाधव हे साताऱ्याचे, तर विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी होते. ही हृदयद्रावक घटना उरीतील कमलकोट येथील एका लष्करी छावणीत सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. लष्कराच्या छावणीत शस्त्रास्त्रे हस्तांतरित करण्याची आणि ती तपासण्याची नियमित प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान अचानक एका हँड ग्रेनेडचा चुकून भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवान अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर लष्कराने तातडीने सूत्रे हलवून दोन्ही जखमी जवानांना हवाई दलाच्या विमानाने श्रीनगरच्या बदामीबाग कॅन्टोन्मेंटमधील लष्करी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हा स्फोट नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की इतर काही कारणांमुळे, याचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरी म्हणजेच कायदेशीर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Jammu Kashmir News: लेकाचा पहिला वाढदिवस साजरा करायचा राहून गेला

या संपूर्ण घटनेत साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र अर्जुन जाधव यांची कहाणी ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन हे लष्कराच्या ‘बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप’चे जवान होते. त्यांच्या डोक्यात सध्या एकच विचार घोळत होता, तो म्हणजे आपल्या पोटच्या लाडक्या लेकाचा पहिला वाढदिवस. येत्या 25 जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. एकुलत्या एका मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी त्यांनी मनात अनेक स्वप्ने आखली होती आणि त्याची तयारीही सुरू केली होती.

या आनंदाच्या सोहळ्यासाठी ते येत्या 15 जूनपासून सुट्टी घेऊन गावाकडे येणार होते. कधी 15 जून उजाडतो आणि आपण घरी जातो, असं त्यांना झालं होतं. घरातही आनंदाचे वातावरण होते; आई-वडील आणि पत्नी लाडक्या लेकाच्या वाढदिवसाची आणि अर्जुन यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, घरी येण्यापूर्वी अवघे 10 दिवस आधीच नियतीने घात केला. ज्या लेकासाठी बाप घरी जाण्याची खटपट करत होता, तो देशाचे रक्षण करताना रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याची ही इच्छा अपुरीच राहिली.

Jammu Kashmir News: नवी मुंबईच्या ‘डॅशिंग’ जवानाचे वीरमरण 

याच भीषण अपघातात नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी असलेले जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांनीही देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. विक्रम हे अत्यंत हुशार आणि डॅशिंग जवान म्हणून ओळखले जात होते. एका कर्तव्यदक्ष तरुण जवानाला गमावल्यामुळे ऐरोली परिसरात आणि त्यांच्या मित्रपरिवारात प्रचंड शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या पुत्राच्या जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, या दुःखातून सावरणं त्यांना कठीण झालं आहे. लष्करी इतमामात या दोन्ही शहीद जवानांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

NCP Sharad Pawar on Pune Rave Party: शिवराज्याभिषेक दिनी पुण्यात पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? शरद पवार गटाच्या नेत्यांनी उत्पादन शुल्क सचिवांना विचारला जाब



Source link