अन्वयार्थ : भाजपचे नवे वाचाळवीर!

0
1
अन्वयार्थ : भाजपचे नवे वाचाळवीर!



भाजपच्या ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ मानल्या गेलेल्या मध्य प्रदेशमधून आदिवासी कल्याण कार्यमंत्र्याच्या रुपात आता एक नवा वाचाळवीर ‘अवतरला’आहे. केंद्रात दहा वर्षांहून अधिक सत्ता राबवल्यानंतर तरी भाजपच्या नेत्यांमध्ये परिपक्वता यावी, शहाणपण यावे अशी थोडी जरी कोणी अपेक्षा बाळगली तर त्यांचा भ्रमनिरास झालाच म्हणून समजा. मध्य प्रदेशमधील हे वाचाळमंत्री आहेत विजय शहा. खरेतर शहांचे काही चुकले नाही, त्यांनी फक्त भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे अनुकरण केले. मुस्लीम आणि महिला यांच्याबद्दल तोंडाला येईल ते आणि मनात येईल तेव्हा बरळण्याची सवय भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांना असल्याची अनेक उदाहरणे आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ‘दीदी ओ दीदी’ अशी हेल काढून टवाळी कोणी केली होती हे सांगण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘आम्ही ८० टक्के, ते २० टक्के’ असे कोणी म्हटले होते हेही सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ असे कोण म्हणाले होते, आजही विसरले गेलेले नाही. मुस्लिमांबद्दल काहीही बोलले तरी चालते हे भाजपच्या बड्या आणि वाचाळवीरांमध्ये अग्रणी असलेल्या नेत्यांकडून विजय शहा शिकले असतील तर दोष त्यांना कसा देणार? कुठल्याही समाजात ‘राजापेक्षा राजनिष्ठ’ अशी एक जमात असते, ती राजनिष्ठा सातत्याने दाखवून देते. त्यात आपण कमी तर पडत नाही ना, याची धुगधुगी सतत त्यांच्या मनात असते. मग, जिथे संधी मिळेल तिथे ते वाचाळपणा करून आपली निष्ठा राजाच्या चरणी वाहतात. विजय शहांनी यापेक्षा काही वेगळे केलेले नाही.

भाजपचे मंत्री विजय शहा वाचाळपणा करून निसटले असते पण, उच्च न्यायालयाने स्वत:च त्यांच्या बेमुर्वतखोरीची दखल घेतली आणि पोलिसांना बजावले की, असतील हे मंत्री पण, त्यांच्या कृत्याबद्दल गुन्हा दाखल करा! भाजप नेत्यांच्या वाचाळपणाची देशाला सवय झाली असल्याने न्यायालयाचे विजय शहांकडे दुर्लक्षही झाले असते. पण, विजय शहांनी वाचाळपणाचा कडेलोट केला. असा प्रकार त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांनीही केला नव्हता. संरक्षण दलातील अधिकाऱ्याविषयी तेही महिलेबद्दल विजय शहांनी वापरलेली अभद्र भाषा न्यायालयालाच काय भाजपच्या नेत्यांनाही रुचणारी नव्हती. या मंत्र्याने लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांना ‘दहशतवाद्यांच्या बहिणी’ची उपमा दिली. सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ची पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. केंद्र सरकारने मुस्लीम महिला अधिकाऱ्याला म्हणजे मुस्लीम दहशतवाद्यांच्या बहिणीला, भारताने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईची माहिती देण्यासाठी पाठवून ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिल्याचा दावा या मंत्र्यांनी केला. ही आक्षेपार्ह भाषा महिलेचा अपमान करते, मुस्लीम धर्माबद्दल रक्तात भिनलेला द्वेष दाखवते. इतकेच नव्हे तर, संरक्षण दलाची मानहानी करते.

भाजपमंत्री विजय शहा वाचाळ असतील पण, ते मूर्ख नव्हेत. त्यांना संरक्षण दलातील मुस्लीम महिला अधिकाऱ्यावर निकृष्ट टिप्पणी करण्याची मुभा कोणी दिली? त्यांना पक्षातील कोणाचा आशीर्वाद होता का? शहांची भाषा ही भाजपचे अधिकृत राजकीय धोरण आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. पश्चातबुद्धी म्हणून शहांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केलीही जाईल पण, त्यातून काहीही साध्य होणार नाही. उच्च न्यायालयाने बजावूनदेखील पोलिसांनी शहांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जाणूनबुजून पळवाटा ठेवल्या. हे लक्षात घेता न्यायालयात कोणी आव्हान दिले तर हा गुन्हा टिकणारच नाही, अशी पोलिसांची कानउघाडणी उच्च न्यायालयाने केली आहे. म्हणजे मध्य प्रदेशमधील सरकारी यंत्रणा मंत्र्याला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसली. या मंत्र्याने आता कुरेशी यांची माफी मागितली आहे. माझे चुकले, मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे, असा कांगावा करत त्यांनी स्वत:चा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला आणि त्यात पळवाटा नसतील तर विजय शहांचे मंत्रीपद जाईलच, शिवाय दोषी ठरले तर तुरुंगवास भोगावा लागेल. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून भाजपच्या कोणी कारावास भोगला आहे असे फारसे पाहायला मिळालेले नाही. विजय शहा हे मोठा अपवाद ठरू शकतील! तुरुंगवासाची भीती असल्याने शहांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर शहांच्या याचिकेची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानेही, ‘काय ही तुमची भाषा…’, असा मार्मिक शेरा मारून शहांच्या भाषेवर नाराजी व्यक्त केली. याआधीही पुरुषी मनोवृत्तीतून अनेक राजकीय नेत्यांनी महिलांची टिंगलटवाळी केली आहे. त्यातून ते सहीसलामत निसटलेही आहेत. पण, इथे फक्त पुरुषी अहंकारच नव्हे तर, धर्मांध राजकारणाचा बाजही आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना चांगल्या वर्तवणुकीची पावती देत त्यांची तुरुंगातून सुटका करण्याची मनोवृत्ती आणि विजय शहांची सोफिया कुरेशींवर केलेल्या टिप्पणीतील मनोवृत्ती एकसारखीच आहे, असे म्हणणे योग्य ठरेल.



Source link