
फलटण : प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने फलटण तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, एका दिव्यांग उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश जगताप यांनी आमदार सचिन पाटील यांच्यावर टीका करताना, “दिव्यांगांची मते चालतात; मात्र त्यांच्या अडीअडचणींकडे दुर्लक्ष केले जाते,” असा आरोप केला.
दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत असलेली महिला कर्मचारी आपल्या मूळ पदावरील कामाऐवजी तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागात कार्यरत असल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात तहसीलदार डॉ. अभिजित जाधव संबंधित कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एका दिव्यांग कर्मचाऱ्याची प्रकृती खालावल्यानंतरही प्रशासन मौन बाळगत असल्याने संताप अधिक तीव्र झाला आहे.
“उपोषणकर्त्यांच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत प्रहार दिव्यांग संघटनेने प्रशासनाला तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.







