Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: स्वर समृद्ध आशा...

रसिक स्पेशल: स्वर समृद्ध आशा…

रसिक स्पेशल: स्वर समृद्ध आशा…

[ad_1]

सुहास किर्लोस्कर11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आशा भोसले यांच्या गाण्यातील वैविध्य, त्यासाठी त्यांनी लावलेला वेगळा आवाज, स्वरपट्टीची निवड, स्वरातील मिंड, खटके, मुरकी या आभूषणांच्या मोजक्या वापरासोबतच, युगल गीतांमध्ये कुशल सह-गायकांच्या सुरात सूर मिसळताना आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या आशाताई हा अभ्यासाचा विषय आहे. ‘या सुखांनो या..’ या गाण्याला चार चांद लावणाऱ्या आशाताईंनी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘संगीतमय साथ देऊन’ आपल्या साऱ्यांचं जगणं सुख-सुरांनी समृद्ध केलं आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी परवा, ८ सप्टेंबरला ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्या औचित्याने, त्यांच्या गाण्यांतील शब्द – अभिनयाची अदाकारी अन् तजेलदार सुरांच्या लयकारीची ही सफर…

पार्श्वगायन म्हणजे चित्रपटाच्या पडद्यावर असलेल्या कलाकाराच्या भावना प्रसंगाप्रमाणे व्यक्त करून गायन करणे. चित्रपटामध्ये असंख्य प्रकारचे प्रसंग असतात, अनेक प्रकारचे भाव गाण्यामधून व्यक्त होत असतात. पार्श्वगायनामध्ये आवाज फक्त ‘गोड’ असून चालत नाही, तर त्याला अभिनयाची जोड द्यावी लागते. राग, लोभ, प्रेम, रोमान्स, भक्ती, भीती, असूया, आनंद, आश्चर्य, अभिमान अशा अनेक प्रकारच्या भावना असलेल्या प्रसंगाला साजेशी गाणी लिहावी लागतात, त्याला संगीत द्यावे लागते आणि गायनामधून सादर करावी लागतात. भारतीय चित्रपटामध्ये कोणत्याही प्रसंगामध्ये नायक-नायिका तसेच खलनायक-नायिकासुद्धा गाणे म्हणू शकतात. या सर्व प्रकारच्या प्रसंगांची गाणी लीलया पेलणारा गळा असलेली गायिका आशा भोसले. असा हा गळा जन्मजात लाभलेला नसतो, त्यासाठी निरंतर शिकण्याची तपश्चर्या त्यांना करावी लागली आहेच; शिवाय बदलत्या काळानुसार आवाजाचा पोत बदलून त्या आवाजामध्ये गाणी पेश करण्याची कलाही त्यांनी अवगत केली आहे. या गाण्यांचा आवाका बघितल्यावर (ऐकल्यावर) असे काम इतके वर्षे एकच व्यक्ती कसे काय करू शकते, असा प्रश्न पडत राहतो.

लहान मुलांसाठी वयाने मोठ्या व्यक्तीने गाणी गाताना त्या मुलांच्या भाषेत गावे लागते. ‘उठी गोविंदा उठी गोपाळा’ (वसंत प्रभू) या गाण्यामधला आवाज लडिवाळ आहे. हे गाणे सकाळी ऐकल्यावर कोण जागे होणार नाही? त्याचप्रमाणे लहान मुलांच्या आवडत्या अंगाई गीतामध्ये ‘नन्ही कली सोने चली’, ‘चंदा रे छुपे रहना’ (लाजवंती – एस. डी. बर्मन) या गाण्यांचा आवाज मातृप्रेमाने ओतप्रोत भरलेला वाटतो. ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ (घराना – रवी) या गाण्यात लहान मुलांच्या आवाजातील खट्याळ भाव आहेत. कुमारवयीन मुलांना ‘चल मेरे संग संग, ले ले दुनिया के रंग, हो जा रंगीला रे..’ (ए. आर. रहमान) अशी गाणी आपलीशी वाटतात. महाविद्यालयीन युवकांनी ‘बच के तू रहेना’ (कंपनी – संदीप चौटा) गाणे ऐकल्यावर त्यांची अवस्था ‘खल्लास’ असते. पण, त्यांना हे माहीत नसते की, या गाण्याची झिंग चढवणाऱ्या आशा भोसले या गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळी ६० व्या वर्षात पदार्पण करत होत्या.

नवविवाहितांसाठी ‘स्वप्नात रंगले मी’, ‘जिवलगा कधी रे येशील तू’ (सुधीर फडके), ‘स्वप्नात साजणा येशील का’ (विश्वनाथ मोरे) अशा गाण्यांनी वेड लावणाऱ्या आशाताई, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ (अनिल अरुण) अशा गाण्यातून वेगळाच खट्याळपणा दाखवतात. ‘साधी भोळी मीरा तुला कळली नाही’ (एन. दत्ता) या गाण्यामधून राधेचे कृष्णावरील प्रेम व्यक्त करताना त्या वेगळाच आवाज लावतात, ज्याला दुःखाची झालर आहे. ‘प्रेम वेडी राधा, साद घाली मुकुंदा’ (सुधीर फडके) या गाण्यामधल्या राधेला कृष्णाचा छंद लागला आहे, हे जाणवते. याउलट ‘राधा कैसे न जले, आग तन मन में लगे’ (ए. आर. रहमान) या गाण्यातली राधा कृष्णाच्या असूयेने कशी भावविवश झाली आहे, याचे प्रत्यंतर देताना आशाताईंनी गाण्याच्या शेवटच्या ‘राधा कैसे न जले..’ हीच ओळ हुंदक्याने दाटलेल्या गळ्याने गायली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातील ‘रेशमाच्या रेघांनी’ (आनंदघन) यासारख्या लावण्यांच्या ठसक्याबरोबरच, ‘नाव सांग गाव सांग’ गाण्यात ‘जा रं..’असं टेचात म्हणणाऱ्या आशाताईंनी अनेक गाण्यांमधील संवाद म्हणताना शाब्दिक अभिनयाचे दर्शन घडवले आहे. ‘हाए रे हाए तेरा घुंघटा’ (आर. डी. बर्मन) या गाण्यामध्ये त्यांनी ‘घुंघटाह’ असा जो उच्चार केला आहे, तो लाजवाब आहे. ‘बैल तुझे हरिणावाणी, गाडीवान दादा’ (सुधीर फडके) गाण्यामध्ये बैल हाकताना म्हटलेलं ‘हे सर्जा, आहा आहा’, ‘आप के कमरे में कोई रहता है’ (आर. डी. बर्मन) या गाण्यामधील ‘डर लगता है..’ अशी अनेक उदाहरणे देता येतील, जी गाणी अन्य कोणी सादर करायला धजावणार नाही. कारण सुरांचा तोल सांभाळताना साभिनय शब्द म्हणणे आव्हान असते.

