
रूमी जाफरी10 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
गीतकारांविषयीच्या या मालिकेत प्रसिद्ध गीतकार इंदीवरजी यांच्याबद्दल लिहिल्याशिवाय ही शृंखला पूर्ण होणार नाही. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज इंदीवरजी यांच्याविषयी…
इंदीवरजींसोबत माझे घनिष्ट संबंध होते. त्यांच्या सहवासात मी बराच काळ घालवला. त्यांनी स्वत:बद्दलच्या अनेक गोष्टी मला सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, फिल्म इंडस्ट्रीत आलो तेव्हा मला काम मिळत नव्हते. कारण मी हिंदीचा कवी आणि लेखक होतो. तेव्हा इंडस्ट्रीत उर्दूचा बोलबाला होता. मी उर्दू शिकण्यासाठी मेहनत घेऊ लागलो. काही सिनेमे मिळाले; पण यश लाभले नाही. १९४६ मध्ये ‘नमक’, १९४७ मध्ये ‘काला बाजार’, ‘इम्तिहान’, ‘आहुती’ असे सिनेमे आले, मात्र काही लाभ झाला नाही. नंतर १९५१ मध्ये आलेल्या ‘मल्हार’मधील “बड़े अरमान से रखा है बलम तेरी कसम..’ हे माझे गाणे सुपरहिट झाले.
तथापि, हे गाणे हिट होऊनही मला यश मिळाले नाही. पुढे नवे काम मिळाले नाही. ‘शीशम”, ‘दाना पानी’, ‘डाकू की लडकी’ असे थोडेफार छोटे-मोठे सिनेमे मिळाले, पण स्ट्रगल सुरूच राहिला. खर्च भागवणे अवघड होऊ लागले होते. त्यावेळी मुंबईमध्ये मराठी, गुजराथी, इंग्रजी, उर्दू आणि अगदी फारशीचेही शिक्षक मिळायचे, पण हिंदी शिकवणारे फारसे मिळत नसत. अशातच व्ही. शांताराम हे एका नव्या नायकाला लॉँच करण्याच्या तयारीत होते. त्याचे संवाद हिंदीत असल्याने त्याला ही भाषा शिकवायची होती. त्यामुळे ते हिंदी शिकवणाऱ्याचा शोध घेत असताना कुणीतरी माझे नाव त्यांना सुचवले. मी भेटायला गेल्यावर त्यांनी त्या अभिनेत्याची ओळख करुन दिली आणि आपण यांना लॉँच करत आहोत, तुम्ही त्यांना हिंदी शिकवा, असे सांगितले. मी त्या अभिनेत्याला हिंदी शिकवू लागलो, त्यामुळे मला थोडेफार पैसे मिळू लागले. पण, सिनेमांसाठी गाणी लिहिणे हीच माझी आवड आणि ध्येयही होते. त्यामुळे माझे त्यासाठी प्रयत्न सुरूच होते. ज्या अभिनेत्याला मी हिंदी शिकवत होतो, त्याचे नाव होते जितेंद्र आणि तो सिनेमा होता ‘गीत गाया पत्थरों ने’. ही गोष्ट जितेंद्र कधीही विसरले नाहीत, त्यांनी मला सदैव साथ दिली. सुपरस्टार झाल्यावरही त्यांचा हाच प्रयत्न असायचा की त्यांच्यासाठी मीच गाणी लिहावीत. असो. हिंदी सिनेमांसाठी गाणी लिहिण्याची माझी धडपड सुरूच होती. १९६३ मध्ये बाबूभाई मिस्त्रींनी लक्ष्मीकांत प्यारेलाल या नव्या संगीत दिग्दर्शकांना ब्रेक दिला. त्या सिनेमातील बहुतांश गाणी असद भोपाली साहेब आणि फारुख कैसर यांची होती. पण, मलाही एक गाणे मिळाले. मी विचार केला, उर्दूतील शब्द वापरुन असे मस्त, रोमँटिक गाणे लिहायचे की आपण इतर शायरांच्या बरोबरीचे आहोत, असे सर्वांना वाटले पाहिजे. मी लिहिलेले गाणे हिट झाले. त्याचे बोल होते.. ‘रोशन तुम्हीं से दुनिया, रोशन तुम्हीं जहां की, फूलों में पलने वाली रानी हो गुलिस्तां की..’ हे गाणे खूप गाजले. पण, त्यावेळी इंडस्ट्रीत साहिर लुधियानवी, शकील बदायूनी, राजा मेहंदी अली खां, मजरूह सुलतानपुरी, कैफी आझमी असे अनेक दिग्गज शायर होते. त्यामुळे माझ्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नव्हते. पुढे १९६५ मध्ये मला ‘हिमालय की गोद में’साठी एक गाणे मिळाले. त्याचे बोल होते.. ‘एक तू न मिला, सारी दुनिया मिले भी तो क्या है..’ या गाण्यासाठी फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले, पण करिअरमध्ये फार काही घडले नाही.
नंतर १९६८ मध्ये ‘सरस्वतीचंद्र’ प्रदर्शित झाला. त्यातील सगळी गाणी सुपर-डुपर हिट झाली.. “चंदन सा बदन चंचल चितवन’, ‘फूल तुम्हे भेजा है खत में’, “मैं तो भूल चली बाबुल का देस..’ या गाण्यांना देशभरातील लोकांनी डोक्यावर घेतले. तेव्हा कुठे माझा स्ट्रगल संपला. एव्हाना आनंद बक्षींचीही एन्ट्री झाली होती. आता काम मिळवण्यापेक्षाही अशा मोठ्या गीतकारांहून चांगली गाणी लिहिण्याची माझी धडपड सुरू होती. ‘सरस्वतीचंद्र’नंतर ‘सुहागरात’ आणि पाठोपाठ ‘अनोखी रात’ हे सिनेमे आले. या दोन्हींतील गाणी सुपरहिट झाली. ‘अनोखी रात’मधील ‘ओह रे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में..’ ऐकून साहिर आणि मजरूह साहेब मला म्हणाले, तुम्ही आता शायरीसोबत फिलॉसॉफीही लिहिताय. यापेक्षा आणखी मोठी शाबासकी काय असू शकते?
इंदीवरजींना १९७६ मध्ये ‘अमानुष’ सिनेमासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यावरुन मला नीरजजींचा एक शेर आठवतोय…
समय ने जब भी अंधेरों से दोस्ती की है, जला के अपना ही घर, हमने रोशनी की है…
इंदीवरजींची अनेक गाणी मलाही आवडायची. त्यामुळे मी एकदा त्यांना विचारले की, “चंदा चले, चले रे तारा’, “जब कोई बात बिगड़ जाए..’ अशी इतकी चांगली गाणी लिहिल्यावरही तुम्हाला.. ‘एक आंख मारु तो रास्ता रुक जाए..’, ‘ओ ताकि ओ ताकि..’ अशी गाणी लिहिण्याची काय गरज होती? त्यावर ते म्हणाले की, बेटा, तू कार्टर रोडवरच्या माझ्या या फ्लॅटमध्ये येतोस, खिडकीच्या बाहेरचा समुद्र पाहतोस. म्हणतोस, वा! इंदीवरजी तुम्ही स्टार आहात. तुमचे घर किती चांगले आहे, गाडी काय भारी आहे. पण, या सगळ्या गोष्टी अशाप्रकारच्या गाण्यांमुळेच होऊ शकल्या. माझे काम आहे, निर्मात्याला हवे तसे लिहून देणे.
इंदीवरजींनी फिरोज खान यांच्यासाठी गाणे लिहिले होते.. “आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए..’ या गाण्याने त्यावेळी साऱ्या देशभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर मनोजकुमार यांनी इंदीवरजींची साथ सोडली नाही. त्यांनी ‘उपकार’ आणि ‘पूरब और पश्चिम’ची गाणी त्यांच्याकडून लिहून घेतली. आज इंदीवरजींच्या आठवणीत ‘पूरब और पश्चिम’मधील हे गाणे ऐका…
है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूं… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.