
मोठे शहर नोकरी देते, म्हणून अनेक गावा – शहरांतून लोक मुंबईत येतात. अशा मोठ्या शहराचा आणखी एक गुण म्हणजे रोजच्या घाई – गडबडीत तुमचा शेजारी काय करतो/ करते, त्यांचे खासगी जीवन कसे आहे, याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो. मुंबईत सगळे काही मिळेल, पण जागा मिळणे महाकठीण! ही मुंबई २४ तास जागी असते, कारण तिच्या कानाकोपऱ्यात कोणी ना कोणी काम करत असतात. अशा शहरात रात्रंदिन काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न, त्यांची घुसमट आणखी वेगळी. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजलेल्या आणि आता डिस्ने हॉटस्टारवर आलेल्या ‘All We Imagine as Light’ या सिनेमाने मुंबईतील अशा झगडणाऱ्या स्त्रियांचा संघर्ष समोर आणला आहे. आपल्याला दिसणाऱ्या या शहराच्या वरवरच्या लखलखाटामागे दडलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर हा सिनेमा प्रकाशझोत टाकतो.सिनेमाच्या सुरूवातीला अशीच रात्रभर जागणारी मुंबई दिसते. कोणी आपल्या कुटुंबाशी भांडण करून घर सोडून मुंबईत आलेला असतो, कोणी गरोदर असल्यामुळे तिथे आलेली असते, पण तिला इथे आल्यावर राहण्यासाठी जागा आणि नोकरी मिळालेली आहे. कोणी केरळवरून आलेली आहे, तर कोणी गुजरातमधून, कोणी महाराष्ट्रातल्या गावाकडून आला आहे. त्यामुळे या सिनेमातील अनेक पात्रे वेगवेगळ्या भाषेत संवाद करताना दिसतात. हीच खरी मुंबई. मुंबईत काम आहे, पैसा आहे. काम मिळाल्यावर आपली पाळेमुळे विसरायला लावणारी मुंबई इथे दिसते. रात्रीच्या मुंबईतील अनेक सर्वसामान्य लोकांच्या खडतर आयुष्यातील प्रसंगांचा कोलाज बघता बघता प्रेक्षक या शहरात हरवून जातो आणि त्याचवेळी रात्र-प्रहरी लोकलमधून प्रवास करणारी प्रभा (कनी कुश्रुती) दिसते.प्रभा हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करते. ती स्वतःच्या जगात मश्गुल आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या अन्य नर्सबरोबर मौजमजा करायला ती कुठे जात नाही. काम झाल्यावर घरी येते. तिची रूम पार्टनर अनु (दिव्या प्रभा) या महिन्यातही घरभाडे द्यायला असमर्थ आहे. तरीही प्रभा तिच्या वतीने भाडे भरण्यास तयार आहे. प्रभा काम करते त्या हॉस्पिटलमधील पार्वती मावशी (छाया कदम) आपल्या व्यक्तिगत प्रश्नांशी झुंज देत आहेत. प्रभा त्यांनाही मदत करायला तयार आहे. प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न आहेत, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. एकेका प्रसंगांतून ते उलगडत जातात.