संसारी स्त्रीच्या रूपात.. ‘मन वढाय वढाय’ (वसंत पवार) या गाण्यातला आशाताईंचा आवाज ऐकला आणि नंतर ‘वक्त’ चित्रपटातील .. “आगे भी जाने न तू’, ‘चेहरे पे ख़ुशी आ जाती है’ आणि ‘कौन आया के निगाहो में चमक जाग उठी’ (रवी) ही गाणी ऐकल्यावर हा एकाच गायिकेचा आवाज आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. एकाच गाण्यातील आवाजाच्या वैविध्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास ‘अब जो मिले हैं तो’ (आर. डी. बर्मन), ‘निगाहंे मिलाने को जी चाहता है’ (दिल ही तो है), ‘मेरी नजर है तुझ पे’ यांसारखी अनेक गाणी सांगता येतील. जितक्या सहजतेने त्यांनी, ‘या रावजी, बसा भावजी’, ‘इन आंखों की मस्ती के’ (खय्याम), ‘मेरा नाम है शबनम’ (आर. डी. बर्मन) यांसारखे नृत्याचे प्रकार पेश केले आहेत, तितक्याच सहजतेने त्या, ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ (हृदयनाथ मंगेशकर), ‘तोरा मन दर्पन कहलाए’ (काजल – रवी) अशा भजनांमधून श्रोत्यांना डोलायला लावतात.

‘भंवरा बडा नादान’ गाण्यामध्ये खोडकर भाव, “जुस्तजू जिसकी थी’ (खय्याम), ‘भोगले जे दुःख’, ‘खाली हाथ शाम आई है’ (आर. डी. बर्मन) अशा गाण्यांमध्ये दुःखाच्या अनेक छटा, ‘ओ मेरे सोना रे’ गाण्यांमधली छेडछाड, ‘पिया तू अब तो आजा’, ‘नहीं नहीं अभी नहीं’ अशा गाण्यांमधील उन्मादक भावनांचे अनेक पदर, ‘सजना है मुझे सजना के लिये’ गाण्यातला सोज्वळ शृंगार (रवींद्र जैन) असे भावनांचे हिंदोळे एकच गायिका सादर करू शकते, याचे आश्चर्य वाटते. इतकेच नव्हे, तर मद्यप्राशन करून गाणे गायल्याचा अभिनय त्यांनी, ‘आओ हुजूर तुम को’ (ओ. पी. नय्यर) या गाण्यात असा केला आहे की, त्यातील सूर आणि अभिनयामधील तारेवरची कसरत सांभाळून ऐकवलेले उचक्यांमधील वैविध्य अचंबित करणारे आहे. भारतातील अनेक भाषांमधील आशाताईंनी गायलेली गाणी तितकीच श्रवणीय आहेत, हे खरेच. ‘आसबो आर इक दिन आज्जाई’ हे बंगाली गाणे, ‘आउंगी इक दिन आज्जा’ इतकेच श्रवणीय आहे. ‘माचेर कांटा खोनपार कांटा’ या गाण्यातील शब्दांच्या उच्चारामध्ये बंगाली मिठास आहे. वेगवेगळ्या देशांतील संगीत वैविध्यपूर्ण असते, त्यामुळे तिथला बाज ओळखून गायलेल्या ‘खतुबा’तील (अलिबाबा और चालीस चोर – आर. डी. बर्मन) अरेबिक संगीताचा लहेजा अनोखा आहे.

आशा भोसले यांच्या गाण्यातील वैविध्य, त्यासाठी त्यांनी लावलेला वेगळा आवाज, स्वरपट्टीची निवड, स्वरातील मिंड, खटके, मुरकी या आभूषणांच्या मोजक्या वापरासोबतच, युगुल गीतांमध्ये कुशल सह-गायकांच्या सुरात सूर मिसळताना आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या आशाताई हा अभ्यासाचा विषय आहे. ‘या सुखांनो या..’ या गाण्याला चार चांद लावणाऱ्या आशाताईंनी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘संगीतमय साथ देऊन’ आपल्या साऱ्यांचं जगणं सुख-सुरांनी समृद्ध केलं आहे. वयाचं बंधन नसलेल्या या सदाबहार, स्वरसमृद्ध गायिकेला अनंत शुभेच्छा!

—-
सुहास किर्लोस्कर
suhass.kirloskar@gmail.com
संपर्क : ९४२२५१४९१०

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments