
मुंबई : भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. भारतानं याचे पुरावेही दिले आणि इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ऑपरेशन सिंदूरची दखल घेतली गेली. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावणारं भारताचं ते अस्त्र कोणतं? त्याला सुदर्शन चक्र असं नाव का दिलं गेलं? याबाबत जाणून घेऊयात.
भारताची संरक्षण सिद्धता सगळ्यांना ज्ञात होतीच पण आता ती पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे. त्याला कारणीभूत ठरला पाकिस्तान. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं पाकिस्तानवर सूड उगवला. तिथले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पण यामुळे पिसाळलेल्या पाकनं भारतावर गोळीबार आणि हल्ले सुरूच ठेवले. भारताच्या नागरी वस्त्यावर हल्ल्याचा पाकचा नापाक डाव आपल्या सैन्यानं लीलया परतवला. यात मोलाची कामगिरी बजावली ती सुदर्शन चक्रानं. याच्या एकाच हल्ल्यात संपूर्ण पाकिस्तानची संरक्षण प्रणालीच बेचिराख झाली. पाकनं 36 जागांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. 400 हून अधिक ड्रोन्स डागले पण आपल्या सुदर्शन चक्रानं हवेतच नष्ट केले. हे सुदर्शन चक्र म्हणजे ‘भारताची एअर डिफेन्स सिस्टीम’ आहे.
कर्नल सोफिया यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्याचा पर्दाफाश केला. पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांच्या सुरक्षेसाठी हवाई क्षेत्राचं उल्लंघन करत नाही तर सामान्य नागरिक आणि प्रवाशांच्या विमानांचाही युद्धात ढाल म्हणून वापर करतोय, असं त्या म्हणाल्या. पण भारताच्या सुदर्शन चक्रानं पाकिस्तानला नामोहरम केलं. पाकचा प्रत्येक ड्रोन, प्रत्येक क्षेपणास्त्र आणि एफ 16 सारखी हेलिकॉप्टर्सचा भारतानं हवेतच चुराडा केला.
एअर डिफेन्स सिस्टीमची वैशिष्ट्यं
– S- 400 ही भारताची एअर डिफेन्स सिस्टीम हेच भारतीय सुदर्शन चक्र
– 600 किलोमीटरचं क्षेत्र व्यापते आणि शत्रूचा वेध घेते
– S- 400 जिथे असेल तिथल्या 400 किलोमीटरची सर्वत्र सुरक्षा ठेवते
– शत्रुचं कोणतंही ड्रोन, क्षेपणास्त्र, विमान हवेतच नष्ट करते
– ही सिस्टीम चालत्या वाहनावर तैनात असते
– एकाच वेळी 80 लढाऊ विमानं आणि ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रावर हल्ला केला जाऊ शकतो
– सिस्टीम भारतानं 2018 मध्ये रशियाकडून खरेदी केली
पाकिस्तानचा प्रत्येक डाव आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं उधळवून लावला त्यामुळे शत्रूसाठी कर्दनकाळ ठरलेलं हे सुदर्शन चक्र आपल्यासाठी सुरक्षा कवच ठरलं आहे. या एअर डिफेन्स सिस्टीमची अचूकता शत्रुला धडकी भरवणारी आहे. कारण पाकिस्ताननं पूर्ण हवाई हल्ले सुरू केले तरी राजस्थानपासून पंजाब आणि काश्मीरपर्यंतच क्षेत्रात कुठलंही क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान येवो, ते उद्ध्वस्त करणं आपल्याला सहज शक्य आहे. पाकची लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं शेकडो किलोमीटरवरूनच नष्ट केली. यातच या सुदर्शन चक्राच्या यशाचं गमक आहे.