अजित पवारांची आमदारांना कडक तंबी “मतदारसंघात ताकद दाखवा!”

0
86
अजित पवारांची आमदारांना कडक तंबी “मतदारसंघात ताकद दाखवा!”

मुंबई/फलटण : मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांना जोरदार तंबी दिली. “मतदारसंघात फिरा, पक्षाची ताकद दाखवा, विनाकारण मुंबईत थांबू नका” अशा कडक शब्दांत त्यांनी आमदारांना फटकारले.

स्थानिक संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा, मतदारसंघात सक्रिय राहा आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच, “संपर्क मंत्री जिल्ह्यात काम करत नाहीत, त्यापैकी ५०% मंत्री निष्क्रिय आहेत” अशी नाराजीही त्यांनी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.

दरम्यान, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे आमदार सचिन पाटील यांनी गेल्या काही काळात पक्षाची स्वतंत्र ताकद उभारण्यात अपयश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. फलटण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती व विकास सोसायट्यांवर राजे गटाची सत्ता, तर काही ठिकाणी भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला, तरी सध्या भाजपने स्थानिक निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असल्याने त्यांची संघटनात्मक ताकद वाढताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यादरम्यान आमदार सचिन पाटील हे उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चा रंगल्या. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार वाई येथे होते. त्यामुळे — “सचिन पाटील हे भाजपचे की राष्ट्रवादीचे?” — असा सवाल फलटण तालुक्यात उभा राहिला आहे.

गेल्या वर्षभरात फलटण तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसले; मात्र उलट्या दिशेने फारसे प्रवेश झाले नाहीत, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे.

आता या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार सचिन पाटील यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय घेतात, याकडे फलटण तालुक्याचे आणि सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.