सिनेमा हे दृक-श्राव्य माध्यम. त्यामुळे तिथे कॅमेरा बोलका आणि संवाद मोजके असणे अपेक्षित असते. या सिनेमात कॅमेरा सतत काहीतरी सांगत असतो. त्यामुळे कमीत कमी संवादात कथेचा आशय प्रेक्षकांच्या लक्षात येतो, त्यातूनच तो त्यात गुंतून जातो, हेच या सिनेमाचे वैशिष्ट्य! शहरात काम मिळवण्यासाठी गाव सोडणाऱ्या प्रत्येकासाठी आणि शहरात गेल्यावरच आपल्या मुलामुलीचे कल्याण होणार आहे, या आशेवर गावात राहणाऱ्या सर्व पालकांसाठी हा सिनेमा आहे. ही कथा तीन नायिकांची आहे, पण त्यांच्यात आणखी एक नायिका आहे – मुंबई. कथेमध्ये पुढे काय घडणार आहे, हे सांगणारा हा सिनेमा नव्हे. व्यग्र असलेल्या अनेक स्त्रियांचे अनेक प्रश्न त्यांच्या दृष्टिकोनातून आणि मोजक्या संवादातून शांत चित्ताने अनुभवणे, हीच त्याच्या कथानकाची खासियत आहे.या सिनेमातील अनेक प्रसंग सूचक आहेत, त्यामधून ज्याचे त्याने अर्थ काढावेत. हॉस्पिटलमध्ये आलेल्या २५ वर्षे वयाच्या स्त्रीला तीन मुले आहेत. एका स्त्रीला संततिनियमनाबद्दल जाणून घ्यायचे आहे. पण ती सांगते, असे ऑपरेशन पुरुषांनी केल्यामुळे त्यांच्यातली ताकद कमी होते, असे तिच्या नवऱ्याचे म्हणणे आहे. या प्रसंगातून पुरुषी मानसिकता आणि स्त्रियांची फरपटही दिसते. हॉस्पिटलच्या काउंटरवर असलेली अनु हे ऐकत असते, परंतु तिचा प्रियकर तिला भेटतो, तेव्हा तीसुद्धा अशीच असहाय्य होते. तिलाही त्याच्याकडून पुरुषी मनोवृत्तीचा अनुभव येतो. हे सर्व प्रसंग इतके सहजगत्या घडतात, पण त्यावरून काय अनुमान काढायचे हा निर्णय लेखिका – दिग्दर्शिका पायल कपाडियांनी प्रेक्षकांवर सोडला आहे. ‘एक होता राजा, एक होती राणी’ या पद्धतीची साचेबद्ध गोष्ट न सांगता, प्रेक्षक हुशार आहे हे समजून घेत काही प्रसंगांची मालिका तुकड्या तुकड्यामध्ये दाखवून त्याचे जिगसॉ कोडे सोडवण्याचे काम त्यांनी प्रेक्षकांवर सोपवले आहे.सर्वसामान्य स्त्रियांची व्यथा अतिशय तरलतेने दाखवताना भावविवश होण्याचे प्रसंग दिग्दर्शिकेने टाळले आहेत. रोजच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आजूबाजूला बघतो, तितक्या सहजतेने हा सिनेमा घडतो. मध्यंतरानंतर अचानक यातील तीन स्त्रिया समुद्रकिनारी वसलेल्या गावी जातात आणि कथानक वेगळे वळण घेते. हा भाग पटकथा लेखनामध्ये सहजतेने आला असता, तर सिनेमाने आणखी उंची गाठली असती. कनी कुश्रुतीचा संयमित अभिनय दाद देण्यासारखा आहे. दिव्या प्रभाने काही प्रसंग उठावदारपणे साकारले आहेत. छाया कदम यांनी मनात ठसठसणारा राग आणि उफाळून येणारी बंडखोर वृत्ती कमीत कमी संवादातून अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे. ‘लापता लेडीज’, ‘अंधाधुन’, ‘न्यूड’, ‘सैराट’च्या तुलनेत या सिनेमात त्यांना कमी संवाद आहेत, तरीही ‘छाया कदम छा गई,’ असे म्हणावे लागते.शहरापासून गावापर्यंत स्त्रियांच्या अस्तित्वाचा झगडा कसा सुरू आहे, याचे प्रत्यंतर तिघींच्या वेगवेगळ्या कथांतून समोर येते. अशा अर्थपूर्ण सिनेमांना ‘एनएफडीसी’सारख्या संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळाले, तर प्रेक्षकांना सुजाण करणाऱ्या अशा अनेक उत्तम कथा पडद्यावर येऊ शकतील. suhass.kirloskar@gmail.com
Source link